Showing posts with label Marathi / मराठी. Show all posts
Showing posts with label Marathi / मराठी. Show all posts

Sunday, April 16, 2017

बहार आयी

बहार आयी तो जैसे यक बार
लौट आये हैं फिर अदम से
वो ख़्वाब सारे, शबाब सारे
जो तेरे होटों पे मर मिटे थे
जो मिट के हर बार फिर जिये थे
निखर गये हैं गुलाब सारे
जो तेरी यादों से मुश्कबू हैं
जो तेरे उश्शाक़ का लहू हैं

उबल पड़े हैं अज़ाब सारे
मलाल-ए-अहवाल-ए-दोस्तां भी
ख़ुमार-ए-आग़ोश-ए-महवशां भी
ग़ुबार-ए-ख़ातिर के बाब सारे
तेरे हमारे
सवाल सारे, जवाब सारे
बहार आयी तो खुल गये हैं
नये सिरे से हिसाब सारे

- फ़ैज़ अहमद फ़ैज़
---

मोहोरताना जणू एकवार
फिरून आली आदमकाळची
स्वप्नील सळसळ नवयौवनाची
अधरांवर जी तुझ्या उधळली
मिटून दर वेळी पुन्हा उमलली
फुलून आले गुलाब सारे
तुझ्या स्मृतींचा सुगंध ल्याले
प्रीतीत तुझिया आरक्त झाले

उमळून आल्या सगळ्या व्यथाही
नि मैत्रीमधल्या कटू कथाही
प्रियामिठीची नि ती खुमारी
सचिंत हृदयीची शल्यं सारी
तुझे नि माझे
सवाल सारे, जबाब सारे
मोहोरताना पुन्हा मांडले
नव्या दमाने हिशोब सारे


Friday, March 23, 2012

देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई?

देऊळ (अखेर) पाहिला. लघुकथा/रूपककथा हा संक्षिप्त लिखाणाला काव्याकडे नेणारा प्रकार लिखाणात प्रभावी असला, तरी अनेकदा त्या गोष्टींवरचे चित्रपट साफ फसतात. असे चित्रपट व्यावसायिक वगैरे असणं तर दूरच. देऊळ याला अपवाद आहे. वळू वगैरे चित्रपटांनी रुजवलेला सादरीकरणाचा पोत देऊळ बिनदिक्कत उचलतो आणि अधिक प्रगल्भ करतो. देऊळ आपली बारीकसारीक गोष्टी टिपणारी दृश्ये, दैनंदिन वास्तवाचं समर्थ चित्रण आणि सामन्यांच्या आयुष्यातही गोष्टी घडू शकतात या धाग्यातून रस्किन बॉंडचीही आठवण करून देतो. तो ’रिकामं देऊळ’पासून ’शिलाखंड’पर्यंतच्या कुसुमाग्रजांच्या अनेक समिधांचीही झलक दाखवतो. या दोहोंच्या मिश्रणातून तयार झालेली एक पूर्ण भाग न जाणारी गोष्टही सांगतो. पण तो अमूर्त नाही. तो वास्तवाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळेच तो अधूनमधून ’ढोलताशे’सारख्या नाटकाचीही आठवण करून देतो. पण त्याने नायक आणि सूत्रधार यांची चोख वाटणी केली आहे. त्यामुळेच सूत्रधार त्याची विवेकनिष्ठा नायकावर लादत नाही. परिणामी, देऊळ कुठेही प्रचारकी आणि तर्ककर्कश होत नाही. मुळात ती काही अवकाशांच्या संतुलनाची एक कथा आहे. ती आहे ते दाखवते. सूत्रधाराशिवाय कोणीही त्या गोष्टीत काहीच भाष्य करत नाही, पण तरीही तिची वास्तवाशी असलेली घट्ट वीण काही न बोलताही बरंच काही सांगून जाते. देऊळची गाणी विंदांचीही आठवण करून देतात तेही त्यातल्या विवेकनिष्ठ रोखठोकपणामुळेच. आपल्या गोष्ट सांगण्याच्या हातोटीमुळे देऊळची नाळ कळत नकळत कुठेतरी ’मालगुडी डेज’शीसुद्धा जोडलेली वाटते. सुरुवात आणि शेवटाचं पार्श्वसंगीतही हे नातं काहीसं अधोरेखित करतं. आणि तरीही देऊळ या सगळ्यांपेक्षा वेगळा आणि सरस ठरतो. 

ही गोष्ट आहे, त्यामुळे ती इथे सविस्तर सांगण्यात अर्थ नाही. तो उद्देशही नाही. चित्रपट सुरू होतो तो एका पुरातत्व खात्याचं उत्खनन चालू असल्याच्या दृश्याने. वास्तविक "हे काय (खोदकाम) चालू आहे?"छाप सपक संवाद नायकाच्या तोंडी इथे पुरू शकला असताही. पण इथे कोरीवकामात सपकपणाला स्थान नाही. त्या नायकाच्या विश्वात चाललेला व्यवहार इथपासून लख्खपणे दिसू लागतो. आपल्या आणि चित्रपटाच्या पहिल्याच संवादात हा चित्रपटाचा (होऊ घातलेला) नायक ज्या कमालीच्या अलिप्तपणे, निरागसपणे, साशंकतेने आणि स्वाभाविकपणे विचारतो, "काय एशीझ्येड हाये का?" तिथेच हा चित्रपट आपला खुंटा बळकट करतो. आपल्या आजूबाजूला चालू असलेल्या "विकास प्रकल्पां"विषयी ग्रामीण जनता अनभिज्ञ असते, या प्रकल्पांविषयीची साशंकता "बाहेरच्यांची"च अधिक असते अशा सार्वत्रिक, अकारण शहरी मानसिकतेला हा चित्रपट तिथेच हरताळ फासतो. मग तो मागे वळून पाहत नाही. वास्तविक त्या कथेत शहरी-ग्रामीण असं आहेही आणि नाहीही. ती कथा एका गावात घडते. म्हणून पटकथा त्या गावाचं वास्तव कुठलीही तडजोड न करता समर्थपणे उभं करते, आणि कथेतली पात्रं आपापले संवाद त्यानुरूप त्या बोलीभाषेत बोलतात. ’चला एक ग्रामीण (महाराष्ट्र दाखवणारा/पार्श्वभूमीला असणारा) चित्रपट काढू’ (चएग्राचिका) या मानसिकतेतून काढलेला हा चित्रपटच नव्हे. साहजिकच ’चएग्राचिका’ मराठी चित्रपटांना अनेकदा (विनाकारण) ग्रासून टाकणारा ’प्रमाण ग्रामीण बोलीभाषे’चा प्रश्न या चित्रपटाला अजिबात पडत नाही. या चित्रपटाचा सूत्रधार त्याची भाषा बोलतो. ती बोली वेगळी असली, तरीही या दोन बोलींच्या व्यवहारात बोलीभाषांच्या शुद्धाशुद्धतेचा आणि पर्यायाने ठरवल्या जाणार्‍या प्रतवारीचा वास येत नाही. 

धार्मिकतेच्या आध्यात्मिक मुलाम्याचं, व्यवसायीकरणाचं, आणि बटबटीतपणाचं प्रत्ययकारी चित्रण तर या चित्रपटात आहेच. पण कोरीवकाम करत बारकावे टिपण्याचा छंद असल्यासारखा देऊळ ते टिपत जातो. गाडीच्या नंबर प्लेटवरील "भाऊ"पासून दत्ताच्या स्टिकरपर्यंत, ’दत्त दत्त, दत्ताची गाय, गायीचं दूध...’ म्हणणार्‍या गाण्यांपासून कांदाफोडी आणि सागरगोटे खेळण्यापर्यंत हे बारकावे बेमालूमपणे येत जातात. भाऊंच्या ताटाखालचं मांजर म्हणून वावरणार्‍या सरपंचबाई आपला भाव वधारल्यावर ऐटीत टिवी पाहताना पार्श्वभूमीला ’होम मिनिस्टर’चं शीर्षकगीत चालू असण्याची कल्पकता विलक्षण आहे. तिथेही महिला सक्षमीकरणाचं वास्तव दाखवत हा चित्रपट निमूट पुढे जातो. ‘संडास ज्याच्या दारी तोच खरा पुढारी’ अशी घोषणा मिरवणारा भाऊंच्या घरचा संडास आणि सरपंचबाईंचा कागदावर बसलेला मुलगा हागणदारीमुक्त महाराष्ट्राची कथा व्यवस्थित विशद करतात. तापाने फणफणलेल्या केश्याला बघायला आलेल्या बाया आपली देहबोली, वावर, खोलीत बसण्याची जागा यातून सत्तेची सामाजिक उतरंड, पंचायती व्यवथेमधील महिला आरक्षणाने त्या पारंपरिक उतरंडीला दिलेला छेद अलगद चिमटीत धरून आपल्यापुढे ठेवतात. "बाई! पारोश्यानं झेंडावंदन! काय व्हनार या देशाचं?" अशासारखे संवाद एरवी चिमटीतून निसटणारे संकेतांचे आणि प्रतीकांचे संदर्भ सराईतपणे पकडतात. केशा आणि पिंकीमधले शारीर-अशारीर स्पर्शास्पर्श नाना कंगोरे टिपत जातात. साध्या दैनंदिन घटना, जीवन आणि राहणीमान दरडोई मोबाईल फोन आणि दूरचित्रवाणी संच यांचं दरडोई पाणी, वीज, शौचालयं यांच्याशी असलेलं व्यस्त प्रमाण कुठल्याही आर्थिक अहवालांच्या हवाल्याविना आहे तसं समोर ठेवतात. असं बरंच काही.

कथेच्या नायकावर कथा पुढे नेण्याचं ओझं नाही. सूत्रधारावर कथा घडवण्याचं ओझं नाही. कथेच्या नायकाला तात्कालिक जगण्याची मुभा आहे. किंबहुना त्याला काळाच्या एका बिंदूपलिकडचा अवकाशच नाही. सूत्रधाराला भूतभविष्याचा आसमंत आहे. परंतु त्यातूनच आकळलेली आपला काळाचा आवाका मर्यादित असल्याची जाणीव आहे. सूत्रधाराकडे भविष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे, पण अचूक भविष्य सांगण्याची अमानवी शक्ती नाही. त्याच्याकडे विवेकनिष्ठा आहे, पण त्यासाठी जिवाचं रान करण्याची वृत्ती नाही. त्याच्या त्रिशंकू अवस्थेचं त्याला भान आहे. सूत्रधार संपूर्ण मानवी आहे; तो जितका विचारशील आहे, तितका सर्जनशील नाही. नायकही संपूर्ण मानवी आहे; पण तो जितका सर्जनशील आहे, तितका विचारशील नाही. या संतुलनावर पूर्ण गोष्ट उभी आहे. एका विशिष्ट क्षणी सूत्रधाराची आपल्या मर्यादेची जाणीव तीव्र होते. तो प्राचीन उत्खननाच्या जागीही हिंडून पाहतो. आणि अखेर काहीशा हताशपणे गोष्टीला शक्यतांच्या यादृच्छ मार्गांवर सोडून तो कथेपासून नामानिराळा होतो. पुढे एका दिग्मूढ क्षणी नायकही त्याच उत्खननाच्या जागी पोहोचतो. इथे नायकाची सर्जनशीलता सामान्याकडून असामान्याकडे झेपावते. हा आणि केवळ हाच या गोष्टीचा निर्णायक क्षण आहे. परंतु तोपर्यंत पोचण्यासाठी घेतलेल्या मेहनतीत आणि कलाकुसरीत त्या क्षणाची तीव्रता आणि उत्कटतेचं यश आहे. भास-आभास, वास्तव-अवास्तव, मानवी-अमानवी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, दैव-सर्जन, पुरोगामी-सनातनी, श्रद्धा-अंधश्रद्धा, माणुसकी-सत्ता या आणि अशा अनेक सीमांवर नकळत उभं करून या क्षणी नायकही कथेपासून नामानिराळा होतो. केवळ अर्थ आणि शक्यता यांचा बहुमितीय आसमंत उरतो. ’देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई?" ही तर केवळ एक शक्यता. चित्रपट एक चित्रपट राहत नाही; फक्त एक गोष्ट उरते. देऊळ तिथेच इतर अनेक चित्रपटांपेक्षा वेगळा आणि सरस ठरतो.

Wednesday, April 27, 2011

जैत रे जैत

जैतापूरचा प्रकल्प होणारच असा दृढनिश्चय करून मगच आमचे मुख्यमंत्री चर्चेसाठी तयार आहेत. तसे ते नेहमी सांगत तरी असतात, असे वाचनात, ऐकिवात येते. चर्चा ही समस्येवर तोडगा काढण्यासाठी साधारणपणे केली जाते. त्यात अंतिम निर्णय गृहित धरलेला नसतो नि निश्चित तर अजिबात असू शकत नाही. जर अंतिम निर्णय एका बाजूने पक्का केला असेल नि त्यावरून मागे न हटण्याचा निर्णय घेतला असेल, तर चर्चा कसली करायची? जर चर्चेअंती एखादा मध्यममार्ग निघू शकतो अथवा प्रकल्प पूर्णपणे रद्द होऊ शकतो ह्या इतर शक्यताही गृहित धरल्या तरच त्याला चर्चा म्हणावे लागेल. अन्यथा आम्ही सांगतो त्याने समाधान झाले, तर तुमच्यासह, आणि नाही झाले, तर तुमच्याशिवाय प्रकल्प होणारच ह्या होर्‍याला चर्चा म्हणत नाहीत; दडपशाही म्हणतात. जनतेवर मेहेरबानी म्हणून आम्ही किमान स्पष्टीकरण देत आहोत, एरवी ते द्यायला नि जनतेला निर्णयप्रक्रियेत समाविष्ट करून घ्यायला आम्ही बांधील नाही, हाच दृष्टिकोण सरकारच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. परंतु स्वत:ला लोकशाहीचे तारणहार म्हणवून घेणार्‍या आमच्या कुठल्याच माध्यमांना असे तर्कसंगत प्रश्न विचारेवेसे वाटत नाहीत. कारण, बहुदा त्यांनीही सरकारप्रमाणेच आपली भूमिका निश्चित केली आहे, जी अर्थातच सरकारशी एकरूप आहे.

"लोकांचं भलं नसेल असा प्रकल्प आम्ही आणू तरी का?" असली हास्यास्पद विधानं आमचे मुख्यमंत्री बिनदिक्कत करतात. सरकार एवढं लोकाभिमुख असतं तर आणिक काय हवं होतं? पण एरवी सरकारवर नि कुठल्याही राजकीय प्रक्रियेवर जराही विश्वास नसणारे लोक नि त्यांचे उदात्तीकरण करणारी माध्यमं असल्या विधानांची खिल्ली उडवताना दिसत नाहीत. नारायण राणे ह्यांनी प्रकल्पाच्या निर्मितीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यांचा एकूण आव पाहता सध्याचे मुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला गेल्यावर आपला नंबर लागावा म्हणून हाय कमांडची मर्जी संपादन करण्यासाठी त्यांनी ती उचलली असावी असंच वाटतं. नि त्यांच्या सरळ सरळ चिथावणीखोर विधानांवर कधी कुठल्या माध्यमाने आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. कारण, त्यांनाही त्यात काही गैर वाटत नसणार. शिवसेनेने अचानक केलेला विरोध राजकीयदृष्ट्या शून्य जोखीम असणारा नि विन-विन आहे हे उघड आहे. अणुऊर्जेबद्दल, वीजनिर्मितीबद्दल, मोठ्या प्रकल्पाबद्दल, प्रकल्पग्रस्तांबद्दल शिवसेनेची काही ठोस भूमिका आहे किंवा योजना आहे असे वाचनात नाही. याच कोकणातील दाभोळ प्रकल्पाचा सर्वपक्षीय गोंधळ सर्वांना माहीत आहे. प्रकल्प नाही झाला तरी नि झाला तरी राजकीय लाभ उकळण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट आहे. नि त्याच्या होण्या वा न होण्याची त्यांना किती चिंता आहे, हेही उघडच आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधाला किती भ्यायचं हे सरकारला नि त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे आंदोलनकर्त्यांना नक्कीच माहीत असणार. पर्यावरण, अपारंपरिक ऊर्जा अशी आपल्याकडे दाखवण्यासाठी महत्त्वाची खाती अस्तित्त्वात आहेत. म्हणजे ती स्वतंत्र खाती आहेत एवढंच काय ते त्यांना महत्त्व. त्यांना कधीही कॅबिनेट मंत्री नसतो, पण महत्त्वसूचक स्वतंत्र अधिभार असणारा राज्यमंत्री असतो. त्यांचं काम बहुदा अपारंपरिक ऊर्जास्रोत कायमस्वरूपी अपारंपरिकच राहतील ह्याची खात्री करणे हे असावं. एकुणात ही खाती म्हणजे ’आम्ही त्यांना महत्त्व दिल्यासारखं नि त्यांच्याबद्दल गंभीर असल्यासारखं करतो’ ह्या सरकारच्या मानभावीपणाचा उत्कृष्ट नमुना आहेत. यंदा कधी नव्हे ते पर्यावरणमंत्री जयराम रमेश आपलं अस्तित्त्व अधोरेखित करत आहेत. त्यांचीही जैतापूरबद्दलची भूमिका हिंदोळ्यावरच आहे. ह्याचंही मुख्य कारण कुठल्याही ठोस भूमिकेचा अभाव एवढंच नाही, तर खरा प्रश्न प्रकल्प हवा की नको हा नसून आपलं एकंदरीत ऊर्जा, अणुऊर्जा, पर्यायी ऊर्जास्रोत ह्यांबद्दल धोरण काय असलं पाहिजे हा आहे, हेच न समजणं हे आहे, असं वाटतं. परिणामी, आज राज्यात, देशात किमान चर्चा व्हावी एवढीही राजकीय स्थिती नाही. सरकारच्या भूमिकेशी विपरीत भूमिका असणार्‍यांना राजकीय आधार नाही नि माध्यमे किमान तर्कसंगत चर्चेचाही आग्रह धरत नाहीत.

फुकुशिमा झालं असंही म्हणवत नाही. कारण ते तर अजून चालूच आहे. नि केव्हा निस्तरेल ह्याचा पत्ता नाही. तिकडे त्सुनामीने कहर केला नि जर्मनीत मेअकेल सरकारच्या पायाखालचं जाजम सरकलं. तिथल्या माध्यमांनी नि जनतेने तोच एक विषय लावून धरला. चेर्नोबिलच्या आठवणी काढून काढून प्रसंगाचं गांभीर्य जिवंत ठेवलं. अणुऊर्जेचा पराकोटीचा आग्रह धरणा‍र्‍या अनेक देशांनी सध्यापुरती हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवलेलं दिसत आहे. आज फुकुशिमा आणि अणुऊर्जा हा जगाच्या चर्चेचा विषय आहे, कारण त्या प्रकल्पाचे नि त्याविषयीच्या धोरणांचे परिणाम जागतिक आहेत, हे तरी किमान आमच्या माध्यमांना नि सरकारला मान्य असावं. मग जो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जगातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे, तो जगाच्या चर्चेचा विषय का नसावा?

आपली ऊर्जेची गरज किती आहे? किती असली पाहिजे? आपण अमेरिकेचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखेच आधी ऊर्जा ओरपून मग तिच्याबद्दल जागरूक होणार की आधीच तो मार्ग न घेता वेगळा मार्ग चोखाळणार? आपल्या ऊर्जेची निकड त्वरित भागविण्यासाठी आपण कुठले स्रोत वापरणार नि कालांतराने दीर्घमुदतीसाठी कोणते स्रोत वापरणार? जर पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत आपली ऊर्जेची नजीकच्या काळातली निकड भागविण्यासाठी वापरणं शक्य नसेल नि म्हणून आपण इतर स्रोत वापरणार असू, तर नजीकच्या काळासाठी त्यातल्या त्यात कमी पर्यावरणघातक स्रोत निवडू शकतो का नि कालांतराने त्यांच्यावरचा भर कमी कमी करत नेऊ शकतो का? त्यासाठी किमान उभारणीचा खर्च असणारे सध्या अस्तित्त्वात असलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारावर उभे राहू शकणारे प्रकल्प निवडणार की ज्यांचा खर्च भरून काढण्यासाठी ब्रेकइवन बिंदू खूप मोठ्या कालावधीचा आहे, असे प्रकल्प उभारणार? ते कालांतराने बंदच करायचे आहेत आपल्याला, ही भूमिका ह्या धोरणाच्या मागे असणार का नि त्यानुसार योजना आखणार का? ह्यासाठी आपण पर्यायी तंत्रज्ञान परदेशात कुणीतरी तयार करण्याची वाट पाहत बसणार आहोत का? हे आणि असे प्रश्न विचारण्याची, त्याची चर्चा करण्याची नि सरकारकडे अशा व्यापक धोरणासाठी मागणी करण्याची गरज असताना आपण काय चर्चा करत आहोत? --- प्रकल्प पहिजेच. प्रकल्प नको. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन कसं नि केव्हा करणार. ते आम्ही करू, जादा पैसे देऊन करू. प्रकल्पाला विरोध म्हणजे प्रगतीला विरोध. प्रकल्पाचा विरोध अफवांमुळे होत आहे. गैरसमज पसरवले जात आहेत. बाहेरचे लोक येऊन दिशाभूल करत आहेत, त्यांना उभं करू नका. कोण येतो विरोध करायला ते पाहतोच आम्ही. प्रकल्प होणारच. वगैरे.

सरकारची भूमिका बाण भात्यातून काढून धनुष्याला लावून प्रत्यंचा ताणून उभी असल्यासारखी आहे. परिणामी, सगळी चर्चा आणि आंदोलन "आधी तुम्ही बाण खाली ठेवा" इतकं घायकुतीला आलं आहे. त्यामुळे व्यापक चर्चा होणं अशक्यच दिसत आहे. हे जरी खरं असलं, तरी ह्याची जबाबदारी नि दोष आंदोलनालाही द्यायला हवा. जैतापूर चळवळकर्त्यांचा दृष्टिकोणसुद्धा पारंपरिक ऊर्जाप्रकल्पांसारखा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, स्थानिक नैसर्गिक/ सांस्कृतिक र्‍हास, मोठे प्रकल्प वगैरे पारंपरिक मुद्द्यांवरच केंद्रित झाला आहे. त्यामुळेच "प्रकल्पाचे तोटे सांगणारे सगळे बाहेरचे आहेत" असल्या राणे/चव्हाण/काकोडकर ह्यांच्या विधानांवर चळवळीतले कोणीही "मग फायदे सांगणारे स्थानिक आहेत काय?" किंवा "प्रकल्पाचे बरेवाईट परिणाम बाहेरच्यांनाही सहन करावे लागणार आहेत" असे ठणकावून सांगताना मी तरी ऐकले नाहीत. त्यामुळेच मुंबईतल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेवर बहिष्कार न टाकता उलट तिचा वापर प्रश्नाचा व्यापक आवाका समोर आणायची संधी म्हणून करायला हवा होता. पण चळवळ नर्मदा ढाच्यावर स्थानिककेंद्री करण्यात चळवळ करणार्‍यांनीही नकळत हातभार लावला आहे, असं वाटतं. जल/औष्णिकविद्युत नि असे अणुविद्युत प्रकल्प यांतला हा फरकच समजून घेतला जात नाही की काय असं वाटतं. प्रश्न वास्तविक जैतापूरचा, रत्नागिरी जिल्ह्याचा नसून जगातील सर्वात मोठ्या अणुऊर्जाकेंद्राचा नि परिणामी जगाचा आहे. हे कुणीतरी ओरडून सांगायला हवंय. नि सरकारचंही फावतंय, कारण त्यांनाही हा प्रश्न स्थानिक आहे हेच अधोरेखित करण्यात स्वारस्य आहे.

आम्हांला तहान लागली की आम्ही विहीर खणणार. त्याचं आम्हांला काहीच वाटत नसणार. मग दर वेळेस आम्ही झालं ते झालं, आता लागली आहे तहान तर नको का ती भागवायला म्हणून तात्पुरते दिसेल ती जागा खणत सुटणार नि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या. आम्हांला कशाचंच काही वाटत नसणार. नि निर्णय घेतानाच जनतेला सहभागी करून न घेता नि कुठलंही व्यापक धोरण न ठरवता थेट लोकांच्या मुळावर उठल्यावर झालेल्या विरोधाला आम्ही उपटसुंभांचा कांगावा म्हणणार. आम्ही आमचं तेच रेटत राहणार. हे सगळं होत असताना जत्रेच्या उन्मादाचे ढोलताशे बडवत आम्ही सगळेच बधिर होऊन साधे प्रश्नही पाडून नाही घेणार. आम्ही विजयाचा दांडोरा पीटत राहणार नि नाग्याच्या ईर्ष्येपायी चिंधीचा हकनाक बळी जाणार.

Friday, April 1, 2011

वाटा

सकाळ सकाळची गोष्ट आहे
जेव्हा ह्या वाटा निघतात इथून
दवात नि सांडलेल्या दुधात न्हाऊन
झाडूंनी खसाखसा अंग पुसून
गंधफुलांचे सडे माळून
मावळत्या दिव्यांत चाचपडत
बातम्या पोचवत
जातात इथून

आठेक वाजता जेव्हा
चहा पिऊन घरातून निघतात
तेव्हा जगबुडीच्या लगबगीने
स्टेशनकडे धावतात
नि गर्दीत स्वत्व हरवून
मिसळून जातात

मग ह्या बोळातून निघून
त्या गल्लीतून
तिकडच्या कंपाउंडवरून उडी मारून
चार घरं चुकवून
तिठ्यावरच्या चिंचेला वळसा घालून
गाड्यांना न जुमानता रस्ता क्रॉस करून
चौकात मेन रोडला लागतात
ही साधारण अकराएक वाजताची गोष्ट आहे

भर दुपारी
कल्हईवाले नि बोहारणींना
येणाजाणार्‍या मोलकरणींना
ईशान्त नाव असलेल्या मुलाला
कुणी थेट स्वयंपाकघरातून मारलेल्या
हाय पीच हाकांना
घराबाहेर टाकलेल्या कोळंबीवर
तुटून पडलेल्या कावळ्यांना
नि मांजरींच्या म्यावांना
खरकट्या पाण्याचे खिडकीतून
बिनदिक्कत खाली टाकलेले सडे झेलून
सुक्या पाचोळ्याने दिलेल्या करकरीत शिव्यांना
मुळीच भीक न घालता
बिल्डिंगांच्या आडोशाला
जऽरा पडतात
तेव्हा जिवाला किती गार वाटतात

दुपारच्या झोपेतून उठून
ग्लानीतच गप्पपणे
उन्हं कलण्याची वाट बघत
दबा धरून बसलेल्या वाटा
बटाटावड्यांच्या पहिल्या घाण्याबरोबर
अशा काही चुरचुरत जिवंत होतात
की दमलेला सूर्यसुद्धा
सावल्या लांब करून
कट्ट्याला रेलून
दाबेली नि वडापाव खात
त्यांच्याशी एकजीव होत होत
हरवून जातो

ह्या वाटांवरच्या संध्याकाळी
कधीच एकट्या येत नाहीत
कधी वारा येतो
कधी गजरा येतो
कधी चक्क वळवाचा पाऊस येतो
अनावर ओढीनं निघालेली
येणारी, जाणारी, परतणारी
माणसं दिसली
की वाटा लगोलग आपली दिशा बदलून
त्यांना वाट मोकळी करून देतात
तेव्हा वाटांच्या दुसर्‍या टोकांना
वाट पाहत उभी असलेली घरं, माणसं
नि समंजस वाटा
ह्यांच्यातलं आपलं नेमकं कोण
हे कळत नाही पटकन

ज्या विवक्षित वेळी
कूकरच्या शिट्ट्यांचे
टीव्ही सिरीअलच्या शीर्षकगीतांचे
नि सामुदायिक बोलण्यांचे
आवाज बंद होतात
तेव्हा कुठे वाटांवर रात्र होते
सोडिअम वेपरच्या प्रकाशात चमचमणारी
अभ्यासाच्या, इंग्लिश सिनेमांच्या
नि गजराअत्तरांच्या
काही चुकार वाटा सोडल्या
तर सगळे फूटपाथ,
रस्ते, पथ,
स्ट्रीट, रोड
बोळ, गल्ल्या,
लेन, आळ्या,
पाऊलवाटा
झोपेतसुद्धा जात असतात
कुठूनतरी कुठेतरी

कशासाठी कळत नाही
पण रोज रोज जात असतात
मी येत असतो तेव्हा
मी जात असतो तेव्हा
मी वाट पाहत असतो तेव्हा
नि नसतो तेव्हा
मी कामात गढून जातो तेव्हा
नि फुकट बसतो तेव्हा
मला राहून राहून आठवतात तेव्हा
नि हो, मी त्यांना विसरतो तेव्हा
हो, अगदी तेव्हासुद्धा.
त्या वाटा निघतात इथून
नि दूर दूर जात राहतात
आत आत काळोखात

Saturday, October 23, 2010

सोप्यासोप्याच्या सुलट्या उलट्या किंवा असंच काहीतरी...

दरवाजा संध्येचा थोडा किलकिल किलकिल झालेला
स्वर त्याच्या सांध्यांचा हलका किणकिण मिणमिण आलेला
भाळाशी ओघळ घामाचा निथळत निथळत आलेला
भुवयांशी येता अडलेला झिरपत झिरपत मुरलेला
बुबुळांना स्वर तो वातीचा कातर कातर दिसलेला
वाराही जातायेताना हळवा हळवा तुटलेला
रात्रीच्या काखी मौनाचा दरवळ दरवळ सुटलेला

तो रोज सकाळी नेमाने लवकर बिवकर उठणारा
सवयीने चूळा दिवसाच्या खळखळ खळखळ भरणारा
देहावर उरल्या रात्रीच्या खाणाखूणा पुसणारा
रात्रीही त्याच्या वर्जिनशा उष्ट्या बिष्ट्या नसणार्‍या
स्वप्नांच्या निष्ठा रातींच्या कह्यात बिह्यात असणार्‍या
दिवसा ना डोळा केव्हाही इकडे तिकडे चळणारा
शारीरी स्वास्थ्यासाठी तो सैरावैरा पळणारा

मौनाशी श्वासाश्वासांचा चाळा ताळा केलेला
उकलेचा उकलेशी गुंता उलटा सुलटा केलेला
स्वप्नांनी येताजाताना हल्ला कल्ला केलेला
रस्त्याशी रस्ता पायांचा अडला नडला भ्यालेला
पाण्याशी ओढा पाण्याचा पाणी पाणी झालेला
डोक्याचा गाभा डोळ्यांनी हलका हलका केलेला
जगण्याने रडण्याला अपुला हसता हसता केलेला

तो कसली पर्वा नसणारा लाइफ वाइफ जगणारा
कोणाच्या चिंतांची त्याला चिंता बिंता नसणारा
जगण्याच्या धुंदी मेंदूच्या जागोजागी असणारा
नि तरीही त्याला मद्याचा प्याला प्याला चढलेला
पोटाने ओकार्‍या करता ओक्साबोक्शी रडलेला
तो ओका ओका कोनाडा भडभड भडभड भरलेला
डोक्याचा ताबा सुटताना डोळा डोळा सुटलेला

Thursday, October 14, 2010

तू असशील कुठेतरी

तू असशील कुठेतरी
असं धरून चालणं आवश्यक आहे मला
तुझ्या असण्यामुळेच
असं घरून निघणं रोज शक्य आहे मला

तुझे आकार, उकार आणि हुंकार
मला हवे तसे मी केव्हाच गृहित धरले आहेत
तुझ्या अस्तित्त्वाचे मूर्तिमंत नकार
मला नकोसे म्हणून मी नेहमीच नाकारले आहेत

स्पर्शांचे शब्द, डोळ्यांचे वाक्प्रचार, मौनाच्या म्हणी
ह्यांनी निर्माण होणारी भाषा तुलाही कळायलाच हवी
तिला अक्षररूप देऊन रचलेली ही उपासनेची वाणी,
अन्योक्ती तर अन्योक्ती, पण तुला कळायलाच हवी

तुझ्या असण्याचा प्रश्न
हा आता तुझ्या अस्तित्त्वाचा उरला नाही
माझ्या श्रद्धेच्या पुष्टीसाठी
तुझ्या असण्यावाचून पर्याय आता उरला नाही

तुझ्या सगुण-निर्गुण रूपांवर, नामांवर
जीव ओवाळून टाकताना पाहिलंय मी
तू भेटत नाहीस म्हणून बाजारात उतरून
तुला भेटवून घेताना पाहिलंय मी

माझं तुझ्यावर प्रेम आहे
असं मी तुला म्हणणार आहे
आणि खरोखरीच तुझ्यावरच
माझं प्रेम असणार आहे

तुला भक्त हवा असेल
तर लक्षात घे, मी तुला शोधतच नाहीये
मैत्रीचं म्हणत असशील
तर सख्याचा एक याचक बेट होऊन उभा आहे

भेटशील तू कधीतरी
म्हणून मी जिवंत आहे
अन्यथा माझ्या बेटाचा
बेट हाच अंत आहे

Friday, September 24, 2010

‘...आणि त्यांनी आमचं खरंच ऐकलं तर?’

आडव्याउभ्या पसरलेल्या कुटुंबांची एक सनातन जमीन असते. ती निव्वळ असते. तिच्यावाचून कोणाचाही रोजचा कारभार कधीही अडत नाही. कुटुंबाच्या सामूहिक स्मृतीत असण्याव्यतिरिक्त तिला तसंही काही अस्तित्त्व नसतं. मग कुठल्या एका पिढीला वाटतं की आता त्या स्थावर मालमत्तेचा जंगम सोक्षमोक्ष लावून टाकावा नि मग कुजबूज, पत्रोपत्री सुरू होते. कबिल्याच्या कुठल्याशा एका सोहळ्यात विषय काढून सातबार्‍यावर नाव लागलेल्या व विशेषत: न लागलेल्या सर्वांना गोळा करून चर्चा सुरू होते. आज आपल्या घरात सर्व मराठी, हिंदी दैनंदिन मालिकांच्या वरताण एका गृहकलहाचं बीज पेरलं जाणार नि त्याचे भाग पुढल्या सात पिढ्यांना पुरणार अशी सुप्त भीती, खात्री, व इच्छा तिथे उपस्थित समस्त प्राणिमात्रांत असते. अशा सुंदोपसुंदीच्या परमोच्च क्षणी कुटुंबातल्या रोख-ठोक नि व्यवहार्य बाईने उगा आपल्या माथी लादलेलं समूहाचं सामूहिक शत्रुत्व ‘आपण त्या गावचेच नाही’ इतक्या सहजतेनं नाकारावं, किमान वाटाघाटींमध्येच कुणाला कळायच्या आत तोडगा निघावा, आणि हाती यायचं ते आलेल्या व हाती नव्हतं यायचं ते न आलेल्या अशा सर्वांनी तो मान्य करावा, ह्याच्यासारखा दुसरा अँटिक्लायमॅक्स नाही. असं झालं की लोकांना धक्का बसतो नि त्यातून सावरणं कठीण होऊन बसतं. ‘असं कसं काहीच वाद न होता प्रश्न सुटला’ असा प्रत्येक जण झाल्या प्रकाराविषयी सर्वस्वी अविश्वास दाखवतो. मग ‘कसे काय तयार झाले कोणास ठाऊक’ अशा दबक्या आवाजातल्या कुजबुजी सुरू होतात. थंडी वाजते म्हणून घोंगडी घट्ट आवळून घेत ‘व्यवस्थित भिजत ठेवली होती खरी, अशी कशी सुकली’ अशा अचंब्याने, अविश्वासाने तिच्याकडे पाहत सूर्याला खुन्नस द्यावा, असं काहीतरी मंडळींचं होऊन बसतं.

व्यक्तिपातळीवरील ह्या प्रकाराचा संस्थात्मक आविष्कार पक्षापक्षांतून, मंत्र्यांच्या आलयाआलयांतून, विधिमंडळांच्या सभांच्या गृहागृहांतून, प्रशासकीय अधिकार्‍यांच्या टेबलाटेबलांवरून, प्रसाराच्या माध्यमामाध्यमांतून होत असतो, तोवर ठीक आहे; परंतु न्यायालये जिथे तोडगा काढण्यासाठी बसतात तिथे त्यांचीही हीच अवस्था व्हावी नि त्यांनाही असल्या अँटिक्लायमॅक्साने व न्यूनगंडाने ग्रासून टाकावं, हे अतर्क्य आहे. आपलं नि आपल्या निर्णयाचं सार्वभौमत्व अबाधित न राहण्याची शंका आली, तरी भावना दुखावल्याप्रमाणे अवमानाच्या शिक्षा ठोठावणार्‍या न्यायालयांनी किमानपक्षी स्वत:तरी आपल्याच निर्णयाचा मान राखायला नको का? आपला निर्णय अंतिम आहे, विधिमंडळांचा तो बदलण्याचा अधिकार वगळता सर्वोच्च आहे व त्याचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, ह्याबद्दल त्यांना शंका असण्याची गरज नसावी. आपला निर्णय झुगारून देऊन लोक रस्त्यावर येऊन तो पायदळी तुडवतील हे गृहित धरून वा त्या भीतीला बळी पडून न्यायालयांनी तो निर्णय देणे विनाकारण पुढे ढकलणे ह्यासारखा स्वत:च स्वत:ला पराभूत करणारा प्रकार दुसरा नसावा. विधिद्वारा स्थापित संविधानांवर चालणार्‍या लोकशाही गणराज्याची ह्याहून भीषण शोकांतिका ती काय?

Sunday, August 15, 2010

बुद्ध

"देव म्हणजे कोण? देव म्हणजे काय?
देव म्हणजे हे का? देव म्हणजे ते का?"
"देव म्हणजे हे नव्हे. देव म्हणजे तेही नव्हे.
तर्काच्या कसोटीवर जो कार्यकारणभाव स्पष्ट करता येतो, तो देव नक्कीच नव्हे.
सध्याच्या आकलनानुरूप जे स्पष्ट करता येत नाही, तिकडे देव असू शकतो."
"म्हणजे असेलच."
"असंही म्हणता येणार नाही.
संपूर्ण अतर्क्यापासून सुरू झालेला प्रवास आज इथवर आला आहे.
तर्क्य रोज वाढते आहे, अतर्क्य रोज घटते आहे."
"म्हणजे नेहमीच काहीतरी अतर्क्यसे उरेलच."
"तसे काही उरलेच नाही, असे तर्काला सिद्ध करावेच लागेल."
"असे कधी होईल?"
"ज्याचा कार्यकारणभाव मला कधीच स्पष्ट करता येणार नाही,
जे मला कधीच समजून घेता येणार नाही,
असे मानवी बुद्धिमत्तेच्या पल्याड ह्या जगात काहीतरी आहे,
ह्या धारणेचा समूळ लय होईल तेव्हा."
"हा माज आहे. मानवाच्या आकलनाबाहेरही काही असेलच - जसा की देव"
"अतर्क्याच्या मागे असणाऱ्या अशा अद्भुत शक्तींचं अस्तित्त्व
तुमच्या बुद्धिमत्तेचं फलित आहे, ते तुमच्या आकलनाबाहेर कसं असेल?"
"अं?"
"मृगासनावर बसून उपासना करणारा मनुष्येतर प्राणिवर्य पाहण्यात नाही.
वाघाला बोकडाचा बळी दगडावर चढवताना कुणी पाहिल्याचे ऐकीवात नाही.
देवाच्या अस्तित्त्वावर इतका ठाम विश्वास असणारा दुसरा प्राणी ऐकीवात नाही.

आज जे आकलनाबाहेर आहे, त्यातलेच काही उद्या आत असेल.
जे आत आहे, त्याला ते सुधारेल, अधिक सुस्पष्ट करेल.
आकलनाच्या कक्षा नित्य नूतनाचा स्वीकार करत सनातन वाढत आहेत.
ह्या विस्ताराला क्षय व लय नाही,
विस्ताराच्या अंताचे भय नाही
कारण, विस्ताराच्या अंतापलीकडे काही असणे संभवत नाही
उत्पत्ती-स्थिती-लयाच्या चक्रातून ते मुक्त आहे.
हे शाश्वत आहे.

सध्या आपले नसणे आकलनीय आहे, आपले असणे संदिग्ध आहे
पण तसे उद्या असेलच असे नाही.
ते तसे उद्या नसावे, ह्यासाठी हे ध्यानात घेतले पाहिजे की
आपण आज आहोत तसे उद्या नसणार,
आपली बुद्धी धारण करणारा हा देह पुन्हा नसणार,
जर संक्रमित व जतन केली नाही, तर ही बुद्धीही उद्या नसणार.
तिच्या संक्रमणाची व जतनाची
तसे करू शकणार्‍या प्रत्येक मानवाच्या,
म्हणजे अर्थातच सर्वच जन्माला येणार्‍या माणसांच्या अंतापर्यंत कल्याणाची
व पर्यायाने स्वहस्तेच हिंसेने युद्धून तिला आपल्यासह नष्ट न करण्याची
सामूहिक जबाबदारी आपल्यावर आहे."

Saturday, July 24, 2010

उपद्व्यापी खो खो- मावशीबोलीतल्या कविता



संवेदच्या खोखोमध्ये पब्लिक ज्या तडफेनं आणि वेगानं उतरतंय ते पाहून हे लोक पेटण्यासाठी ठिणगीची वाट पाहत का बसले होते, काही कळेना.





***





मी भाषांतर करणार नाही आता, केलं तरी छापणार नाही ब्लॉगावर, येत नाही मला ते करता ह्या मताचा मनात नि जनात उच्चार केला नि संवेदने हा दुष्ट खो चालू केला. वर आम्हांला आग्रहाचं आवताण. आता भोगा.





***





एकंदरीत ब्लॉगविश्वात युरोपिअन भाषांना (युरोपाचा एकंदरीत भाव सध्या उतरला असला तरी) भलताच भाव दिसतोय. आपली सरड्याची धाव इंग्लिश, हिंदी नि गेलाबाजार उर्दूपर्यंतच. ह्या भाषा येणार्‍यांना ह्यातल्या कवितांच्या भाषांतराचं काहीसुद्धा कवतिक नसतं. शप्पत्थ! (घर की मुर्गी ... असो.) संस्कृताचं उठून भाषांतर करावं असा काही संस्कृताचा आपला अभ्यास राहिला नाही, ह्याचं एक राहून राहून वाईट वाटलं. त्यामुळे आमची ही आमचं सख्य असणार्‍या सख्ख्या मावश्यांची भाषांतरं.





***





बॉब डिलनविषयी मज पामराने काय बोलावे. येथे पाहा. त्याचं हे नितांतसुंदर गाणं.






Blowin' In The Wind





How many roads must a man walk down


Before you call him a man?


Yes, ’n’ how many seas must a white dove sail


Before she sleeps in the sand?


Yes, ’n’ how many times must the cannonballs fly


Before they’re forever banned?


The answer, my friend, is blowin’ in the wind


The answer is blowin’ in the wind





How many years can a mountain exist


Before it’s washed to the sea?


Yes, ’n’ how many years can some people exist


Before they’re allowed to be free?


Yes, ’n’ how many times can a man turn his head


Pretending he just doesn’t see?


The answer, my friend, is blowin’ in the wind


The answer is blowin’ in the wind





How many times must a man look up


Before he can see the sky?


Yes, ’n’ how many ears must one man have


Before he can hear people cry?


Yes, ’n’ how many deaths will it take till he knows


That too many people have died?


The answer, my friend, is blowin’ in the wind


The answer is blowin’ in the wind





(चालीतला अनुवाद)





वाटा किती सांग झाल्या पायाखालच्या


की म’ माणसास माणूस म्हणवणार?


नि हो, पाखरू किती सागर मागे टाकले


की म’ काठावर पंख पसरणार?


नि हो, नेमक्या कितीदा ह्या तोफा धडाडल्या


की म’ कायमची बंदी घालणार?


उत्तर, अरे यार, ना दडलंय कुठे आत


उत्तर तर उडे वारियात





किती काळ सांग हा पर्वत ठाकणार


नि म’ सागरात वाहून जाणार?


नि हो, किती काळ सांग कुणी लोक कंठणार


मुक्तीवाचून कसे थोपणार?


नि हां, कितीदा कुणी सांग नजरा फेरणार


नि दिसत नसल्याचं सोंग वठवणार?


उत्तर, अरे यार, ना दडलंय कुठे आत


उत्तर तर उडे वारियात





मान कितीदा वर लागते करावी


कुणा आभाळ दिसावं म्हणून?


नि हो, कान पाहिजेत किती एका व्यक्तीला


कानी आक्रोश शिरावा म्हणून?


नि हो, कित्ती लोक अजून मेले की म’ कळेल


गेले हकनाक बरेच ब्वा, म्हणून


उत्तर, अरे यार, ना दडलंय कुठे आत


उत्तर तर उडे वारियात





***





The American Poetry & Literacy Project हा प्रकल्प अमेरिकेत कविता जनमानसांपर्यंत नेऊन पॉप्युलर करण्यासाठी राबवला गेला/जात आहे/असावा असं त्यांनी प्रसिद्ध केलेल्या 101 Great American Poems पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय. त्या वरवर चाळल्या नि रॉबर्ट फ्रॉस्टची रम्य रानं नि पायाखाली नसलेले रस्ते सोडून पुढे गेलो तर थेट फक्त १०१वी कविता (अर्थात मधल्या काही गाळून-चाळून तिथे पोहोचल्यावर) वाचता क्षणी आवडली. ती ही W. H. Auden ची कविता (त्याच्याबद्दल इथे वाचा). तर हा मूळचा इंग्लिशमन निघाला! (घ्या...एका दगडात). वास्तविक ती कविता वाचूनच कळतं, ‘हे अमेरिकनाचे काम नोहे’. (जालीय प्रताधिकारमुक्त (बहुदा) स्रोत: http://www.poets.org/viewmedia.php/prmMID/15549)





The Unknown Citizen





(To JS/07/M/378 This Marble Monument Is Erected by the State)





He was found by the Bureau of Statistics to be


One against whom there was no official complaint,


And all the reports on his conduct agree


That, in the modern sense of an old-fashioned word, he was a saint,


For in everything he did he served the Greater Community.


Except for the War till the day he retired


He worked in a factory and never got fired,


But satisfied his employers, Fudge Motors Inc.


Yet he wasn't a scab or odd in his views,


For his Union reports that he paid his dues,


(Our report on his Union shows it was sound)


And our Social Psychology workers found


That he was popular with his mates and liked a drink.


The Press are convinced that he bought a paper every day


And that his reactions to advertisements were normal in every way.


Policies taken out in his name prove that he was fully insured,


And his Health-card shows he was once in hospital but left it cured.


Both Producers Research and High-Grade Living declare


He was fully sensible to the advantages of the Instalment Plan


And had everything necessary to the Modern Man,


A phonograph, a radio, a car and a frigidaire.


Our researchers into Public Opinion are content


That he held the proper opinions for the time of year;


When there was peace, he was for peace: when there was war, he went.


He was married and added five children to the population,


Which our Eugenist says was the right number for a parent of his generation.


And our teachers report that he never interfered with their education.


Was he free? Was he happy? The question is absurd:


Had anything been wrong, we should certainly have heard.





(अनुवाद)





अनाम नागरिक





(अ.त./०७/पु/३७८ ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्मारक शासनाच्या निधीतून उभारण्यात आले.)





राज्य सांख्यिकी आयोगाकडे उपलब्ध माहितीनुसार


ह्यांच्याविरुद्ध कोणत्याही अधिकृत तक्रारीची नोंद नव्हती,


व ह्यांच्या वर्तनासंबंधित सर्व अहवाल निर्विवाद सांगतात


की आधुनिक संदर्भांनुसार त्यांची वर्तणूक ‘संत’ व्यक्तीप्रमाणेच होती,


कारण त्यांनी आपल्या हरेक कामात नेहमीच व्यापक समाजाचे हित पाहिले.


मधला युद्धाचा काळ वगळला, तर ह्यांनी निवृत्त होईपर्यंत


एकाच कारखान्यात विनाखंड काम केले नि कामावरून कमी करणं तर दूर


उलट ‘फज मोटर्स’ ह्या त्यांच्या उद्योगसमूहाचे मालक त्यांच्या कामाबद्दल नेहमी समाधानी राहिले.


पण म्हणून काही हे मालकांचे पंटर नव्हते,


कारण त्यांनी युनिअनच्या सभासदत्वाची वर्गणीही नियमितपणे भरली,


(ह्यांच्या युनिअनसंबंधी प्राप्त अहवालात कोणत्याही गैरप्रकाराची नोंद नाही.)


आणि आमच्या समाजसेवकांनी मिळवलेल्या माहितीनुसार


हे आपल्या गोतवळ्यात सर्वांचेच आवडते होते व एखाद ड्रिंक आवडीने घेत.


वृत्तपत्रांचे प्रतिनिधी खातरीलायकपणे सांगतात की ते दररोज वर्तमानपत्र विकत घेत


आणि जाहिरातींवरील त्यांच्या प्रतिक्रिया चारचौघांसारख्याच सामान्य असत.


ह्यांच्या नावे काढण्यात आलेल्या विमा पॉलिसींवरून हे स्पष्ट आहे की त्यांचा हरप्रकारे विमा उतरवण्यात आला होता


आणि ह्यांच्या आरोग्याचा दाखला दर्शवतो की त्यांना एकदा दवाखान्यात दाखल करण्यात आले होते,


जिथून ते सुखरूप बरे होऊन परतले.


‘प्रोड्युसर्स रीसर्च’ व ‘हाय-ग्रेड लिविंग’ ह्या दोहोंच्या मते


ते आपल्या मासिक हफ्ता योजनेचे फायदे जाणून होते


आणि आधुनिक मानवाला आवश्यक त्या सर्व सुखसोयी, जसे की -


ग्रामोफोन, रेडिओ, मोटारगाडी, फ्रीज इ. बाळगून होते.


आमचे जनमताचे विश्लेषक समाधानकारक अहवाल देताना सांगतात,


की ते वेळोवेळी त्या त्या वेळी योग्य अशी मतं राखून होते -


जेव्हा शांतता नांदत होती, तेव्हा ते शांततेचे पुरस्कर्ते होते;


नि जेव्हा युद्धाची वेळ आली, तेव्हा ते युद्धाच्या आघाडीवरही गेले.


हे विवाहित होते व ह्यांनी लोकसंख्येत पाच अपत्यांची भर टाकली,


आमच्या सुमानववंशतज्ज्ञांच्या मते त्यांच्या पीढीसाठी पाच ही अपत्यसंख्या योग्यच होती,


आणि आमच्या शिक्षकांच्या मते ह्यांनी कधीही आपल्या पाल्यांच्या शिक्षणात ढवळाढवळ केली नाही.





ते स्वतंत्रमुक्त, स्वच्छंदीआनंदी होते का?


हा काय अचरट प्रश्न आहे, हे काय विचारणं झालं?


जर तसंच काही असतं


तर आम्हांला नक्कीच कळलं असतं.





***





अजून भोगा. जावेद अख्तर हा आपला उगाच गुलज़ारी जरीची आसमानं आणून चमकदार शब्द न पेरणारा वास्तवाचा कवी. केवळ आपली रुची अभिजात का काय ती आहे हे ठसविण्यासाठी गुलज़ारचं प्रेम असेल तर तुम्हांस ते लखलाभ असो; मला जावेद अख्तरही तेवढाच आवडतो. (एक आकाशात विहरणारा surreal कवी नि एक जमिनीवरून चालणारा real कवी असा एक मोघम फरक वाटतो मला --- दोन्हीही चांगल्या अर्थानेच. वाद नकोत. वादंग तर मुळीच नकोत.) त्याच्या सोप्या गाण्याच्या सोप्या अनुवादाचा प्रयत्न.





तुमको देखा तो ये ख़याल आया


ज़िंदगी धूप तुम घना साया





आज फिर दिल ने एक तमन्ना की


आज फिर दिल को हमने समझाया





तुम चले जाओगे तो सोचेंगे


हमने क्या खोया हमने क्या पाया





हम जिसे गुनगुना नहीं सकते


वक़्त ने ऐसा गीत क्यूं गाया





(अनुवाद)





तुला पाहून काही आत उमललं


अन रोजच्या लाहीत खुप गार वाटलं





आज मन पुन्हा वाहावत गेलं


त्याला मग समजावून परत आणलं





तू गेल्यावर मग करीन ताळा


काय जमवलं नि काय गमावलं





मला गुणगुणताही न यावं असं


काळानं गाणं का बरं गायलं





खरं तर तारकशमधल्या काही कवितांची मागे केली होती भाषांतरं. पुन्हा केव्हातरी. आता पुरे!





माझा खो ‘नंदन’ला.


Saturday, July 10, 2010

इतरचे ऋतू

माझ्याआधी सगळे कवी
एकेक ऋतू जगून गेले
रंग त्यांचे, गंध त्यांचे
नाद त्यांचे, स्पर्श त्यांचे
एकेक करून सगळे जण
सर्व काही कोळून प्याले

हल्ली जेव्हा कधी कुठे
कुठलातरी ऋतू येतो
पास न केवळ शब्द त्यांचे
जाणीवेतील सर्वच त्यांचे
रंग त्यांचे, गंध त्यांचे
नाद त्यांचे, स्पर्श त्यांचे

ऋतू काय!...येत असतात
माघारीचा मान्सून म्हणा
वादळांचे सीझन म्हणा
चार म्हणा, तीन म्हणा
तीनशे साठ अंशांचे
हवे तेवढे भाग म्हणा

ऋतू पाऊसपाण्याचे, वाहून गेल्या पाड्यांचे
ऋतू श्रावणी उन्हांचे, भाजून फुटत्या लाह्यांचे
ऋतू गुलाबी हिवाचे, शून्याखालच्या पार्‍याचे
ऋतू उमलत्या कळ्यांचे, स्वार्थपरायण पानांचे
ऋतू चांदण्या रातींचे, चंद्रग्रासल्या भीतींचे
ऋतू कोवळे ओलेते, ठाक कोरड्या डोळ्यांचे
ऋतू रंगल्या चालींचे, यतिभंगल्या ओळींचे
ऋतू कविता होण्याचे, तडफड चरफड श्वासांचे
ऋतू पुस्तकी व्याख्यांचे, पुस्तककोर्‍या वासांचे
ऋतू इंद्रियांसाठीचे, खोल खूणांतील गाठींचे
ऋतू रोजच्या जगण्याचे, दिवसामागून रातींचे
ऋतू इतरचे येणारे, भीतर भीतर नेणारे

पाऊस पिऊन, वारं भरून
उन्हं पचवून, थंडी रिचवून
घुमत राहणं कमाल आहे;
डोळे लावून वाट पाहा
पदर खोचून स्वागत करा
दहाव्या दिवशी नावं ठेवा
नंतर म्हणा...’निघा आता’
पुढच्याची खिदमत करा,
वयासारखं वय वाढतं
नित्यक्रम टळत नाही
गोल गोल घुमत आपला
मूर्खपणा ढळत नाही;
कविता होण्याचे असतात ऋतू
ती मागण्याचेही असले पाहिजेत;
माझे कविता होण्याचे ऋतू जातात कुठे कळत नाही
नि तुझे कविता मागण्याचे ऋतू येतात कुठून कळत नाही;
ह्या सगळ्या अचरटपणाला एक नवा शब्द हवा जणू
तुझ्या ऋतूंची हरकत नसेल, तर आपण त्याला ‘ऋतणे’ म्हणू

माझं ऋतणं सध्यातरी पूर्वसूरींच्या ऋतण्यात आहे
माझ्या गहाण ऋतण्यात हल्ली माझी कविता रुतली आहे
माझे ऋतू कुठून आणू?
सोज्ज्वळ मोहक सुंदर गर्भार
मर्ढेकरी माघी सकाळी
शहरांत हल्ली होत नाहीत,
फ़रवरीच्या सर्दीमधल्या उन्हासारखं
नात्यांच्या कंगोर्‍यांचं गुलजारी कोरीवकाम
जमेल असं वाटत नाही,
जश्न-ए-बहाराच्या अस्तरात ख़िज़ा साजरं करणारं
समाज-भाषा-शब्दांचं अल्लद अख्तरी भान
नेमकं उतरणं कठीण आहे,
शाश्वत भय नि सोवळी दु:खं
संचिताच्या कोवळ्या ऋतूंहून अधिक ग्रेसफुली
झरतील असे वाटत नाही,
ग़ालबाएवढं दु:ख मला झालं तरी पुष्कळ आहे
अनभिज्ञाच्या दु:खऋतूंशी त्याचं तादात्म्य
साधणं तर दूर आहे,
गुलशनाचा कारोबार चालण्यासाठी तुझी गरज फ़ैज़ने पटवून दिल्यावर
सृष्टीचा गाडा वसंतावर तुझ्यासाठी अडलाय
हे मी वेगळं का सांगायला हवंय?
‘लावण्य जातसे ऊतू, वायाच चालला ऋतू’
असं म्हणून तू जीवाची दैना केलीस
तरी मी बोरकर कसा होऊ?
माझा असा एक ऋतू जरा कुठे उरला होता
‘एक मौसम रूह का है, जिसमें अब ज़िंदा हूँ मैं’ म्हणत
कोण कुठला अथर नफ़ीस तोसुद्धा जगून गेला

माझं ऋतणं गहाण आहे
त्यांचं ऋतणं महान आहे
ऋतुचक्राचा आस सध्या ढळेल असं वाटत नाही
परीघावरची फरफट माझी रुकेल असं वाटत नाही

Friday, June 25, 2010

मुझसे पहली सी मोहब्बत

ह्या कवितेच्या वेगवेगळ्या स्रोतांमध्ये ओळींचा क्रम व काही ओळींचा अंतर्भाव-अभाव ह्याबाबत काही पाठ्यभेद आढळले. मल्लिका-ए-तरन्नुम नूरजहाँ ह्यांनी पाकिस्तान सरकारच्या ‘ही फ़ैज़ अहमद फ़ैज़ ह्यांची कविता आहे, म्हणून ती गाऊ नका’ ह्या दबावाला न जुमानता ही कविता एका सार्वजनिक कार्यक्रमात सादर केली. त्यांच्या ह्या बंडखोरपणाचं कौतुक म्हणून फ़ैज़ ह्यांनी नूरजहाँ ह्यांना "ही कविता आता तुमची झाली," असं म्हणून बहाल केली. अशी गोष्ट नूरजहाँनीच त्यांच्या एका मुलाखतीत सांगितली आहे. त्यामुळे, नूरजहाँ ह्यांच्या आवाजातील आवृत्ती हीच इथे मूळ आवृत्ती म्हणून वापरली आहे [१].

मूळ कवितेचे देवनागरी अक्षरांतर [२, ३] ---

मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब ना माँग

मैंने समझा था की तू है तो दरख़्शाँ है हयात
तेरा ग़म है तो ग़म-ए-दहर का झगड़ा क्या है
तेरी सूरत से है आलम मे बहारों को सबात
तेरी आँखों के सिवा दुनिया में रक्खा क्या है
तू जो मिल जाये तो तक़दीर निगूँ हो जाये
यूँ ना था मैंने फ़क़त चाहा था यूँ हो जाये

अनगिनत सदीयों के तारीक बहिमाना तलिस्म
रेशम-ओ-अतलस-ओ-कमख़्वाब में बुनवाये हुये
जा-ब-जा बिकते हुये कूचा-ओ-बाज़ार में जिस्म
ख़ाक में लिथड़े हुये खून में नहलाये हुये
लौट जाती है उधर को भी नज़र क्या कीजे
अब भी दिलकश है तेरा हुस्न मग़र क्या कीजे
और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा
राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा

--- फ़ैज़ अहमद फ़ैज़
(संगीत व स्वर: नूरजहाँ)

मराठी भाषांतराचा प्रयत्न [३] ---

आधीची तसलीच प्रीत फिरुनी मागू नको तू अता

हे आयुष्य झळाळते तुजमुळे हे लख्ख दीठी ठसे
खंता सर्व तुझ्या मनास छळता शल्ये जनांची कुठे
होण्या तो मधुमासही अमर ही गाली सुचित्रा वसे
डोळे ते वगळून सांग उरते बाकी युगांची कुठे
होता तू मम नाचवीन नियती माझ्याच तालावरी
हे काही नव्हतेच, केवळ मला वाटे असावे जरी

काळ्याकुट्ट भयाण कैक करण्या केल्या युगांनी किती
गंडेदोर नि भर्जरी, अतलसी, धादांत ते रेशमी
बाजारांत खुल्याच देह विकले जाती हटांनी किती
काया त्या धुळमाखल्या निखरण्या रक्तास नाही कमी
जाताना वळते फिरून तिकडे दृष्टी; करावे कसे?
आताही तव रूप बावनकशी, त्या मी भुलावे कसे?
प्रीती ही जगती न अंतिम व्यथा, बाकी व्यथा केवढ्या
बाकीही असतात हर्षद कथा, ज्या मीलनाला उण्या

[१] खालील दुव्याद्वारे आपण अन्य संकेतस्थळावर पुनर्निर्देशित केले जाल. त्या संकेतस्थळावरील संभाव्य प्रताधिकारभंगाचे उत्तरदायित्व ह्या सूचनेद्वारे नाकारण्यात येत आहे.
दुवा - http://www.youtube.com/watch?v=3-9DxXRJPwE
[२] ह्या मूळ कलाकृतीचे प्रताधिकार मूळ प्रताधिकारधारकांकडे, लागू होत असल्यास, सुरक्षित आहेत.
[३] मूळ साहित्यकृतीचे अक्षरांतर, अक्षरांतरित पुनर्मुद्रण, किंवा भाषांतराने कोणत्याही प्रताधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे त्या प्रताधिकारधारकांनी निदर्शनास आणून दिल्यास सदर मजकूर ह्या संकेतस्थळावरून वगळण्यात येईल.

Tuesday, May 25, 2010

यह जफ़ा-ए-ग़म का चारा

अबिदा परवीन ह्यांच्या स्वरातील गझलेची आवृत्ती येथे ऐकता येतील [१].

मूळ गझलेचे देवनागरी अक्षरांतर [२, ३] ---

यह जफ़ा-ए-ग़म का चारा, वह नजात-ए-दिल का आलम
तेरा हुस्न दस्त-ए-ईसा, तेरी याद रूह-ए-मरिअम

दिल-ओ-जाँ फ़िदाएँ राहें, कभी आ के देख हमदम
सर कू-ए-दिल फ़िगाराँ, शब-ए-आरज़ू का आलम

तेरी दीद से सिवा है, तेरी शौक़ में बहाराँ
वह चमन जहाँ गिरी है तेरी गेसूओं की शबनम

लो सुनी गयी हमारी, यूँ फिरें हैं दिन के फिरसे
वहही गोशा-ए-क़फ़स है, वहही फ़स्ल-ए-गुल का मातम

यह अजब क़यामतें हैं, तेरी राहगुज़र में गुज़रा
ना हुआ के मर मिटें हम, ना हुआ के जी उठे हम

--- फ़ैज़ अहमद फ़ैज़

मराठी भाषांतराचा प्रयत्न [३] ---

गांजणार्‍या व्यथांवर उतारा, ती मनाच्या मुक्तीची झांजर
लावण्यात दयाहस्त येशू नि तुझी याद मरिअमचे अंतर

जीव ओवाळल्या पायवाटा कधी येऊन तूही पहा तर
विद्ध हृदयातल्या सर्व वाटा, आसावल्या रात्रींचा जागर

ज्या वसंता लळा लावला तू, तो नजरपारखासा तुला बघ
तो बहरला मळा, जेथ झरली वेणीवरल्या दवाची ती सर

दाद सादेस पाहा मिळाली, दिवस असेही येती फिरून कि
तोच तो कैदकोना इथेही, सुतकी तोच फुललेला मोहर

चालताना तुझ्या पायवाटे विचित्रसे हे येतात प्रलय कि
नाही गेलो पुरते लयाला वा झालो सचेतन त्यानंतर

[१] खालील दुव्याद्वारे आपण अन्य संकेतस्थळावर पुनर्निर्देशित केले जाल. त्या संकेतस्थळावरील संभाव्य प्रताधिकारभंगाचे उत्तरदायित्व ह्या सूचनेद्वारे नाकारण्यात येत आहे.
[२] ह्या मूळ कलाकृतीचे प्रताधिकार मूळ प्रताधिकारधारकांकडे, लागू होत असल्यास, सुरक्षित आहेत.
[३] मूळ साहित्यकृतीचे अक्षरांतर, अक्षरांतरित पुनर्मुद्रण, किंवा भाषांतराने कोणत्याही प्रताधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे त्या प्रताधिकारधारकांनी निदर्शनास आणून दिल्यास सदर मजकूर ह्या संकेतस्थळावरून वगळण्यात येईल.

Monday, May 24, 2010

आठवतात अजून

आठवतात अजून
कंटाळलेल्या पोरासारखे
दोन्ही हातांच्या मुठी
दोन्ही गालांत खुपसून
त्या खोबणीत ठेवलेल्या हनुवटीवर
ओठ मुडपून
शून्यात रोखलेले
स्वप्नाळलेले निर्वेध अनभिज्ञ डोळे
आठवतात अजून

आठवतात अजून
एका हाताची मूठ डोक्यावर मागे ठेवून
मूठ वळलेला दुसरा हात फक्त कोपरात वाकवून
नि त्याचा खांदा जरासा ताणून
बिनदिक्कत दिलेले मनमुराद आळोखेपिळोखे
आठवतात अजून

आठवतात अजून
जगाच्या अनोळखी, अर्थहीन प्रश्नांना
उत्तर देण्याच्या फंदातही न पडता
"काय ते?" असले प्रश्नार्थक झालेले डोळे
नि "अंS" असं काहीसं म्हणणारे निष्कपट आवाज
आठवतात अजून

आठवतात अजून
त्या कंटाळ्यातही
अचानक मनचं दिसलं काही
की जराही अडकून न पडता
त्या गोतवळ्यातून
स्वत:ला लगोलग सोडवून
तिकडे धावणारे स्वच्छंदी पाय
आठवतात अजून

आठवतात अजून
त्या मनस्वी निरागस विश्वाला
जगाशी सांधणारे
नि त्या विश्वांमधील
स्वत:च्या मर्जीवर चाललेली आतबाहेर
बेलगाम होऊ देणारे
निर्व्याज आश्वासक हात
आठवतात अजून

आठवतात अजून
एकसंध आरशात निरखून पाहताना
माझ्या विखुरलेल्या प्रतिबिंबांचं कोलाज जुळतं तेव्हा
नि कधी तुझ्या ते बिंबात दिसल्यावर
तुझा अनसूयेने हेवा वाटतो तेव्हा
आठवतात अजून.

Wednesday, April 21, 2010

निमिषा,

जोडलेली माणसं तोडण्याच्या संध्याकाळी
हे तोडावं की तुटू द्यावं ह्या यक्षप्रश्नात
मी आरक्त बुडलो असताना
रात्रीचा पडदा ओढण्याची तुला कोण घाई झाली होती.
पडद्याची उघडझाप करून त्या सापळ्यात
जयद्रथाला पकडण्यासारखी चमत्कारिक क्षमता तुझ्यात नव्हती,
तर निदान थोडा धीर धरून वाट पाहायची होतीस -
ह्या निष्प्राण तळ्याकाठी माझ्यात धर्म सर्जतोय का ह्याची.

दुसरा युधिष्ठिर निर्माण होऊ न देण्याचा
द्रोणाचार्यमक्ता तू घेतला होतास काय?

तुझ्या क्रौर्याची कल्पना
तू त्यांचं बॅड लाइटचं अपील उचलून धरलं होतंस
तेव्हाच खरं तर मला आली होती.
नि वॉर्निंग बेलच्या आधीच असा
पेपर हातातून हिसकावून घेताना तर
तू आता कहर केला आहेस.

काळा बाळा, तुला कळतंय का
की सामना अनिर्णित ठेवण्याचा पर्याय
मला उपलब्धच नव्हता ते?
हे अस्ताचे शंखनाद विजयोन्मादाचे आहेत;
ते काही गिरण्यांचे सकाळसंध्याकाळचे भोंगे नव्हेत.
आपलं सर्वसाक्षित्व, अखंडत्व, प्रवाहित्व उमजून
किमान तू तरी
आजचं मरण उद्यावर ढकलणारी
खेळाचे नियम इत्यादीची
ही बाष्कळ चाकोरी
निर्भय होऊन झुगारून द्यायला हवी होतीस.
का तुलाही आता आवडू लागलंय
हे ऑफिस टाइम युद्ध?

दिवसभर
रणावर
हव्या तशा नियमांचे
हवे तसे अर्थ लावून
कधी रोखून, कधी जोखून
कधी आखून, कधी माखून
कधी राखून, कधी चाखून
चक्रव्यूहाशिवायही
नि:शस्त्राला आत घेऊन
मुरारबाजीचं धड होऊन
एकामेकी तुटून पडू
तुटायचंय तर जोडताय कुठे
दिवस येतात सुटे सुटे
पाचा दिवसांचा पाचुंदा
जल्लोषाने बांधूया
जल्लोषाला चिता बर्‍या
रेडीमेड शेकोट्या
शेकोटीला हल्ली तो म्हातारा येत नाही
बाणांच्या खाटेवर निजूनसुद्धा चचत नाही
आम्हांला त्याचे काय? त्याच्या जखमा कोण स्मरेल?
मरायचा तेव्हा मरेल, त्याला हवं तेव्हा मरेल
म्हातार्‍याला जखमा फार,
गोतावळ्याच्या चिंता फार
एकटं एकटं जगूनसुद्धा सगळंच म्हणतो सुटत नाही
बाकीच्यांनी तोडलं तरी सगळंच म्हणतो तुटत नाही

त्याचे हे प्रश्न सोडवत मी इथे निकराने उभा आहे
तो काय गंमत म्हणून?
ते आता माझेही झालेत हे तुला कळू नये
म्हणजे कमाल झाली.
त्या बेफिकीर, सोप्या सोप्या,
गोग्गोड, सुट्या सुट्या
जगाशी सामील झालेल्या तुला
काही गहन प्रश्न आता झेपतील असं मला वाटत नाही.
त्यामुळे तुझ्यावर ते सोपवण्याचं व्यासधैर्य मला होत नाही,
किमान म्हणून तरी
जरा धीर धरला असतास
तर निमिषा, तुला असा कुठे जायला उशीर होत होता?

Thursday, March 18, 2010

अब के हम बिछड़े

अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें
जिस तरह सुखे हुए फूल किताबों में मिलें

तू ख़ुदा है न मेरा इश्क़ फ़रिश्तों जैसा
दोनों इन्साँ हैं तो क्यूँ इतने हिजाबों में मिलें

ढ़ूँढ़ उजड़े हुए लोगों में वफ़ा के मोती
ये ख़ज़ाने तुझे मुम्किन है ख़राबों में मिलें

ग़म-ए-दुनिया भी ग़म-ए-यार में शामिल कर लो
नशा बढ़ता है शराबें जो शराबों में मिलें

आज हम दार पे खेंचे गए जिन बातों पर
क्या अजब कल वो जमाने को निसाबों में मिलें

अब ना वो मैं हूँ, ना तू है, ना वो माज़ी है फ़राज़
जैसे दो शख़्स तमन्ना के सराबों में मिलें

--- अहमद फ़राज़


आजला दुरावता फक्त स्वप्नगाठ ना?
पुस्तकांत पाकळ्या सापडोत वाळल्या

तू नव्हे शिवा, न ही प्रीत ईशदूत वा
दोन जीव भेटले अडसरांत केवढ्या!

शोध भंगल्या उरी तू इमानमाणिके
ठेव ही मिळे तळी येथ धूळधाणल्या

ह्या व्यथांत गावच्या मैत्रशल्य जोड ना
वाढते नशा जरा मद्यमद्य मिसळता

ओढती सुळाकडे आज जीच कारणे
वाटतील ती उद्या ह्या जगास संपदा

आज मी न, तू न, तो कालही न आजला
भेटले जणू कुणी मृगजळी मनातल्या

Saturday, March 13, 2010

रायटर्स ब्लॉक

वाहता वाहता एकदा ती धडामदिशी कोसळली
वाहणं-बिहीणं सोडून एक वाईट खोड चिकटली
पाहून तिला पडताना चार जण म्हणाले
पारणं फिटली डोळ्यांची, श्रम सारे निमाले
झिरपत झिरपत जायचं दूर, उरात साठवून उधाणपूर
झोकून देण्या कड्यावरून, दरीकपारी घुमवत सूर
हे सोडून, तिने तेव्हा उंची मोजण्याचा घातला घाट
घुटमळली ती, लोकांनीच मग काठावरती बांधला घाट

लिहिता लिहिता त्याने चक्क समीक्षेचा घाट घातला
त्याच्यामधला कवी मग पॉलिट ब्युरोत दाखल झाला
हिमालय मोजता मोजता सह्याद्री खुजा झाला
'रायटर्स ब्लॉक' म्हणत त्याने कवी थोडा जगवत ठेवला

Wednesday, March 10, 2010

थोड़ी सी रात और है…

सकाळी सकाळी स्नूझ स्नूझ करत तडफडतानासुद्धा


तुझं डोकं

 


“जागे हैं देर तक हमें कुछ देर सोने दो…”

असं ग़ुलज़ारू होत असेल ना?

मग पुन्हा गजर खणखणण्यापूर्वीची पाच मिनिटं


तू कशी काढतोस?


रात्रभर चाललेला


कानठळ्या बसविणारा


प्रतिमांचा अनियंत्रित जागर

 


शमला ह्या सुखात,


की त्या कोलाहलातून
नाहक उरून
घर करून बसलेलं


काकूछाप अनाम बाईचं

 

हो, हो, मला सोळा भाषा येतात,”

 


असलं संदर्भहीन वाक्य

 


आता भंडावून सोडत


आपल्याला स्वत:समोर खुजं करत


आंतर्बाह्य पोखरून काढणार ह्या भीतीत,

 


की बेलगाम धावणाऱ्या मेंदूला


स्वप्नांचं गोंडस रूप देऊन


भास भास म्हणत

त्याची जबाबदारी तुला आता जागेपणी झटकता येणार नाही


ह्या दडपणात,

 


की आजूबाजूची प्रत्येक गोष्ट ग्रहण करत सुटलेल़्या


पंचेंद्रियांचं अनाठायी ओझं


मेंदूला आता पेलणार नाही, ह्या चिंतेत?



तुझ्या चेहऱ्यावरचा सकाळीचा थकवा


अशांत रात्रीचा,

 


की

आ वासून ठाकलेल्या
अनिवार्य दिवसाचा,

 


की प्रतिभेची
वाट बघत
वास्तवाचे
रंग, पोत,
गंध, नाद


रवंथ करत


निव्वळ साचणाऱ्या


संचिताच्या कोवळ्या ऋतूंचा?

कळ्या घ्या, फुलं

द्या


असल्या ह्या प्रतिभेसाठी
एवढं असं झुरत राहणं
खरंच का आहे वर्थ?


सामावून घेत राहण्याला


खरंच का आहे अर्थ?



विक्षिप्तसे वाटेलही


तरीही ऐकून घे
डोक्याचे हे फिर फिर फिरणे
प्रतिक्षिप्तसे झाले आहे.

 


थोडा वेळ तरी तुझे

 


प्रश्न जरा आवरून घे


किती काळ

डोळे असे

ठेवायचे मी सताड उघडे?
दिवसरात्र जाऊ देत


पहाटे तरी निदान मला


पाच मिनिटं झोपू दे.