Friday, January 30, 2009

सदूचा २६ जानेवारी

२६ जानेवारीची सुट्टी म्हणून सदू अंमळ आरामातच उठला. वीकांताला जोडून सुट्टी आली तरी त्याने यंदा काहीच प्ल॓न केला नव्हता. कुणी म्हणे रेल्वे हेच अतिरेक्यांचं लक्ष्य आहे, तर कुणी म्हणे महत्त्वाची पर्यटन स्थळं. कुणी विमानतळांचही नाव घेई. पण त्यातून फिरायचा सदूने कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे यंदा संक्रांत कोणावर येणार ह्याची वाट पाहत सदू बसला होता. त्याला असं प्रामाणिकपणे वाटत होतं की ह्या अतिरेकी हल्ल्यांच्या सूचना थोड्या दिवसांनी सगळं आलबेल म्हणून काढून घेतल्या जातील. इथल्या व्यवस्था त्याला येथपुढे ह्या ना त्या कारणावरून घाबरवित राहणार, असं काही त्याला सुचण्याची सुतराम शक्यता नव्हती. सदू तसा भाबडा मनुष्य आहे. साधारण कधीपर्यंत संक्रात येण्यापासून सावध रहायला हवं, ह्याचं उत्तर त्याने हळदीकुंकवांचं लॉजिक वापरून "रथसप्तमीपर्यंत" असं स्वतःशी ठरवलं होतं. शिवाय यंदा विलासरावही नव्हते. त्यांच्यावर यंदा संक्रांत रेट्रोअ॓क्टिवली आली होती. शासकीय व प्रतिशब्दवाल्यांच्या मराठीत ह्याला पूर्वलक्ष्यी प्रभावाने असं म्हणण्याची प्रथा आहे. त्यामुळे संक्रातीचा ताजा कोटा बाकी होता. वर काही च्यानेलं २६ ला अमावस्या आहे नि त्यातही सूर्यग्रहण असा भर पौषात उल्हसित होऊन शिमगा करीत होती. म्हणून विषाची परीक्षा नको म्हणून सदूने घरीच रहायचं ठरवलं.

सकाळी वर्तमानपत्रं हातात घेऊन तो पद्म पुरस्कारांची यादी वाचू लागला. नावं माहित असोत, नसोत, पण सदू ही यादी न चुकता वाचतो. ती यादी वाचताना तो एकदम कोसळलाच. चहाचा कप त्याने सावरला म्हणून नाही तर, शिमग्याच्या जोडीला रंगपंचमीही झाली असती. सदूने लागलीच गल्लीसुंदरी होऊ पाहणार्‍या आपल्या मुलीला प्रोत्साहन देऊन स्पर्धेत भाग घ्यायला लावला. हे असं अचानक कसं झालं, ह्या विचाराने मुलीला चहाच्या पहिल्या घोटातच ठसका लागला. "चाळीच्या गणेशोत्सवाच्या नाटकातसुद्धा तुला कुणी घेणार नाही," असं आपल्या मुलाला म्हणणारा सदू त्याला चक्क "तू फिल्ममध्ये का नाही करीअर करीत?" असं विचारू लागला, तेव्हा त्याच्या मुलाचा चेहरा भारतभूषणहून भावशून्य झाला. ऐश्वर्या राय व अक्षय कुमार हे तुमचे आदर्श असले पाहिजेत, असं त्यानं मुलांना समजावून सांगितलं व तो कृतार्थ भावनेने प्रजासत्ताक सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहू लागला. अनेक च्यानलवाले तो सोहळा थेट दाखविताना आपला मसाला कशास भरीत होते, हे काही त्यास उमगेना. रविवारी फारच मसालेदार जेवण झालेलं असावं असा त्याने एक अंदाज बांधला व तो निमूट पाहू लागला. सदू लाल किल्ल्यावर राष्ट्रगीत सुरू झालं, तरी घरात सीधा उभा राहणारा साधासीधा माणूस आहे. त्यामुळे त्यानं तो सोहळा अतिशय तन्मयतेने पाहिला. करकरे, कामटे, ओंबळे वगैरे नावं ऐकली तेव्हा त्याला दोन महिन्यांपूर्वीच्या आठवणीने गहिवरून आलं. त्यानं "आज गोडधोड करायचं नाही घरात" असं फर्मान सोडून दिलं. प्रजासत्ताक दिनाचं त्याला रीतसर स्फुरण चढलं होतं.

दुपारची जेवणं झाली नि सदू प्रजासत्ताकाच्या स्फुरणातच वामकुक्षी काढण्यासाठी पडला. पण त्याच्या डोक्यात मात्र सकाळचंच चालू होतं. इशारा, धोका, पिवळा रंग, केशरी रंग, लाल रंग असे रंगीत धोके त्याला दिसू लागले, आज तारीख २६ असं त्याला वारंवार कुणीतरी बजावतंय, असे भास होऊ लागले. आपल्याच घरात सुट्टीच्या दिवशी दुपारी भयंकर स्वप्नं पडू लागली तेव्हा सदू हैराण झाला. उठून तो एक चक्कर मारून येतो असं म्हणून बाहेर पडला. त्याने पाऊल बाहेर टाकायच्या आधी त्याच्या बायकोने देव पाण्यात ठेवले. सदू निमूट बाहेर पडला. चौकाचौकात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारे फलक झळकत होते. सकाळचे झेंडे पडून पायतळी लोळत पडले होते. लोक लगबगीने कुठेतरी जात होते. सुट्टीचे म्हणून असतील जात भटकायला असं सदूला वाटलं. तर ते सगळे मॉलमध्ये विंडो शॉपिंग करण्यासाठी जात होते. म्हणजे ती महत्त्वाची पर्यटन स्थळं म्हणजे मॉल असं सदूला लक्षात आलं. तेव्हा आपल्याला त्यांच्यापासून भ्यायचं कारण नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याचा जीव जरा भांड्यात पडला. जरा मोकळी हवा खाल्ल्यावर त्यालाही बरं वाटू लागलं. नि हवेपासून धोका आहे असं कुणी अद्याप सांगितलं नसल्याचं त्याला आठवलं. तो मनोमन प्रसन्न झाला. त्या धुंदीत तो इतका सुखावला, की थेट रात्रीच घरी परतला.

एवाना बायकोने उत्साहाला आवर घालून देव बाहेर काढून ठेवले होते. झोपताना प्रसन्न चित्ताने झोपावं म्हणून त्याने त्याचा सर्वांत आवडता गाण्याचा कार्यक्रम लावला. ह्या निखळ आनंदाने त्याला गेले काही महिने भुरळ घातली होती. सूर तेच होते, पण आज तिथेही वेगळाच नूर होता. कुठल्याशा हिंदू राष्ट्राचा प्रजासत्ताक दिन ते साजरा करीत होते. एक आजोबा मधाळ भाषेत बोलत होते. पण जे काही ते बोलत होते ते मधाळ होतं की जहरी, हे काही सदूच्या अल्पमतीस कळेना. लहान लहान मुलं जिवाच्या आकांताने "आर्यांच्या राज्यावर म्लेच्छांचा घाला" असं काहीतरी गाऊ लागली, तेव्हा सदू गांगरला. त्याने मुलांना आत पाठवलं. प्रजासत्ताक दिन म्हणून "हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा" असं गाणं लागल्यावर सदूचा चेहरा पडला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य नव्हे तर राजेशाही असते, हे आपल्याला कधीच कसं कळलं नाही ह्या विचाराने त्याला अपार खिन्नता आली. त्याने दिवसभर जपलेल्या लोकशाही प्रजासत्ताकाविषयीच्या अभिमानाचा असा चक्काचूर होताना त्याला पाहवेना. त्याला अन्न गेलं नाही. त्याने नाही म्हणताच बायकोने पटापटा लवकरच जेवणं उरकून घेतली. आवरता आवरता "आज कसं शांतचित्ताने असंभव पाहता येईल" असं ती म्हणत होती. सदू असंभव पाहत नाही. त्याला गीतेचा दुसरा अध्याय तो खूप मोठा आहे, म्हणून शाळेपासूनच आवडत नाही. तिथे आत्मे कपड्यांसारखी शरीरं बदलू लागले की तो मुकाट कपडे बदलून झोपून जातो. पण आज त्याला काय संभव, काय असंभव तेही कळेना. म्हणून तो असंभवसुद्धा निमूट पाहू लागला. त्याचबरोबर त्याच्यावर लादण्यात आलेली यदृच्छा भीती पुन्हा एकदा चौफेर दाटून आली. त्यात दाखवितात ते संभव की असंभव, ह्या विचाराने तर तो पुन्हा गोंधळून गेला. घरच्या लोकांपासूनही आता सावध रहायला हवं असं काहीसं त्याला एका अज्ञात क्षणी वाटलं नि त्याचं उसनं अवसान पुन्हा एकदा गळून पडलं. त्याच्या डोक्यात एकच गाणं त्याला रूढार्थाने झोप लागेपर्यंत घोळत राहिलं..."मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई, ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई".

Monday, January 19, 2009

मु.पो. वॉशिंग्टन

आज सोमवारी अमेरिका मार्टिन ल्यूथर किंग ह्यांची सत्तरावी जयंती साजरी करत आहे व उद्या मंगळवारी बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ ग्रहण करतील. सत्तर वर्षांपूर्वीसारखी घरघर लागलेली अर्थव्यवस्था योगायोगाने पार्श्वभूमीवर आहे. सत्तांतराच्या ह्या सोहळ्याला न भूतो असा जनसागर उसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संपूर्ण वॉशिंग्टन, डी. सी. व आजूबाजूच्या भागात रस्त्यावर वाहने चालविणे व कुठेही जाणे दुरापास्त होण्याची शक्यता आहे. अनेक रस्ते, मेट्रो ट्रेन स्टेशन बंद असणार आहेत. अनेक ठिकाणी ह्या उद्घाटन सोहळ्याचं व त्यातील संचलनाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक जण आधीच शहरात व आसपासच्या परिसरात आगाऊ येऊन राहिले आहेत. संचलनाच्या मार्गाच्या आजूबाजूचा परिसर, शहरातील इतर निवासी भाग, आजूबाजूचे मेरीलँड, वर्जिनिया राज्यांचे भाग येथे केवळ ह्या सोहळ्यासाठी म्हणून अमेरिकेच्या इतर भागांतून आलेल्या अनेक जणांनी काही दिवस, आठवडा, काही आठवडे, महिना अशा विविध कालावधींसाठी घरे भाड्याने घेतली आहेत. सर्व हॉटेलांमधील आरक्षण आधीच भरलं आहे. रस्त्यावरील संभाव्य वाहतुकीची कोंडी, बंद ठेवण्यात येणारे रस्ते, शहरात उसळणारी संभाव्य अलोट गर्दी ह्यासंबंधी सूचना देणार‍्या साईन सर्वत्र दिसू लागल्या आहेत. कडाक्याच्या थंडीला न जुमानता अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करण्यासाठी एक भव्य सोहळा होणार अशी चिह्ने आहेत व त्या सोहळ्याचे पडघम आता अधिकाधिक जोरात वाजू लागले आहेत.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा नेहमीच जगाच्या चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे २००८च्या निवडणूकांनाही अर्थातच जागतिक महत्त्व होतं. पण अमेरिकेत विद्यापीठात शिकणे म्हणजे कम्युनिस्ट राज्याच्या वरताण भिंतींनी वेढलेल्या बेटावर राहिल्यासारखा प्रकार असल्यामुळे मी सर्व निवडणूक प्रचार, धामधूम ह्यांपासून प्रथमपासूनच अलिप्त होतो. दूरदर्शन नामक प्रसारमाध्यमाशी दुरान्वयानेही संपर्क नसल्यामुळे चोवीस तास कोणीही बातम्या माथी मारत नव्हते. नाही म्हणायला अमेरिकेत शिकून अमेरिकेतच नोकरी करू लागलेल्या मित्रांकडून टीव्हीवरील बातम्या कधीमधी कळत होत्या. पण मला काही त्यांच्यातील बर्‍याच जणांप्रमाणे आजूबाजूला जग आहे असं नव्याने कळलं नव्हतं. नि त्यामुळे तेही पहावं असं वाटून राजकारण, अर्थकारण ह्यांत अवास्तव रस दाखविण्याची हुक्की आली नव्हती. राजकारणाविषयी असली नव्याची नवलाई नसल्याने मी आपली नेमाने मिळेल ती माहिती वाचून, ऐकून, पाहून होतो. कधी मित्रांत थोड्या चर्चा वगैरे. पण ह्याहून अधिक काही नाही. बराक ओबामा आमच्या विद्यापीठात भाषण ठोकायला आले होते तेव्हाही कुठल्याश्या टुकार पण न टाळता येणार्‍या मीटिंगपायी ते ऐकायला न जाण्याचा करंटेपणा माझ्या हातून घडला होता. वास्तविक तेव्हा माझी प्रथम पसंती हिलरीताईंना असल्यामुळेही मी ती मीटिंग टाळण्याचा फार आटापीटा केला नाही. त्यामुळे ह्या सगळ्या विषयावर माझा खळखळाट मी कटाक्षाने टाळला होता. परंतु जेव्हा एक डोळा अमेरिकेवर नि दुसरा डोळा अमेरिकाविरोधकांवर ठेवणार्‍यांचे खास अमेरिकन निवडणूकांवरील स्तंभ वर्तमानपत्रात वाचले तेव्हा मात्र एवढं सुमार तर आपणही लिहू शकू असा एक आत्मविश्वास मनात निर्माण झाला. आज वरातीमागून घोडे दामटविण्यासाठी वेळ मिळाला व त्यातूनच हा लेखप्रपंच.

जेव्हा निवडणूकपूर्व पक्षांतर्गत निवडणूका सुरू झाल्या तेव्हा बराक ओबामा हे नाव मी प्रथम ऐकलं नि हिलरी क्लिंटन वगळता अनोळखी असणार्‍या इतर संभाव्य उमेदवारांच्या यादीत ढकलून दिलं. कालांतराने एकेक नाव मागे पडलं नि सरतेशेवटी हिलरीताई व बराकभाऊ उरले. रिपब्लिकन लोकही प्रसारमाध्यमांमधील वास्तव्य टिकवून ठेवण्यासाठी म॓केन ह्यांनी जवळपास निश्चित अशी आघाडी घेऊनही काही दिवस निवडणूका घेत राहिले, पण पुढे पक्षांतर्गत स्पर्धेचा आव आणणे कठीण होत चालल्यामुळे बहुदा त्यांची उमेदवारी जाहीर करून विषय संपवून स्वस्थ बसले. डेमोक्र॓टिक लोकांचं मात्र भिजत घोंगडं चिक्कार दिवस तसंच पडून राहिलं नि त्या पार्श्वभूमीवर हिलरीताई व बराकभाऊंच्या बाजूने व विरोधात वादविवादांच्या अनेक फैरी झडल्या. त्याच वेळी अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष जर डेमोक्र॓टिक पक्षाचा झाला तर अमेरिकेला प्रथम महिला किंवा प्रथम अ॓फ्रो‍-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लाभून इतिहास घडणार हे निश्चित झालं होतं. डेमोक्र॓टिक पक्षाचा कोणीही उमेदवार विजयी होईल अशी स्थिती होती म्हणून डेमोक्र॓टिक पक्षाने महिला अथवा अ॓फ्रो‍-अमेरिकन व्यक्तीला उमेदवारी देण्याचं धाडस केलं का? हा प्रश्न माझ्यासाठी कुणीच सोडविला नाही. त्यासाठी मला बहुदा २०१२ पर्यंत थांबावे लागेल. कारण आता हा प्रश्न कुणीही विचारणार नसला तरीही लोकांची मानसिकता काही एका निवडणूकीत बदलत नसते.

हिलरीताईंच्या बहुतांश योजना विशेषतः आरोग्यसुरक्षाविषयक धोरण हे अधिक तपशीलवार व सुसंगत आहे असं माझं आपलं एक प्राथमिक मत. पण सर्वसाधारणपणे ह्या विषयावर सर्व डेमोक्र॓टिक जनता सरदार सरोवर प्रकरणी तमाम गुजरात एक होतो तद्वत एक होत असल्यामुळे हा काही फार महत्त्वाचा मुद्दा नसावा असं मला वाटत होतं. पण मध्ये ह्याच विषयावरून दोघांत खडाजंगी होऊन जुंपली. तेव्हाही बराकभाऊ आपल्या प्रियंवदा बोलीत फार मोघम बोलतात असं आपलं माझं मत. शिवाय बराक ओबामा ह्या नावावर जीव ओवाळून टाकलेल्या जनतेपैकी किमान ९० टक्के जनता त्यांच्याविषयी बोलताना प्रथम वाक्य, "काय सुंदर वक्ता आहे तो" असं घेत असल्यामुळे मी त्यांच्यापासून अधिक दूर. कारण चांगलं काय नरेंद्र मोदीसुद्धा बोलतात असं माझं एक त्यावर ठेवणीतलं उत्तर होतं. भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी ते अजित जोगी ह्या एकेकाळच्या मला चांगलं बोलतात म्हणून आवडणार्‍या पक्षप्रवक्त्यांनी एक तर मुख्यमंत्री झाल्यानंतर मला तोंडघाशी पाडलं. तेव्हापासून मी कोणी चांगला बोलतो ह्या क्वॉलिफिकेशनला जराही भाव देत नाही. फार फार तर बुशकाकांच्या बहुचर्चित वक्तृत्वाच्या पार्श्वभूमीवर वक्तृत्वाला महत्त्व देण्यास मी तयार होतो, पण तेवढंच. शिवाय मला कुठल्यावेळी काय आठवेल ह्याचा नेम नसल्यामुळे माझ्या डोक्यात आपलं एकच "दुर्जनो प्रियवादी च नैतद् विश्वासकारणम्..." त्यामुळे माझ्यालेखी त्याच्या अमोघ वकीली वक्तृत्वाला शून्य किंमत होती. शिवाय माझा राजकारणातील तथाकथित घराणेशाहीविरुद्ध कुठलाही लढा नसल्यामुळे बुश-क्लिंटन घराण्यांच्या गेल्या वीस वर्षांच्या सत्तेतून अमेरिका मुक्त झाली पाहिजे असली कोणतीही नैतिक जबाबदारी माझ्यावर नव्हती. बराकभाऊ आऊटसोर्सिंगच्या बाजूनेही फारसे उत्साही नसल्यामुळे त्याही फ्रंटवर त्यांची भूमिका तद्दन भूमिपुत्रवादी वाटत होती. बरं माणूस जर एवढा थोर आहे, तर त्याने युद्धाविरोधी न बोलता युद्धखोरीविरोधी बोलावं, तर तेही नाही. पुन्हा इराकयुद्धाला प्रखर विरोध करून अफगाणिस्तानात दुर्लक्ष होतंय असं हा माणूस बिनबोभाट खुलेआम बोलतो. अमेरिकन संसदेत पक्षादेश वगैरे भानगड दोनच पक्ष असल्यामुळे नसावी. त्यामुळे कुठल्याही विधेयकावर कुठल्याही पक्षाचा कोणीही उठून आय, नाय कायपण म्हणतो. त्यामुळे कुणी कुठल्या विधेयकाच्या बाजूने मतदान केले अथवा विरोधात केले, किती विधेयकांवर तसे केले ह्याची आकडेवारी एकमेकांवर फेकणे हा येथील निवडणूकपूर्व वादविवादांचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे हिलरीताईंनी इराक युद्धाला पाठिंबा दिला होता ह्याचं भांडवल किती करावं ह्याला माझ्या लेखी मर्यादा होत्या. शेवटी वाहत्या गंगेत विधेयकाच्या बाजूने मत देणे नि राष्ट्राध्यक्ष म्हणून युद्ध पुकारणे ह्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. नि एक महिला राष्ट्राध्यक्ष युद्धखोरीविरोधात अधिक मानवतावादी व सम्यक भूमिका घेईल अशी माझी एक (भाबडी) समजूत आहे. परिणामी माझ्या लेखी तरी बराकभाऊंचं पारडं काही जड होईना. सरतेशेवटी पक्षांतर्गत निवडणूकीचा कौल शिरसावंद्य मानून बराकभाऊ डेमोक्र॓टिक पक्षाचे उमेदवार झाले. हिलरीताईंनी त्यांना राजकारणात दुर्मिळ असणार्‍या जिंदादिलीने संपूर्ण सहकार्य करण्याची राणाभीमदेवी घोषणा केली व माझ्यासाठी मला तो विषय संपवावा लागला. तेथून पुढे व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा, मत व्यक्तीला नव्हे तर पक्षाला द्यायचं असतं, ह्या संसदीय लोकशाहीच्या पक्क्या धारणा अध्यक्षीय लोकशाहीसाठी वापरून केवळ डेमोक्र॓टिक पक्षाचा उमेदवार म्हणून बराकभाऊंना मी माझं मत जर संधी असती तर दिलं असतं.

ह्या सर्व प्रकारात डेमोक्र॓टिक पक्षाच्या मध्यममार्गी भूमिकेशी असणारी तत्त्वत: जवळीक ही पार्श्वभूमीला होती. म्हणजे डाव्या-मध्यममार्गी भूमिकेच्या जवळ उजव्यांपेक्षा मधले असतात, नि हे दोन सोडून अमेरिकेत कोणीच म्हणावे असे नसतात म्हणून. पण भारतीय राजकारणात एकतर स्वारस्य नसलेली, असल्यास डोळे झाकून उजवी असलेली तमाम देसी जनता इथे किस खुशी में डेमोक्र॓टिक पक्षाच्या बाजूने आहे ह्यो काय मला अजून समजलेला नाही. म्हणजे एकाच वेळेस मोदी व ओबामा ह्यांचे समर्थक असण्यासाठी लागणारी वैचारिक सुसंगती कुठे शिकवतात, हे मला कुणी सांगेल का? नि जर ती न शिकवता कळण्याएवढी स्वाभाविक असेल तर मी किती बेअक्कल आहे हा विचार मला राहून राहून त्रास देत आहे. हा केंद्रात सत्तेत, आसामात विरोधात, राज्यात एकांबरोबर, पुण्यात दुसर्‍यांबरोबर अशासारखा एखादा राष्ट्रवादी विचार आहे काय, की आपण मारे आपले कृष्णवर्णीयविरोधाचे पूर्वग्रह, वांशिक भेद मनापासून जपले तरी इथला श्वेतवर्णीय शेवटी आपल्यालाही भाव देत नाही अशी झालेली उपरती आहे, की कुठल्याशा वस्तुनिष्ठतेच्या अनाकलनीय कसोट्या ह्यांना अवगत आहेत, ज्या आधारे त्यांना असे निर्णय बिनदिक्कत घेता येतात, की हाही केवळ स्वार्थी सोयीस्कर पर्याय आहे हे मला अद्याप कळलेले नाही.

उमेदवारी जाहीर होईस्तोवर एवढा गहजब करूनही शेवटपर्यंत काही कुणी ठामपणे सांगेना कोण जिंकेल ते. वास्तविक उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये झालेल्या वादविवादानंतरही जर प्रश्न उरले असतील तर म्हणजे कठीण काम होतं, म्हणजे उद्या म॓केन निवर्तले तर सारा प॓लिन राष्ट्राध्यक्ष होतील ह्या भीतीने नव्हे. मूळात म॓केन हे कसे म्हातारे आहेत, त्यांना कसा क॓न्सर झाला होता, नि त्यामुळे त्यांच्या पश्चात साराताई, नको, साराबाई कशा काय सांभाळणार कारभार, हा काही चर्चेचा विषय असू शकतो का? एखाद्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराचा मृत्यू होईल, हे काही चर्चेचं गृहीतक असू शकतं का? नि वर ते गृहीतक किती शक्य आहे ह्याचे दाखले देऊन गृहीतक सबळ होत असलं तरी त्याधारित केलेली चर्चा समर्थनीय होऊ शकते का? हे प्रश्न संपूर्ण अमेरिकेत फक्त मलाच पडलेत की काय असंही मला राहून राहून वाटत होतं. मला एक तर काही तरी सदैव प्रश्न उभे करणारा मानसिक आजार झाला आहे किंवा लवकरच होणार आहे अशी मला खात्री वाटत चालली आहे. तर ह्या भीतीने नव्हे, पण ह्या मिस अलास्का बाई जे बरळत होत्या त्यावरूनच त्यांना मत द्यायचं का हा विषय संपायला हवा होता. ह्या रिपब्लिकन पक्षाच्या सुषमाताई स्वराज त्या चर्चेत "आम्ही वॉल स्ट्रीटवरील बेबंदशाही मोडून काढू" असं म्हणाल्या तेव्हा त्यांचं भाषण प्रकाश करातांनी लिहून दिलंय का असं मला प्रामाणिकपणे वाटलं होतं. पण ह्या बाई त्याच श्वासात "सरकारने लोकांमध्ये फार लुडबूड करता कामा नये" असं काहीसं म्हणाल्या. म्हंजे कसं ते? म्हणजे मान्य आहे की, स्वतःच्या राष्ट्रात किमान लुडबूड करून इतर राष्ट्रांमध्ये कमाल लुडबूड करणे हा अमेरिकन लोकशाही शासनांचा मंत्र आहे, पण तरीही एका दमात बोललेल्या ह्या दोन वाक्यांची सुसंगती काही मला घडेना. म्हणजे आता कोणी साराबाईंवर असिफ अली झरदारी स्टाईल भाळून त्यांना मत देणार असेल तर भाग निराळा, पण एरवी कुठल्याही प्रश्नावर अलास्का प्रोटोटाईप उत्तर देणार्‍या ह्या बाईंना मत द्यायची काही एक गरज नव्हती. पण विरोधासाठी एवढे ठोस मुद्दे असताना त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे असमर्थनीय प्रयत्न का केले हेही एक कोडंच. त्यांच्याविरुद्ध केवळ एक महिला उमेदवार म्हणून झालेल्या गैर व परिणामी असमर्थनीय प्रचाराचाही तीव्र शब्दांत निषेध केलाच पाहिजे.

चार नोव्हेंबरला अमेरिकन जनतेने कौल दिला व शेवटचं मत मोजलं जाण्यापूर्वीच निर्णय मान्य करणार्‍या जगातल्या सर्वांत शक्तीशाली लोकशाहीत एक सत्तांतर घडलं. बराक ओबामा ह्यांनी दणदणीत विजय मिळवला. ते जाहीर होताच संपूर्ण अमेरिकेत संचारलेली उत्साहाची लाट व झालेला जल्लोष रोमांचकारी होता. ह्यावेळी मी भाषणांचं थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी हुकवली नाही. जॉन म॓केन ह्यांनी निवडणूक हरल्यानंतर केलेलं भाषण हे माझ्यादृष्टीने पराभव ग्रेसफुली मान्य करण्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हटलं पाहिजे. पराभूत उमेदवाराचं एवढं सुरेख भाषण मी तरी आजवर ऐकलेलं नाही. बराक ओबामांचं विजयी झाल्यानंतरच्या भाषणापेक्षाही तिथे असणारं भारलेलं वातावरण अधिक अंगावर रोमांच उभे करणारं होतं. बोलण्यात खरंच जादू होती. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची दुर्मिळ भाषा होती. "मेन स्ट्रीट यातना सहन करत असताना वॉल स्ट्रीट आपल्या मस्तीत धुंद राहू शकत नाही", अशी अनअमेरिकन भाषा होती. ती ऐकताना भाषणादरम्यान अंगावर काटे आले खरे नि नक्कीच एक विश्वास वाटला. माणूस नुसता प्रभावी वक्ता नाही तर अशी भाषा बोलणारा आहे म्हणून हायसंही वाटलं. नक्कीच स्वप्नं बघण्याची क्षमता त्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. पण स्वप्न दाखविणारी निवडणूकपूर्व भाषणांची भाषा आता नव्हती. किंबहुना ती स्वप्नं साकार होणं कठीण आहे, वेळ लागेल, पण अशक्य नाही असा सूर होता. त्यात आश्चर्य काहीच नव्हतं. पण मत मिळवण्याची भाषा एक असते व सत्ता मिळवल्यानंतरची एक असते हे वास्तव ओबामांनाही दूर सारता आलं नाहीच. ते नंतर बोलले ते योग्यच होतं, पण आधी बोलले ते अतिरंजित नव्हतं? आऊटसोर्सिंगला असणारा विरोध मतं मिळविण्यासाठी ठीक आहे, पण ते प्रत्यक्षात येऊ न शकणारं धोरण आहे व ओबामा ते बदलतीलच, असं अमर्त्य सेन म्हणाले. तसं होईलही कदाचित. पण मग त्यांच्यात नि वीजमाफीवर मतांचा जोगवा मागून मग ते न देणार्‍या सरकारांमध्ये काय फरक राहिला? वीजमाफी न देणे, आऊटसोर्सिंग बंद न करणे ही अधिक समर्थनीय धोरणं असली तरी पण मग मतांच्या जोगव्यासाठी आधी का अवास्तव काही बोलायचं? थोडक्यात काय तर मतदानपूर्व व शपथग्रहणोत्तर भाषांमधला फरक ओबामांनाही करावाच लागला, लागेल. माणूस चांगला वक्ता आहे ह्याला मर्यादेबाहेर काहीच महत्त्व नाही हे पुन्हा अधोरेखित करून त्या भाषणानंतर मी एक मनातल्या मनात छद्मीसं हसून घेतलं. हिलरी क्लिंटन ह्यांना सेक्रेटरी आ॓फ स्टेट करून त्यांनी दुर्मिळ स्टेट्समनशिप दाखविली आहे. त्यांच्याकडून आता राईसबाईंपेक्षा नक्कीच जास्त अपेक्षा आहेत. शिवाय मला पडलेले काही प्रश्न त्यामुळे सध्यातरी मिटले आहेत.

सर्वसाधारणपणे शासनाला विटलेल्या जनतेने इतिहासात आजवर लोकशाही मार्गाने फ॓सिस्ट हुकूमशहांना निवडून दिले आहे. पण लोकशाहीच्या मार्गाने अतिरंजित स्वप्नाळू भाषणांच्या जोरावर निवडून येणारा व सर्वसमावेशक राज्याची भाषा करणारा नेता निवडून दिल्याची उदाहरणं कमी आहेत. ह्यासाठी अमेरिकन लोकशाहीचं अभिनंदन केलंच पाहिजे. परंतु, पुन्हा एकदा हे अभिनंदन नेमकं कशाचं? लोकशाही व्यवस्थांचं व मूल्यांचं सशक्तीकरण झालं का? की पुन्हा एकदा स्वप्न दाखवणारा, ती पूर्ण करण्याची जोरदार भलामण करणारा व आपल्या वक्तृत्वाने मन जिंकणारा पण सर्वसमावेशक राज्याची कल्पना करणारा एक कल्याणकारी हुकूमशहाच व्यवस्थेने निवडून दिला? हुकूमशहाच हवा, पण कल्याणकारी, असं मानणार्‍या उजव्या सुप्त मानसिकतेचाच हा विजय आहे का, नि ओबामा हे त्याचं केवळ एक मूर्त स्वरूप आहे का? ह्यातच तमाम देसी जनतेच्या सोयीस्कर राजकीय भूमिकेचं उत्तर आहे का? हे प्रश्न अजून अनुत्तरीत आहेत. तो धर्म, वर्ण ह्यांचं भांडवल करीत नाही, म्हणून त्याचं कौतुक करणारी जनता त्याला वेळ देईल का, सहकार्य करेल का? तेच लोक जर त्याने काही चूका केल्या तर त्या केवळ एक माणूस म्हणून मान्य करतील की तेव्हा मात्र त्यांचं नातं त्याच्या वर्णाशी, घराण्याशी जोडण्याचा करंटेपणा करतील? पहिला कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होणे ही नक्कीच ऐतिहासिक घटना आहे, पण ती बदलत्या मानसिकतेचं दर्शन आहे का, हे मात्र अजून अनुत्तरीत आहे. शासनव्यवस्था अधिक पारदर्शी करण्याबद्दल बोलणारा हा नवा नेता ती अधिक लोकाभिमुख करू शकेल का? संस्थात्मक भ्रष्टाचार दूर करू शकेल का? युद्धखोरीला आळा घालू शकेल का? युद्धांवर चालणार्‍या अर्थव्यवस्था त्याशिवाय उभारू शकेल का? हेही प्रश्न अजून सुटलेले नाहीत. म्हणूनच भारतात असा ओबामा केव्हा होणार अशा चर्चांनी ऊत आणलेल्या वृत्तवाहिन्यांवरील चर्चा मला अर्थहीन वाटतात. कोणी एक कुठून येईल व आपल्याला तारेल, एक कल्याणकारी नेताच हवा...व्यवस्था नको, ही मानसिकता काही जात नाही हे विदारक वास्तव आहे. नि जर शेकडो वर्ष जुन्या लोकशाहींतही ती अजून तशीच असेल, तर काहीतरी चुकतंय. काहीतरी बदलायला हवंय. एरवी अवास्तव अपेक्षा केल्या नसत्या पण "तुम आशा विश्वास हमारे" अशा नजरेतून ज्याला पाहिलं जात आहे, तो हे मूलभूत बदल घडवू शकेल काय हे विचारणे क्रमप्राप्त आहे. सर्वसाधारणपणे होत असलेला ओबामाचा उदो उदो स्वाभाविक आहे. त्यांचं अमेरिकेच्या सर्वोच्चपदी विराजमान होणं नक्कीच प्रशंसनीय, अभिनंदनीय व स्वागतार्ह आहे. परंतु ह्या घटनेला प्रेरणादायी ऐतिहासिक घटना म्हणण्यापूर्वी ह्या प्रश्नांची उत्तरं मिळावी किंवा मिळवावी लागतील. अर्थातच ती कालांतराने मिळतील, पण शोधली तर. सध्या ह्या प्रश्नांची उत्तरं नकारात्मक नसली तरी सकारात्मकही नाहीत. त्यामुळे सध्या फक्त उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे!

Saturday, January 17, 2009

हे सूरांनो चंद्र व्हा...

हाती आलेला अपराधरहित मोकळा वेळ दवडला जाऊ नये म्हणून काय करायचं, तर निरपेक्ष आनंद मिळेल असं काहीतरी करायचं. म्हणूनच आज बसून झी मराठीच्या साईटवरून आर्या, कार्तिकी, प्रथमेश, रोहित, मुग्धा, अवंती, शाल्मली व शमिका ह्यांची गाणी रीतसर डाऊनलोड केली. सध्या तीच ऐकणे चालू आहे. हे सूर म्हणजे २००८ सालाची महत्तम देणगी म्हटली पाहिजे. वास्तविक कोणी चांगलं गात असताना आपण तिथे बोलू नये हे नि हेच खरं असलं तरीही ह्या कार्यक्रमाची नि ह्या कलाकारांची विशेष नोंद घेणे हे आवश्यक आहे. नजीकच्या भूतकाळात ह्या तोडीची हृद्य व दिल खुश करणारी घटना अन्य नसावी. विशेषतः दिवसागणिक क्रौर्याचे नवनवीन अविष्कार नजरेसमोर येत असताना निरागस, निष्पाप आनंद व सुकून ह्यांनी ओतप्रोत भरलेलं असं काही दिसणं हा एक सुखद दिलासा आहे व निर्ढावलेल्या आशावाद्यांसाठी एक आशेचा किरण आहे.

संगीताला सीमा माहित नसतात हे जरी खरं असलं तरीही ज्यांचं गाणं कधीही ऐकलेलं नाही, जे प्रस्थापित नाहीत, अशांपैकी कोणाच्या गाण्याने काही युटयूबवरच्या क्लिपमधून मन जिंकावं हा एक विरळा अनुभव आहे. आर्याच्या 'युवती मना'वर आपण फिदा का होतो, प्रथमेशच्या 'काळ देहासी आला खाऊ' मध्ये भक्तिरसात न्हाऊन अद्वैतावस्थेत पोहोचलेल्या तुकारामांपासून सुफी दरवेशांपर्यंतचे सर्वजण का साक्षात्कार देऊन जातात, कार्तिकीच्या काळ्या मातीचा पोत असणार्‍या आवाजातून कधी मंत्रमय आर्त सूर, कधी पावसाळी सुगंधाचा दरवळ, तर कधी मातीचे हुंकार व पुकार उमटून हृदयाचा ठाव कसा घेतात, रोहितच्या अदाकारीवर पाय का थिरकतात, मुग्धाच्या 'राधाधर मधुमिलिंद जयजय'मधले क्रोमँटिक सूर ते म्हणजे काय हे कळत नसूनही कसे थेट मुग्ध करतात ह्या प्रश्नांना उत्तरं नाहीत. ती नाहीत म्हणूनच माझ्यासारख्या सामान्यातिसामान्य श्रोत्याला हा एक वास्तवातीत अनुभव आहे. स्पर्धांचे नियम सोयीने 'वरून' अनेकदा बदलतात नि मग ते तसे बदलण्याचेही पायंडे पडतात, परंतु लोकाग्रहाच्या व उच्चप्रतीच्या कलाविष्काराच्या तादात्म्यातून 'खालून' नियम बदलले जाणं हे एक विशेष म्हणावे लागेल. खरं तर संगीतामधलं अवाक्षर, किंवा अगदीच विनोद करायचा तर अवस्वर न कळणार्‍या माझ्यासारख्या कानसेनांना ह्या विषयावर जाहीर बोलण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही. पण लोकाश्रयावर अवलंबून असणार‍्या कलेने लोकांचा आवाज ऐकणे क्रमप्राप्त आहे. अर्थात लोकांनीही जाणकारांचा आवेश आणता कामा नये व कलाकारानेही लोकमताचा अनादर करता कामा नये. एरवी काय करावं ह्याचं कलाकारावर नि काय बोलावं ह्याचं जनतेवर बंधन नाहीच नि ते नसलंही पाहिजे.

सारेगमप ह्या कार्यक्रमाचा व त्यातल्या देवकी पंडित ह्यांच्यासारख्या परीक्षकांचा मी एक सामान्य श्रोता म्हणून अत्यंत ऋणी आहे. ह्याचं कारण असं की गाणं ऐकण्यासाठी कान घडविण्याचं मोठं श्रेय ह्या लोकांकडे जातं. ह्या पर्वापूर्वीच्या पर्वांचं फलित हेच की गायकाने काय गावं नि श्रोत्याने काय ऐकावं ह्याचे संस्कार तमाम श्रोतृवर्गावर घडले. तसे ते घडतही राहतील. त्याच्याच जोरावर ह्या पर्वातलं गाणं एक सामान्य श्रोता म्हणून मी अधिक चांगल्या प्रकारे पारखू शकलो हे नमूद करावंच लागेल. सारेगमपचा फॉर्मट भांडकुदळ परीक्षकांपासून हटके जाणकार परीक्षकांच्या जाणीवेतून केलेल्या परीक्षणासारखा ठेवल्याबद्दल वाहिनीचे आभार येथे मानलेच पाहिजेत. ज्या कार्यक्रमाने कलेशी फारकत न घेता, तिच्यातील आदरस्थानांचा अनादर न करता व्यावसायिक यश मिळवलं आहे, अशाच कार्यक्रमातून हे असं देणं संगीतसृष्टीला व विशेषतः मराठी संगीताला लाभावं हा केवळ योगायोग नसून ते एक जाणीवपूर्वक प्रयत्नांचं फलित आहे. त्याचमुळे आज संगीतातील विविध प्रकार सराईतपणे हाताळणारी एक गायकांची फौज क्षितिजावर दिसते आहे व साहजिकच ती प्रादेशिक, भाषिक, जातीय ह्या सर्वच दृष्टीने सर्वसमावेशक आहे, हेही विशेष नोंद घेण्यासारखे आहे. ह्या सर्व गोष्टींवरून भेद निर्माण करण्यातच धन्यता मानणे हे सर्वदूर दिसत असताना हे सर्वसमावेशक स्वरूप विशेष समाधानकारक आहे. ह्या कार्यक्रमाची दखल महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनाही घ्यावी लागते नि तो अग्रलेखाचा विषय होऊ शकतो ह्यात आश्चर्य नाही व वावगे तर काहीच नाही.

सुमारे वर्षभरापूर्वी अशाच एका निरागस कलाविष्काराने माझ्या मनावर जादू केली होती. आज पुन्हा एकदा तारकादळे भूवर अवतरल्याचा एक रोमहर्षक अनुभव नजरेस पडतो आहे. यंदाही ह्या अस्खलित सूरांपुढे माझे शब्द तसेच अडखळत आहेत. ईशानला जेता ठरविणे ही आमीर खानची व्यावसायिक गरज होती असं म्हणतात. ह्याचा एक अर्थ असा की ईशानने स्पर्धेत प्रस्थापित संकेतांनुसार जिंकलंच पाहिजे अशी लोकप्रिय मानसिकता आहे. पण दुसरा अर्थ असाही होतो की त्या मानसिकतेला छेद देण्याचं व लोकमत अधिक जागरूक करण्याचं धैर्य आमीर खानकडे कलाकार व माणूस म्हणून असेल वा नसेल, पण एक व्यावसायिक म्हणून नक्कीच नव्हतं. लोकमताचा आदर करणं हे ठीकच पण ते अधिक समंजस करण्यासाठी काही प्रस्थापित संकेतांना छेद देण्याचं धैर्यही असलं पाहिजे. लोकप्रियतेच्या शिखरावर असणार्‍यांनी हे धाडस करायचं नाही तर आणखीन कोणी? स्पर्धेला विराम देऊन कलावैविध्याचा सन्मान करण्याचा व एका मर्यादित पातळीच्या पल्याड स्पर्धाविरहीत असंही काही असलं पाहिजे असे ठामपणे सांगण्याचा एक नवा पायंडा हा कार्यक्रम व झी वाहिनी पाडणार का? ह्या प्रश्नाच्या उत्तरात भविष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं सापडण्याची क्षमता असू शकते.