Tuesday, September 4, 2007

विषयांतर

नववीमध्ये असताना आम्हाला एक धडा होता, काळे केस. धडा आठवत नाही पण हे नाव आठवतंय. ते स्वाभाविक आहे, कारण त्या धड्यात एकही धड गोष्ट नव्हती. नुसता काही पानांचा असंबद्ध मजकूर. नि त्याला म्हणे लघुनिबंध म्हणतात. "बादरायण संबंधाने जोडलेल्या विभिन्न विषयांवरील अनेक लहान लहान लेखांचा दीर्घ एकसंध गद्य मजकूर म्हणजे लघुनिबंध", अशी एक प्रदीर्घ व्याख्या मी तेव्हापासून मनात बाळगून आहे. अजूनही काथ्याकूट करून ही व्याख्या लांब करण्याचा मला मोह होत आहे पण, "दीर्घसूत्री विनश्यति" या सुवचनाचे स्मरण करून मी तो मोह टाळत आहे. हे लिहितानाच, असाच एखादा दीर्घ लघुनिबंध वाचून कुण्या एका सुज्ञास हे वचन सुचले असावे का, असा प्रश्न मनात येत आहे. तर आपणही असा एक लघुनिबंध लिहावा असा एक विचार अनेक दिवस मनात आहे. एखाद्या क्षुल्लक गोष्टीवर विचार करताना वेगाने रूळ बदलून भलत्याच विषयावर घसरण्यात माझं मन प्रकाशालाही हार जात नसल्यामुळे आणि हे रूळ बदलणं केवळ वेगात नव्हे तर अव्याहत चालू राहू शकत असल्यामुळे आपण हा साहित्यप्रकार हाताळू शकू असा मला प्रचंड आत्मविश्वास आहे. त्याच जोरावर मी हे धाडस करत आहे.

आता काहीही लिहायचं हे ठीक असलं तरी कुठून तरी सुरुवात करावीच लागणार. म्हणजे काहीतरी आकर्षक सुरुवात हवी. बरंच काही वाट्टेल ते सुचतंय नि ते कुठल्या अदृश्य धाग्यांनी जोडायचं तेही. पण सुरुवात सुचेना. "अदृश्य धागे" या शब्दसमुच्चयाचा कुठलाही प्रगल्भ, काव्यात्म अर्थ न घेता शब्दशः अर्थ येथे अभिप्रेत आहे. लिखाण निःसंदिग्ध असावं या भावनेतून हा ऊहापोह. तर असं काहीही सुचतंय पण सुरुवात सुचेना. पुन्हा एकदा स्पष्टीकरण...या अथांग विश्वात आपण केवळ भरकटत आहोत आकाशगंगांसारखे, उगम आणि अंत याविषयी अनभिज्ञ...असा कोणताही प्रगल्भ अर्थ कटाक्षाने टाळावा. माझ्या लिखाणाची एवढी झेप नाही. विनय म्हणून नव्हे, वास्तव म्हणून. तर हे असं फारंच रटाळ सुरु झालंय. पण सुरुवात शोधता शोधता हे जे दोन परिच्छेद खरडले ते सुरुवात म्हणून ग्राह्य धरता नाही का येणार? असा एक कोंबडी आधी की अंडे आधी ढंगाचा प्रश्नही या निमित्ताने मला पडला आहे.

आताशा मला हे असे काहीबाही प्रश्न फार पडू लागले आहेत. म्हणजे आमचं काही कमावलेलं शरीर नाही. एकंदरीत अंगमेहनतीच्या कामात गती कमीच. पण तळाला लागलेली भांडी, "हे निघत नाही", असं खुशाल जाहीर करून रूममेट निघून गेल्यावर माझ्या हातून कशी बर्‍यापैकी लख्खं होतात? मुळात या बल्लवांचा रोज भात खाली लागतोच कसा? एकदा लागल्यावर पुढल्यावेळी पाणी जास्त नाही का घालता येत? बराच वेळ शिट्टीच झाली नाही, या गोष्टीची दखल बर्‍याच वेळानंतर घेण्यापेक्षा जरा आधी घेता येत नाही का? का शिट्टया ऐकूच येत नाहीत? मला कमी ऐकू येतं, मग मी उगाच प्रश्न विचारत राहतो यावर माझ्या मित्रमंडळींचं एकमत आहे. असेल बुवा. वास्तविक व्यासपीठावरून केलं गेलेलं, आपल्याला अडचणीत टाकणारं वक्तव्य आपण ऐकलंच नाही, असं सांगून कानावर हात ठेवणार्‍या महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांसारखी नामुष्की आमच्यावर आजवर कधी ओढवलेली नाही. हेच ते सर होते ना ज्यांनी मग आम्हाला नैतिक शिक्षण देण्याचा घाट घातला? तर असेल मला कमी ऐकू येत. पण घरात शिरल्या शिरल्या दारातच मला स्वयंपाकघरातील वाहत्या नळाचा नि बाथरूममधील निथळत्या शाँवरचा जो आवाज ऐकू येतो तो तेथे उपस्थित तमाम जनतेला का ऐकू येत नाही? किती पाणी वाया गेलं असेल या विचाराने येणारी अपार खिन्नता इतरांना का शिवतसुद्धा नाही? घरभाड्यात पाणी, वीज, इंधनाचा वायू इ. सुविधा मोफत मिळतात म्हणून त्यांचा वाटेल तसा वापर करणारे हे अमेरिकास्थित पैसा, शिक्षण, भारतातील सामाजिक स्तर या सर्वार्थांनी उच्चभ्रू भारतीय लोक आणि मोफत वीज वाटेल तसा वापरणारा भारतातील सामान्य शेतकरी यांची तुलना करण्याचा मोह मी इथे उपमा, उत्प्रेक्षा की रूपक अलंकार योग्य होईल या गहन विचारात सोडून देतो. तरीपण हा उधळण्याची वृत्ती जोपासणारा प्रकार चळवळ करून थांबवला पाहिजे असं मला वाटतं. भले मला स्वतःलाही माझ्या राहत्या घरासाठी घरभाड्याखेरीज अजून काही पैसे मोजावे लागतील. हरकत नाही. मी मोठ्या मनाने तो त्याग करीन. जमीन पुनर्रचनेसाठी कम्युनिस्टांनी दिलेल्या योगदानाप्रमाणे घरभाडे पुनर्रचनेसाठी मी दिलेल्या या योगदानाचे युगान् युगे कौतुक होईल का? या प्रसिद्धीपरायण प्रश्नावर मला माझीच कीव येत आहे. नि हा असला क्षुद्र विचार बँकस्पेस ने नाहीसा करावा की मागे जाऊन डीलीट ही कळ वापरून तो पुसावा असा मी विचार करत आहे.

"विंडोज"च्या "मँक" नावाच्या एका सावत्र बहीणीबरोबर एकदा काम करताना तिच्या पटलावार बँकस्पेस अशी कळच नाही नि डीलीट नावाची कळ बँकस्पेसचे काम करते हा जावईशोध मला लागला होता. मला तिची फारच दया आली होती तेव्हा नि मग तिच्यातून उगवलेलं ते पांढरंशुभ्र सफरचंद मला पांढरंफटक दिसू लागलं होतं. रंग आणि जोडशब्द यांचं या अर्थचमत्कृतींमुळे अतूट नातं आहे. परवा एक नवीन मराठी अल्बम ऐकताना "निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये..." अशी ओळ ऐकून मी स्मित हास्य केलं होतं. काही लोक याला कुत्सित असंही म्हणतात. मला निळंशार माहित होतं. निळंभोरवर मी जरा घुटमळलो होतो. "एकतर निळेभोरवर एवढं खटकायचं काही कारण नाही नि शिवाय जर आपल्याला अशा कविता, गाणी लिहिणं झेपत नाही तर जे करतात त्यांच्यावर हसू नये" असं माझं मन मला ओरडत होतं. हे बरं आहे, जरा आमच्या कानाला खटकलं नि आम्ही हसलो तर एवढं काय त्यात? इंजिनिअरींगच्या तोंडी परीक्षांच्या वेळी आम्हाला केवळ मूक करण्याच्या हेतुने काही प्राध्यापक वाटेल ते विचारायचे, चुकीचंही. चूक आहे म्हणून सांगायची सोय नाही परत. तेव्हा आम्ही नाही कधी म्हणालो त्यांना ते की, "तुम्हालाही नाही येत हे, उगाच हसू नका". वास्तविक दोष त्यांचा नसे. स्वतःला फार शहाणे न समजणारा इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचा शिक्षक नि काँप्युटर इंजिनीअरींगचा विद्यार्थी विरळाच ! काँप्युटर इंजिनीअरींगला प्रवेश घेतला की प्रवेशासह हा आगाऊपणा मोफत मिळतो. पण इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगच्या शिक्षकांच्या अंगचा "अहं सर्वास्मि" हा भाव कमावलेला असतो. त्यामुळे तो त्यांच्या हरएक कृतीत दिसून येतो. काँप्युटर इंजिनीअरींगचे शिक्षक बहुदा सतत न्यूनगंडाने ग्रासलेले असतात. काँप्युटर इंजिनीअरींगचा गंधही नसणारा माणूस आपला बँक अकाऊंट चालविण्यासाठी प्रणाली लिहून आपल्या तिप्पट पैसा ओढत आहे, "मी इतर नोकरी मिळाली नाही म्हणून नाही तर स्वेच्छेने शिक्षक झालो आहे " हा आव आणणे कठीण होत चालले आहे, आपल्या विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक आहे, आपले विद्यार्थी आपल्याला गुंडाळून टाकतात, अशा अनेक गोष्टींचा तो परिपाक असावा. काँप्युटर इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांच्या आगाऊपणाचे कहर ऐकून मला या शिक्षकांची अगदी कीव येत असे. इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचं तसं नाही. इथे प्रत्येक शिक्षक स्वतःला अनभिषिक्त सम्राट समजतो आणि आपली प्रयोगशाळा नामक गढी राखत असतो.

इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचे विद्यार्थी तर सतत बावरलेलेच असतात. एकतर आपण काय शिकत आहोत आणि इंजिनीअरींगनंतर नेमकं काय कारणार याचा शेवटपर्यंत पत्ता लागू देत नाहीत. मग काही धोपटमार्गी साँफ्टवेअरकडे जातात. त्यांना आपलं प्रोग्रामिंग दुसर्‍या सत्राच्या परीक्षेनंतर कधी पुढे गेलंच नाही ही भीती असावी. काही धिटाई दाखवून इलेक्ट्राँनिक्सकडे वळतात. तिथे इलेक्ट्राँनिक्सकच्या मुला‍‌मुलींशी स्पर्धा. नि काही राहिलेच इलेक्ट्रिकलमध्ये तर बहुदा त्यांना त्यांचे वरीष्ठ सांगत असतील की, "ती डि सी मोटर कोणी वापरत नाही आता. ए सी मोटर नि थ्री फेज ट्रान्सफाँर्मर महत्त्वाचं". मग त्यांना धडकी भरत असेल. या दोन गोष्टींवर त्यांच्या इंजिनीअरींगची मोटर आचके देत बंद पडली होती. मोटर चालू होताना ती प्रचंड करंट खेचते त्यामुळे ती शंभर गोष्टींची खातरजमा करून व अत्यंत सावधपणे चालू केली पाहिजे, हे त्यांच्या मेंदूवर इतकं ठसवलेलं असतं की ती बंद पडलेली मोटर पुन्हा चालू करण्याचं धाडस त्यांनी घाबरत घाबरतंच केलेलं असतं. त्या दिव्याची आठवण मनाला सुन्न करत असेल. अशा विपरीत परिस्थितींतही न डगमगता वीज, सर्किट व प्रोग्राम असं वाट्टेल ते पुरवू शकणार्‍या या विद्यार्थ्यांचं मला कौतुक आहे.

झाली पंचाईत आता? इंजिनीअरींगकडे वळू नको असं बजावत होतो. एकदा यात शिरल्यावर आता कुठल्याही विषयाकडे वळता येत नाही. या फक्त आत पावलं जाणार्‍या गुहेत, नव्हे गर्तेत, मी असा कृष्णविवरात खेचल्यासारखा पडतो. बाहेर पडायचा मार्ग नाही. कृष्णविवरेही मरतात व त्यांच्यातील माहिती नष्ट न होता अन्य स्वरूपात विश्वात राहते, असं स्टिफन हाँकिंग म्हणाले तेव्हा मला केवढा दिलासा वाटला होता. त्याच आशेने, या गोड आठवणीवर या दीर्घनिबंधाचे "विषयांतर" अशा समर्पक शीर्षकाने बारसे करून विषय अधिक न वाढवता थोडक्यातच इतिश्री करत आहे.

8 comments:

  1. मेघना,

    तुझी प्रतिक्रिया आणि हा लेख यात भलताच योगायोग जुळलाय...संदर्भः शेवटचा परिच्छेद. किंवा बादरायण संबंध....:)

    ReplyDelete
  2. ha haa ... engineering che kisse kharach sahi ahet!! ekdam true!!

    छान लिहीलेस ... एकदम घुमिव गाडी रचीव किस्सा! मजा आली वाचताना!

    ReplyDelete
  3. केवढे दिर्घ लिहीले आहेत. पण मस्त लिहीले आहेत,

    ReplyDelete
  4. @ rohit: "घुमिव गाडी रचीव किस्सा!" :) aawaDala :) thnx.

    @ meghana, sushant, harekrishnaji:

    thnx a lot.

    ReplyDelete
  5. nimish u r too good think of being a writer u may ger booker prize keep it up this is neil's mom

    marathi madhye mhanayche tar sunder vangmaya vachayala milaye

    ReplyDelete
  6. @neil's mom...

    बाप रे!...

    :)

    मनापासून धन्यवाद!!!

    ReplyDelete