Wednesday, June 20, 2007

उपजत

शिशिरागम झाला म्हणुनी
झाडांची पाने गळली
देही जी फुलली वस्त्रे
देहास त्यागुनी गेली

सृष्टीस या वसंताची
चाहूल लागली जेव्हा
चैतन्य भारल्या देही
पल्लवी विलसली तेव्हा

इथेच या खांद्यांवरती
पालवी खेळली होती
इथेच या फांद्यांवरती
रंगांची उधळण होती

पानांसह वृक्षाली ही
पावसात भिजली होती
पानांनी रंग बदलता
रंगात मिसळली होती

शिशिरास कशाने भुलली?
नि काय विचारे गळली?
उत्तर मागून झाडे
थंडीत गोठुनी गेली

मग पुन्हा पालवी फुटली
झाडांनी वस्त्रे ल्याली
आत्म्यात क्षमेची शक्ती
झाडांच्या कुठून आली?

5 comments:

  1. शिशिरास कशाने भुलली?
    नि काय विचारे गळली?...
    ...आत्म्यात क्षमेची शक्ती
    झाडांच्या कुठून आली?

    काय बोलावे? लिहीत राहा... और क्या...

    ReplyDelete
  2. बब्बा, कविता वगैरे?; हे वेड आहे!! पण कविता सुंदर आहेत. तेव्हा keep it up!!

    ReplyDelete
  3. are leka... baap ahes tu....
    farch kaltay tula... :)
    keep it up....

    ReplyDelete
  4. निनाद,

    धन्यवाद! :)

    स्नेहल,

    हो का?? सुचतं असं काही! धन्यवाद! :)

    ReplyDelete