Friday, March 21, 2008

जगता जगता

मेघनाच्या जगता जगता या लेखावर एक प्रतिक्रिया...


जोडलेल्या नाळेवर कुढत काढले दिवस होते, गर्भामध्ये जगता जगता
तोडलेल्या नाळेवर कुढत काढले दिवस होते, विश्वामध्ये जगता जगता


काही नाळ तुटूनही जन्मभर फिरत राहतात, त्या काजळी कोपर्‍यांकरता
पृथ्वीही त्याचसाठी अव्याहत जाळते इंधन, गाभ्यामध्ये, जगता जगता


दवामधून विखुरणारे रंग कधी पाहत असेल, फुलपाखरू हलकेच उडता
सापडतही असेल कधी सुरवंटाचा रंग त्याचा रंगांमध्ये, जगता जगता


शिखरावर पाझरलेला थेंब व्यर्थ शोधत असेल, संथ नदीही वळता वळता
कोसळताना अवचित तो तुषार होऊन दिसत असेल सार्‍यांमध्ये, जगता जगता


चुकून कोकिळ स्वर चुकला, फांदीवर नुसताच बसला, आंब्यावरती गाता गाता
सूर आत जुळला होता, कधी कानांवर पडलेला, अंड्यामध्ये जगता जगता

Wednesday, February 20, 2008

कोई कलमा मुहब्बत का दोहराते फरिश्ते हैं

प्रति
आशुतोष गोवारीकर


चित्रपटासाठी भारताच्या तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भांचा canvas निवडण्याची तुमची ही तिसरी खेप आणि त्या canvas वर चित्रपटाची गोष्ट पार्श्वभूमीच्या आणि गोष्टीच्या बारकाव्यांसह समर्थपणे उभी करण्याचीही. त्यासाठी तुम्हांला तिसरा सलाम !

दिवसेंदिवस अधिकाधिक असहिष्णु होणार्‍या ह्या समाजमनाला परमतसहिष्णुतेविषयी इतकी कळकळ असणारा एक राजा ह्या देशावर राज्य करून गेला, ही गोष्ट सांगायचं ठरवलंत त्याबद्दलही सलाम. त्या राजाने ही सहिष्णुता एक राजा म्हणून, एक मुलगा म्हणून, एक नेता म्हणून, एक पती म्हणून, एक प्रियकर म्हणून, एक भाऊ म्हणून नि मुख्यत्वे एक माणूस म्हणून कशी जपली, हे दर्शविणार्‍या तरल अभिव्यक्तीलाही सलाम. ही गोष्ट जितकी अकबराची तितकीच जोधाची (अगदी "जैसे दो सूर हो मध्धम, ना कोई ज्यादा ना कोई कम राग में" इतकी). रयतेच्या हितासाठी प्रजाभिमुख राजाने केलेला व्यवहार, हे भयंकर प्राक्तन स्वाभिमानाने स्वीकारून एका बलाढ्य राजाला नि पर्यायाने राज्यसत्तेला प्रजाभिमुख करणार्‍या राजपूत युवराज्ञीची कथाही तितक्याच सशक्तपणे उभी केल्याबद्दलही सलाम.

तशा तिन्ही प्रेमकथाच. तिन्ही वेगळ्या. तिन्हींचे भिन्न संदर्भ. पहिल्या दोन्हींत खरं तर प्रेमकथा हा दुय्यम भाग होता, पण तुम्ही तोही अगदी हळुवार टिपला होतात. इथे प्रेमकथा केंद्रस्थानी होती. पण ही प्रेमकथा दोन राज्यसत्तांच्या राजकारणाची परिणती होती. साहजिकच तदनुषंगाने येणारे संदर्भ आणि व्यक्तिमत्त्वाचे पैलू हे प्रेमकथेइतकेच महत्त्वाचे असणार. ज्या व्यक्तींचे वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्य अभिन्न आहे, त्यांची प्रेमकथासुद्धा त्या संदर्भांशिवाय अर्थहीन ठरते. पण बर्‍याचदा फक्त प्रेमकथेला महत्त्व देण्याचा मोह दिसतो. आपण त्या मोहाला बळी न पडता जोधा व अकबर यांची स्वतंत्र व्यक्तिमत्त्वंही उभी केलीत, त्याबद्दलही सलाम.


सुरुवातीपासून अखेरपर्यंत जोधा व अकबर यांच्यावरचा focus जराही विचलित होऊ दिला नाहीत, हे आवडलं मला. जोधा‍ - अकबराच्या कथेत बिरबलाच्या चातुर्यकथांचा मसाला भरला नाहीत, त्याबद्दल आभार. किती नानाविध माध्यमांतून तुम्ही नि तुमच्या सहकार्‍यांनी काही ना काही व्यक्त केलंय. म्हणजे माझं त्या सर्वच माध्यमांबद्दलचं ज्ञान अगाध असलं तरी माझ्या सामान्य बुद्धीला जे जे रुचलं ते ते पाहून तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं असं वाटलं. जोधाला परत घेऊन जाण्यासाठी आलेल्या अकबराच्या स्वागताच्या दृश्यात भगवा रंग नुसता भरलाय आसमंतात. याआधी भगवा रंग एवढा आल्हाददायक कुठे पाहिला होता हे आठवावंच लागेल. जलालचं अकबरीकरण होतानाच्या गाण्यात तर रंग नि नृत्याची नजाकत भरली आहे. पण जेव्हा "ख्वाजा मेरे ख्वाजा" म्हणताना हिंदुस्तानचा बादशाह तन मन अर्पून त्यात एकरूप झाला ना तेव्हा त्या नृत्याच्या सादगीतून केवढी मोठी अभिव्यक्ती केलीत तुम्ही. तेव्हाच इतिहासाचे, नि घटनांच्या तपशीलांबद्दलचे फिजूल प्रश्न संपूर्ण निरर्थक झाले. अकबराचं एवढं सुरेख interpretation विरळाच ! त्या गाण्यासारखंच संपूर्ण चित्रपटात राजेशाही डामडौलात जपलेल्या त्या काळाच्या उपजत साधेपणासाठी सलाम.

रहमान, जावेद अख्तर हे तर "प्रतिभा गहाण टाकल्यास जग विकत घेता येईल" या categoryत मोडत असल्यामुळे ती बाजू उत्तमच असण्याची स्वाभाविक अपेक्षा होती. पण ह्या दोघांनी चित्रपटागणिक कलेला अधिक उंचीवर नेण्याची प्रथा इथेही अखंडित ठेवली आहे. लगानमध्ये त्यांनी "मितव्या"ला हाक मारली होती, स्वदेसमध्ये "देख त्यजकर पाप रावण, राम तेरे मन में है" अशी विचारघन वाक्यं सहज फेकली होती. नेहमीच चळवळींची गाणी वाटलीत ती मला. इथे तर म्हणजे थेट भजनापासून सुफी कलामांपर्यंत नि तरल प्रेमगीतांपासून भाटांनी राजाच्या स्तुतीसाठी लिहावं, अशा गीतापर्यंत प्रतिभा नुसती ओसंडून वाहतेय. ज्या प्रतिभेला तुमच्या बहुतांश समकालीनांच्या अगदीच सरधोपट कथांमध्ये वाव मिळणे कठीण आहे, तिची योग्य कदर केल्याबद्दल सलाम. रहमान तर बहुदा पहिल्यांदा वाक्यातले शेवटचे दोन शब्द आणि शब्दातील शेवटची दोन अक्षरं संगीतात दडपून न टाकता (बर्‍याच अंशी) गायला असेल.

माझ्याबरोबरच्या साधारण वीस पंचवीस लोकांना हा चित्रपट रटाळ वाटला, त्यामुळे हा काही सार्वत्रिक लोकप्रिय नाही. नसू देत. सोळाव्या शतकातल्या दोन राज्यसत्तेंमधल्या राजकारणातून जन्मलेली हळवी प्रेमकथा, त्यातून जन्मलेले एक परिपक्व नातं, त्यातून झालेली सांस्कृतिक देवाणघेवाण व त्याचा संबंधित राज्यसत्तांवर नि व्यक्तिमत्त्वांवर झालेला व्यापक परिणाम, हे सगळं एकविसाव्या शतकासारखं चित्तथरारक, वेगवान वगैरे वगैरे असावं अशी अवाजवी नि अर्थहीन अपेक्षा करणार्‍यांचा त्यात दोष आहे, तुमचा नाही. सर्व शांतताप्रिय, धर्मनिरपेक्ष भक्तीपंथांत (मग सुफी असो, वारकरी असो वा इतर) असणारा निखळ साधेपणा ज्यांना भावला नाही, ते ख्वाजा मेरे ख्वाजा ह्या गाण्याला हसले असतील. तो त्यांचा प्रश्न आहे, तुमचा नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही जोधा अकबर यशस्वी साकारला आहे आणि एक अजून छान चित्रपट पहायला मिळाल्याचं समाधान दिलं आहे.

जेव्हा बरेचसे इतर लोक अत्यंत थिल्लर चित्रपट खोर्‍याने काढत आहेत, तेव्हा तुम्ही ही तिसरी सशक्त कलाकृती निर्माण केली आहे. एकंदरीत सर्वत्रच द्वेष, असहिष्णुता यांचेच उदात्तीकरण दिसत असताना आपण आपल्या या तिन्ही चित्रपटांमधून नेहमीच प्रेमाला महत्त्व दिलं आहे, देशप्रेमासकट. मला वाटतं, हा आपल्या वृत्तीचा परिणाम असला पाहिजे. जोधा अकबर हे एक त्याच सर्जनाचं भव्य मूर्त रूप आहे. असे अनेक प्रेमाचे कलमे गाणार्‍या तुमच्यातल्या फरिश्त्याला सलाम !

Tuesday, January 29, 2008

कुणी जाल का, सांगाल का?

आघ्रातं परिचुंबितं ननु मुहुर्लीढं ततश्चर्वितम्
त्यक्तं वा भूवि नीरसेन मनसा तत्र व्यथा मा कृथा
हे सद्रत्न, तवैतदेव कुशलं यद्वानरेणादरात्
अंतःसारविलोकनव्यसनिना चूर्णीकृतं नाश्मना


दहावीत संस्कृतमध्ये हे सुभाषित होते. त्याचा साधारण अर्थ काय तर, "अरे चांगल्या रत्ना, वानराने तुला हुंगलं, चाटलं, तुझा पुन्हा पुन्हा वास घेऊन पाहिला, चावलं, निरीच्छीने जमीनीवर फेकून दिलं, तरी त्याची खंत करू नकोस. तुझं नशीब समज की, (तोडून फोडून)आत काय आहे हे पाहण्याची खोड असणार्‍या त्याने उत्साहाच्या भरात तुझा दगडाने चुरा केला नाही". भारतरत्नासाठी ज्या ज्या रत्नांचा असा उद्धार झाला, त्यांच्याबद्दल मला अतीव सहानुभूती वाटत आहे. नि ज्यांनी अकारण या रत्नांची नावे सुचवून व जाहिरात करून या रत्नांची भविष्यात कधीही भारतरत्न मिळण्याची संधी घालवली त्यांच्याबद्दल हा थोर सुभाषितकार आधीच वदता झाला आहे.



तर हा जो सगळा आधी खेळ नि मग खेळखंडोबा झाला त्याबद्दलची काही गोपनीय माहिती काही विश्वसनीय सूत्रांकडून नुकतीच हाती आली आहे. तर झालं असं की काही अगुजराती व्यक्तींनी गुजराती अस्मितेचा भलताच धसका घेतला आणि आपल्याला आपल्याच मतदारसंघातून हाकलतील की काय अशा भीतीने लगेच स्वतःला भावी पंतप्रधान करवून घेऊन भारतीय अस्मिता अंगीकारली. तेवढ्याने भागेना म्हणून माजी पंतप्रधानांना सन्माननीय मार्गाने घरी बसवावे असेही ठरले. भारतीय क्रिकेट संघटनेकडून 'खेळाडूला सन्मानपूर्वक कसे वगळावे, ज्येष्ठ खेळाडूला "तू आता घरी बस" हे कसे सांगावे', हया संदर्भात काही सल्ले घेतले गेले. पण त्यांचा अलिकडला याबाबतीमधला अनुभव फार चांगला नसल्याने ते सल्ले स्वीकारण्यात आले नाहीत. शिवाय माजी पंतप्रधानांचा प्रश्न असल्यामुळे काळजी घेणे भाग होते. याच विचारात एक नामी युक्ती सुचली. युक्ती झकासच होती. एकाच दगडात दोन पक्षी मारायचा बेत ठरला.

त्या माजी पंतप्रधानांना भारत सरकारचा सर्वोच्च सन्मान देण्यात यावा, अशी मागणी करण्याचा निर्णय झाला. ती कशी करावी ह्यात खरा धूर्तपणा होता. म्हणजे ह्या वेळेस आपला कोणता मुखवटा दाखवायचा असा प्रश्न होता. मग ज्यांना घालवायचे त्यांचाच मुखवटा घालावा असं ठरलं. म्हणून कवितेचा आधार घ्यायचा असं ठरलं. म्हणजे इतके दिवस ह्या मवाळ मुखवट्याची मक्तेदारी ज्यांची होती त्यांचा असा पर्दाफाश करून ती मक्तेदारी मोडून काढायची, असा प्रयत्न. त्यानिमित्ताने आपल्यालाही एक मुखवटा मिळेल ही आशा. मुखवट्याशिवाय जगणं कठीण असतं हो. म्हणजे ह्यांच्याकडेही होता, अगदीच नाही असं नाही. चांगला लोहपुरुषाचा लोखंडी मुखवटा होता. पण पक्षात काही ह्यांच्याहून हिंस्र श्वापदे आली (तीच ती गुजराती अस्मिता चित्र प्रस्तुत!) नि त्यांनी सरळ हिसकावून घेतला हो तो. त्यांचा म्होरक्या हे साधे श्वापद नसून गिरनारच्या जंगलातून पळालेला एक नरभक्षक सिंह आहे, अशी माहिती नुकत्याच शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेच्या लोकसत्तेमधील वृत्तांतात मिळाली (सौजन्यः माजी खासदार, दक्षिण मुंबई ऊर्फ भुलेश्वरीची भवानी, मराठी बोलीत "अमुक तमुक भवानी आहे किंवा ए भवाने" असा उल्लेख फार आदरपूर्वक करत नाहीत असा माझा समज आहे, असो.) तर या निमित्ताने आपल्याला एक मुखवटा मिळेल, या मुखवट्याचा पुढील निवडणूकीत सोयीने उपयोग करून घेता येईल हा विश्वास. शिवाय भारतरत्न देतानाच सोबत शालजोडीतून अधिकृतपणे सक्तीची निवृत्तीसुद्धा! म्हणून अशी कविता रचण्यात आलीः

"कुणी जाल का? सांगाल का? सुचवाल का मनमोहना?
रत्नास ह्या विसरू नको, भूषवू नको दुसर्‍या कुणा

आधीच दिल्ली दूरची, दृष्टीत येऊ लागली
परत आता कोणती जोखीम नाही चांगली
हार पूर्वी जो दिला, होतात पाहून वेदना
बसवून सुवर्णकोंदणी रत्नास या सजवाल ना?

आनंदुनी गेलो जरासा मी सुखाते लाभता
इतक्यांत यांची वाजली शब्दांमधील शांतता
कळवाल का मनमोहना, की आस होती लागली
अन खुर्चीसाठी कुणी रात्र जागून काढली"

येता जाता सर्वांसमोर आपल्या कवित्वाचं प्रदर्शन होऊ लागलं. पण काहीच होईना. म्हणजे कवित्वाचंच कौतुक फक्त. मग मुखवट्याचा फार त्रास होऊ लागला. (म्हणून नेहमी आपल्या मापाचाच मुखवटा घालावा. दुसर्‍याचा घातला तर हेच व्हायचं.) म्हणून शेवटी सरळ तो झुगारून थेट सांगूनच टाकलं ह्यांनी, रोख ठोक. कविता बिविता सगळं बाजूला ठेवून सरळ एक दहाकलमी खलिताच धाडला. नि कविता उघड उघड गाऊनही लोकांना कळेना म्हणून ह्या खलित्याबाबत जराही गुप्तता वगैरे न ठेवता तो पंतप्रधानांच्या आधी पत्रकारांना धाडण्यात आला. कसं सगळ्यांना एकदम कोंडीत पकडलं या भ्रमात असतानाच, बंगाली वाघ आधी गर्जले नि नंतर सरळ पुरस्कारांनाच मानत नाही असं सांगून मोकळे झाले. जरा हुश्श झालं. पण हा हन्त! हन्त! नलिनीं गज उज्जहार! निळ्या हत्तीने आपलाही वजीर पुढे केला नि कमळात दडलेल्या भुंग्यांना काहीच सुधरेना. मग बिहारची प्यादी पुढे आली पण त्यांच्या राजकीय वारशाचा हक्क नेमका जदयु चा कि राजद चा हेच समजेना. शेवटी पंचांनी सिडनीचा आदर्श समोर ठेवून खेळाडूंना खेळू दिलं नि शेवटी आपलं ते खरं केलं. फरक एवढाच की येथे अजून हाराकिरी न होता सामना अनिर्णीत सुटला.

मला वाटलं झालं आता. पण नाही. नुकतीच खर्‍या कवीने "सर सलामत तो नकाब पचास" या न्यायाने एक कविता पाडली असं ऐकलं नि ती प्रयत्नपूर्वक मिळवली. ही कविता अजून जाहीर झालेली नाही. पण राहवत नाही म्हणून तुम्हाला सांगतो -

"कुणी जाल का? सांगाल का? सुनवाल का वेणूधरा
आता तरी गाऊ नको दमवू नको या जर्जरा

आधीच संध्याकाळची सुरुवात आहे जाहली
परत आता कोणती इच्छाच नाही राहिली
हार पूर्वीचा दिला तो वाळता केला चुरा?
आता करा ना सांगता, अपमान झाला हा पुरा

सांभाळुनी माझ्या जिवाला मी जरासे घेतले
इतक्यात कानी वाजले ह्यांनी फुका जे गायले
कळवाल का वेणूधरा, की खंत आता वाढली
अन वाचण्या खुर्ची कुणी रात्र जागून काढली? "

तेवढं जरा कुठे बोलू नका म्हणजे झालं!

(मूळ गीतः "कुणी जाल का, सांगाल का", गीतकारः कवी अनिल)


Thursday, January 24, 2008

नव्याने तेच!

आर्त मी गातो तराणे, सूर हा आहे नवा
शर्थ ही आहे पुराणी, नूर हा आहे नवा


ह्याच सूर्यातील अग्नी वाहणारा तो दिवा
रोज त्याचा उदय तोची, दूर हा आहे नवा

"थांबला तो संपला" हा बोल का आहे नवा?
रोखतो काळास जो, तो शूर हा आहे नवा

मारणारी तीच शस्त्रे, त्याच मर्त्य जाणीवा
धार काढे अमर, ऐसा क्रूर हा आहे नवा

तेच गाणे पावसाचे, तोच 'दर्दी' पारवा
वाहणार्‍या त्याच जखमा, पूर हा आहे नवा