Tuesday, May 12, 2009

दीडकीची अक्कल

सोळा आणे

वास्तविक आम्ही सरळ प्रश्न केला होता, की "भाऊ, तुम्हांला काय वाटतं, कोण होणार पी. एम.?" त्यावर सरळ उत्तर द्यावं किंवा फार फार तर "आम्हांस विचारू नका. आम्ही चारचौघांसारखे अराजकीय आहोत" असं सांगावं की नाही. तर ते नाही. ह्या आमच्या साध्या प्रश्नावर ते इतकं काही बरळले, की ते हल्ली लोकसत्ताचे अग्रलेख लिहितात काय, असे आम्हांस त्यांना विचारावेसे वाटत होते. आता ह्या प्रश्नावर भल्याभल्यांची विकेट गेली आहे, हे काय आम्हांस लोकसत्तेचे अग्रलेख वाचून ज्ञात नाही? त्यात ह्यांची भर कशासाठी? मध्यंतरी तर आम्ही एनडीटिवी सारख्या अद्यापही आक्रस्ताळेपणा न करता बातम्या देण्याची आपली सभ्यता जपून ठेवलेल्या वाहिनीवरदेखील लोकसत्ताकारांना ऐकले. महाराष्ट्रातील राजकारण फार जटिल झाले आहे, त्यावर तुम्ही प्रकाश टाकाल काय, अशा प्रश्नावर ते एवढे काही बोलले, की गाठ सुटायचं तर सोडाच, पक्की निरगाठ बसली. कोल्हापूर ते नागपूर मार्गे पुणे, बारामती ते जेवढं काही बोलले त्यातून एखाद्याने तोंडपाठ असलेले महाराष्ट्र एक्सप्रेसचे वेळापत्रक घडाघडा म्हणून दाखविल्यावर जेवढा काही बोध होईल, तेवढाच तो आम्हांस झाला. तर सांगायचा मुद्दा हा की ते गृहस्थही तद्वतच बोलत होते. आता ते व्यवस्थापन विषयातील तज्ज्ञ असल्याने तीळभर माहितीही मणभर गुळात मिसळून सांगण्याची त्यांची हातोटी आम्हांस माहित होती. शिवाय गेले काही दिवस आम्हांला वाटते आहे की, लोकसत्तेने आपल्या पत्रकारांसाठी कोणा व्यवस्थापन बाबांचे प्रशिक्षण सुरू केले असावे. त्यातला एक खेळ म्हणून प्रत्येक जण एकेक वाक्य लिहितो नि ती सगळी एकत्र जोडून त्यांचा एक अग्रलेख तयार करण्यात येतो. त्याशिवाय इतकं सैरभैर एकटा माणूस कसे लिहिल? ह्यामुळेच त्या वृत्तपत्रातील कर्मचार्‍यांमध्ये 'संघभावना' वाढीस लागली असावी, असाही आमचा संशय आहे. त्यामुळे न राहवून शेवटी आम्ही त्यांना विचारलेच, की आमचे हे संशय खरे का, नि असल्यास ते बाबा आपणच काय? तर त्यांची अशी बाबा म्हणून संभावना केल्यामुळे ते उद्विग्न झाले. पण शेवटी ते व्यवस्थापन तज्ज्ञ. कमाल मधुर भाषेत किमान मधुर गोष्ट सांगण्यात त्यांचा हात कोण धरणार? त्यामुळे ते फक्त "तो मी नव्हेच" एवढंच एकदम नाट्यपूर्ण आवेशात म्हणाले. म्हटलं, "मग तुम्ही हल्ली काय करता?" तर म्हणाले, "हल्ली मी निवडणुका म॓नेज करतो." म्हटलं, "हो? कुणासाठी?" तर म्हणे की, "ते सांगता येणार नाही. आचारसंहिता आहे." हे फारच झालं. ज्यांनी पाळायली हवी ते ती मोकाट पायदळी तुडवताहेत, नि ह्यांना म्हणे आचारसंहिता! म्हटलं, "राहिलं, नका सांगू!" मनात म्हटलं, जणू काही आम्हांला कळणारच नाही.

कमळाच्या ताटव्यात दुर्दैवाने म॓नेजरची जागा रिक्त आहे, हे आम्हांस माहित होते. म्हणून आम्ही प्रथम तिथे मोर्चा वळवून खासगीत एका दक्ष मित्रांकडे फोटो सरकवला, "आपण ह्यांना पाहिलंत का?" तर ते नुसतं नव्हे, शत प्रतिशत नाही म्हणाले. पेस्तनकाकांनंतर हेच. काहीही विचारलं की ते फक्त शत प्रतिशत उत्तर देतात. आमचा पहिल्याच चेंडूवर त्रिफळा! पण पडूनसुद्धा नाक वर ठेवणे आम्ही त्यांच्याचकडून शिकलो असल्याने आम्हीही सावरून उलट प्रश्न केला, "यंदा कसं feel होतंय?" तर म्हणाले, "लाल लाल वाटतंय!" आम्ही उडालोच. ह्यांना लाल लाल वाटायला हे काय विश्वासदर्शक ठरावावरचं मतदान आहे? बरं कुठे रंग तर लालबिल दिसेनात. तर अचानक भाषण संपून टाळ्या वगैरे चालू झाल्या सभेत, नि मागे गाणं सुरू झालं. तसं हे एकदम नमस्ते सदा सुरू झाल्यासारखे ताडकन उठले नि ताल धरून नाचू लागले, "लाल मेरी ओ लाल मेरी, लाल मेरी पत रखियो भला झूलेलालण..." त्यांची ही शिस्त आम्हांस नवीनच होती. त्या धिंगाण्यात आपण नको, म्हणून आम्ही आमची पत सांभाळण्यासाठी तेथून सटकलो नि थेट टिळक भवन गाठलं. तिथे कुणी ज्योतिषी सगळ्यांचे हात बघत होते. आम्हीही पुढे केला. नि पुढची दहा मिनिटे तो का केला, असे आम्हांस झाले. आम्ही कोणी संभाव्य इच्छुक उमेदवार आहोत असा त्यांनी समज करून घेतला होता. त्यामुळे ते दिल्लीतल्या लोकांसमोर काय बोललात तर तिकीट मिळेल, बंडखोरी केल्यास निवडून येण्याची शक्यता किती, विधानसभा निवडणुकीत आपण कुठल्या गोटात असू, आघाडीतले मित्र प्रचारात मदत करतील का, अशी काहीबाही भाकीते विशद करू लागले. आम्ही पुरे म्हणून पुढचा त्रास वाचविणयासाठी हात खिशात घातला. तर ते चातकासारखे आमच्याकडे पाहू लागले. त्यांचे सारे लक्ष आमच्या खिशाकडे होते. आपण इच्छुक उमेदवार नाही नि आपल्या पाकिटात फक्त ठाणे ते सीएसटी-चर्चगेट असा पास व काही चिल्लर एवढेच असल्याचे कळल्यावर त्यांचा अगदीच भ्रमनिरास झाला. तिकडे एकुणात गल्लीपासून दिल्लीपर्यंत फार म्यानेजर असल्यामुळे अजून कोणी नवीन ह्यांनी घेतला नसणार अशी आमची खात्री पटली. मग आम्ही थेट मनसे नाशिक गाठलं. तिथे वेगळाच गुंता होता. आम्ही नाशकात उतरलो तर सगळ्यांनी मनसे "इस बार..." असा एकच घोषा लावला होता. मन से, गर्व से असल्या आत्यंतिक निष्ठावाल्यांना आम्ही जराही भाव देत नाही, त्यामुळे आम्ही थेट आबांना गाठलं, म्हटलं, "आबा, हिंदी आहे हे, मीटर थोडक्यासाठी चुकलं जरा. इस बार च्या ऐवजी अब की बार केलं असतं तर मात्रा मोजून बघा, कसं मीटरमध्ये फिट्ट बसलं असतं." तर ते आमच्यावर उखडलेच, "आम्हांला शिकवू नका. आम्हांलाही हिंदी येतं. शिकलोय आम्हीही हिंदी, इंग्रजीवाल्यांना म॓नेज करायला." आत्ता कसं! ते असे थेट मुद्द्यावर आल्यावर आम्ही लगेच प्रश्न केला, "कोणाकडून?" तर त्यांच्याशी लगट करू पाहणार‍्या त्या पत्रकार ताईंना काय झिडकारलं नसेल, तसं झटकून म्हणाले, "ते आम्ही तुम्हांस कशास सांगू?" म्हटलं, "बरं! नका सांगू. १७ मे ला तरी हातात हात घेणार, विळा घेणार की धनुष्यबाण घेणार तेवढं सांगा, म्हंजे झालं." तर ते एकदम इंग्रजीत गाऊ लागले, "If you come today, it's too early; If you come tommorrow, it's too late, ...tick tick tick..." ती टिकटिक काही थांबेचना. ह्यांचं म्यानेज करणं प्रकरण फारच आंतरराष्ट्रीय आहे, त्यामुळे आमचे ते गृहस्थ ह्यांच्या काही कामाचे नाहीत. नाशकातून परत आलो तसे आम्ही खरं तर बांद्र्याला जाणार होतो, पण दादर ते बांद्रा एक्स्टेंशनचे पैसे उगा का दवडा? असा आम्हांला प्रश्न पडला. मुळात कारण ज्यांच्यासाठी जायचं त्यांचा पक्ष त्यांचे साहेब चालवितात का हे साहेब चालवितात, हेच आम्हांला आताशा कळेनासं झालंय. मग आम्ही म्हटलं, "मरो." मग आम्ही जरा न्याशनल लेवलला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कुणाचाच फोन लागेना. सगळ्यांच्या लायनी व्यस्त. चांगल्या निवडणुका आल्यात, खोर्‍यानं म्यानेजर मिळतात सगळं काही म्यानेज करायला, तर हे लोक स्वतः कामं करताहेत, असं पाहून आम्हांला नवल वाटलं. म्हणजे परिस्थिती खरंच हाताबाहेर चालली होती, नि मग हे आमचे म्यानेजर नेमकं कोणासाठी काम करीत होते? शेवटी न राहवून आम्ही कोलकत्त्याला फोन केला. हे लोक काही असे म्यानेजर बिनेजर घेणार नाहीत अशी आम्हांस खात्री होती. पण म्हटलं न जाणो, एकदा खात्री करून घेऊ. प्रथम आम्हांस वाटले, की क्रॉस कनेक्शन लागले आहे. कारण फोन लागला तेव्हा पलीकडे कुणीसं, "नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी" असं गात होतं. आम्हांला वाटलं, वैशाख चालू झालाय, तर वर्षारंभ साजरा करणार्‍या कुणा लाला टांगेवाल्यास ऐन वसंतात अर्ध्या रात्री पडलं असेल स्वप्न. म्हणून आम्हीही त्यांच्या सूरात सूर मिसळला. तर ते म्हणे, "हट्, हे तर शरदाचं चांदणं आहे". म्हटलं, "आत्ता?" आता भाबड्या समाजवाद्यांना शरदाच्या चांदण्यात एस. एम. दिसले, तरी आम्ही म्हणू ठीक आहे. आता वाटतं एकेकाला, काय करायचं आपण! पण चांगलं विवेकनिष्ठा वगैरेच्या गप्पा करणार्‍या, दर वाक्याला समोरचा राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्यागत चार संज्ञा त्यावर फेकणार्‍या, पोक्त कम्युनिस्टांनी ऐन वसंतात "शारद सुंदर चंदेरी राती.." गावं? " माया बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला, ऐका लाला गातो गाणे..." हे बालगीत गावं? ही म्हणजे हद्द आहे. आमच्या काही ती पचनी पडेना. त्यामुळे ह्यांनीच चक्क म्यानेजर ठेवला की काय? अशी एक पाल आमच्या मनात चुकचुकली. तर ते "म्यानेजर? तुम्ही भांडवलशाहांचे चेले,...." असं सुरू करून पुढे वदते झाले, तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. "हुश्श" करून आम्ही त्यांना बाय बाय केले. हल्ली आम्ही त्यांना बायच करतो. टाटा वगैरे म्हटलं की त्यांना वाटतं, आम्ही मुद्दामून त्यांच्या दुखर्‍या नशिवर बोट ठेवतो आहोत. हल्ली त्यांनाही बाय बाय चालतं, हेही नसे थोडके!

मग आम्हांस कळेना की हे थोर गृहस्थ नेमकं कुणासाठी काय म्यानेज करीत आहेत. आम्हांस थांगपत्ता लागू नये, हा म्हणजे आमचा अपमान होता. अस्मितेच्या चिंधड्या होताना पाहवेना. आता काय केलं म्हणजे हा बहुरूप्या "सू छे सू छे" म्हणत खडबडून जागा होईल नि स्वतःच कबुली देऊन बसेल, हे आम्हांस कळेना. मग आम्हीही धीर धरला. वाट पाहिली. पंधरा मे च्या रात्री आम्ही त्यांना शतपावल्या करताना गाठले. तर ते भलतेच चिंताग्रस्त वाटले. उद्या काय होणार, म्हणून ते चिंतित आहेत, असा एक सर्वसाधारण समज करून देण्यात आला होता. पण आम्हांस काही पटेना. एवढा चाणाक्ष म्यानेजर असा ऐन वेळी का बरे सैरभैर व्हावा. म्हणून आम्ही त्यांचा बारकाईने अभ्यास केला नि एकाएकी नूर ही नूर सा आम्हांस आसमाँ तलक दिसू लागला. आम्हांस त्यांचे दुखणे नेमके कळले. साहेबांनी हुशार खेळी केली होती. गेले तीन महिने म्यानेज केल्याचा नुसता आभास निर्माण केला होता. त्यांची पक्की धारणा होती, की यंदा आधी काहीही करून फायदा नाही, उगाच श्रम का दवडा? म्हणून ह्यांनी नुसता आभास निर्माण केला. पुढे काय काय म्यानेज करायचं ह्याचं त्यांनी चोख प्लानिंग केलं होतं. पण सुज्ञ भारतीय मतदाराला आपण फारच गौण लेखतो आहोत, अशी एक पाल ऐन वेळेला त्यांच्या मनात चुकचुकली होती. नि जर उद्या आपली अवस्था २००४ च्या मुलायमसिंगांसारखी झाली, तर आपले कसे होणार? ह्या एका विचाराने अखेर त्याही मुत्सद्द्याची झोप उडविली होती. ते मला दुसर्‍या दिवशी रात्री भेटले, तेव्हा आम्ही फक्त स्मित हास्यांतून बोललो. "हृदयाचे थेट हृदयात" पोहोचले होते. यंदा त्यांनीच समोरून प्रश्न केला, "दोन नवीन उद्योग सुरू केलेत. भागीदार होता काय?" म्हटलं, " आता काय नवीन?" तर म्हणले, "येथपासून पुढे कानाला खडा. अशी रिस्क पुन्हा घेणे नाही. त्यामुळे सर्वपक्षीय थिंक टँक म्यानेज करायचा धंदा काढलाय. आम्ही काही जण आणतो, काही तुम्ही आणा." म्हटलं, " धन्यवाद! उपक्रमास शुभेच्छा!" तशी म्हणाले, "अजूनही एक धंदा काढलाय". म्हटलं, "बोला." तर म्हणाले, "लोकांनी मतदानच केलं नाही, तर सगळी पंचाईत होईल, असा अजून एक धडा घेतलाय. म्हणून त्यांना घाबरविण्याचा धंदा काढलाय. रोज रात्री काहींना टारगेट करून घाबरवायचं. मतदान केलं तरच काही खरं आहे, असं सांगत राहायचं. मतदानाची इतकी दहशत निर्माण करायची, की त्यांची झोप उडली पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना घाबरविण्याच्या वेगवेगळ्या क्ऌप्ती तयार करणे सुरू केले आहे. ट्रेड सिक्रेट आहे, सगळंच काही सांगता येणार नाही. आपणही 'जागे व्हा!'" आमची पुढल्या पाच वर्षांसाठी झोप उडवून ते निघून गेले. तेव्हापासून आम्ही जागरूक झालो आहोत, असं आम्हांला उगाच वाटतंय.


आठ आणे

परवा आम्हांस भयंकर स्वप्न पडले. आपण बोलत आहोत व आपल्या टुकारातिशय टुकार वक्तव्यावरसुद्धा कुणी उठून स्वतःचे पादत्राण आपल्या दिशेने भिरकावित आहे. आम्हांस तत्काळ आपण बुश ते मनमोहन मार्गे चिदंबरम, येडियुरप्पा वगैरे पंक्तीत जाऊन बसल्याचा साक्षात्कार झाला. मग आम्हीही रीतसर "जाऊ द्या, गरीबाला सोडा" वगैरे नाट्यप्रवेश केले. मग ही आपली संस्कृती नाही, असेही निवेदन केले. मग आम्हांस प्रश्न पडला, की पादुकांना पालखीत ठेवून त्यांची मिरवणूक काढणारी, त्यांना वंदन करणारी, त्यांना राजसिंहासनावर ठेवून त्यांच्या साक्षीने कारभार चालविणारी संस्कृती आपली. तीत एकाएकी यत्र तत्र सर्वत्र पादत्राणे भिरकविण्याची प्रथा का बरे रूढ होत चालली आहे? (रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याधारे शासन चालविणारा भरत हा कमजोर राजा आहे, असा आरोप त्याच्यावर कुणी केला होता काय, असा आम्हांस एक अभ्यासू उपप्रश्नदेखील पडला आहे. पण ते असो.) कुणा राजकीय व्यक्तीचे बोलणे आपल्यास पटले नाही, तर एवढे काय मनास लावून घ्यावयाचे? मग भले ते मनसे बोलत असोत. नि राग आला तरी आपले जोडे काढून सरळ फेकावेत नि मग तळपत्या उन्हात अनवहाणी (हा शब्द कसा लिहावा ह्याबद्दल यास्मिनताई शेख काय म्हणतात? अनवाणी असा प्रचलित उच्चार आहे, जो आमच्या मते व्युत्पत्तीने सिद्ध होत नाही (म्हणजे काय ते आम्हांस विचारू नका.) अनवहाणी म्हणजे नाहीत वहाणा पायांत ज्याच्या असा तो, असा नञ बहुव्रीही आम्हांस योग्य वाटतो.) फिरावे हा विचार आम्हांस कायतरीच वाटतो. मुळात आम्हांला भर सार्वजनिक ठिकाणी वहाण सोडून द्यावी नि पुढील मार्ग क्रमावा ही कल्पनाच कसनुशी वाटते. प्रत्येकवेळी विमानतळावर आमचं सर्व काही हरण करून आम्हांला नेसत्या वस्त्रानिशी त्या यंत्रातून पाठवितात त्या प्रत्येकवेळी ते अग्निदिव्य पार पडले की आम्ही पलीकडे जाऊन ल॓पटॉप वगैरेच्या आधी आमच्या चपला उचलतो. खरंच, धरणीमातेची शप्पथ! त्यामुळे असं कुणी उगीच उठून चप्पल फेकील हे काही आमच्या पचनी पडत नाही. नि प्रसिद्धीपरायणता वगैरे झूठ आहे. तेवढेच असेल तर एखादा सर्व हिंदी वृत्तवाहिन्यांना पत्र पाठवून "आज अवकाशातून काही पांढरे बूट घातलेले पांढर्‍या पायाचे लोक येऊन आमची गाय घेऊन गेले" असे कळवेल. आहे काय नि नाही काय. पण चपला? छे, आम्हांस नाही पटत. चपला एवढ्याही स्वस्त नाहीत. मग आम्ही अधिक विचार करता एकच शक्यता प्रकर्षाने आमच्या मनात आली. हा कुठल्यारी पादत्राणांची निर्मिती करणार‍्या कंपनीचा आपला खप वाढविण्याचा उद्योग असणार. चपला फेकायला लोकांना उद्युक्त करायचे. मग सगळे चपला फेकू लागले की वाढला आपला खप. मग त्या फेकलेल्या चपला गोळा करायला माणसं नेमायची, म्हणजे त्या पुन्हा विकून अधिक लाभ. शिवाय प्रत्येक क्ष पूर्णांक पंच्याण्णव शतांश किमतीच्या चपलांच्या जोडीमागे पाच पाच पैसे लाटून होईल तो नफा वेगळाच. मग हे असंच वाढत जाणार. विद्युतकण अभियांत्रिकीत (शासकीय महाविद्यालयात शिकलो आम्ही, काय एकेक नावं! विचारू नका.) ह्यालाच avalanche effect म्हणतात (ना? हो म्हणा.) तर असं चपलांचं वादळ क्षितिजावर घोंघावत आहे, अशा भीषण कोलाहलात दचकून आम्ही जागे झालो. "पादत्राणे - एक निषेधाचे माध्यम", ह्या विषयावरील परिसंवाद संपून पांगापांग झाल्यागत वाटत होती. अकल्पित गदारोळानंतरची शांतता आसमंतात होती. सपातांच्या जोडीतील एक अकेली विजोड होऊन व्यासपीठाशी पडली होती. भानावर येऊन दचकून आम्ही आमचे पाय पाहिले. आमच्या पायीची वहाण पायी पाहून जीव भांड्यात पडला. आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला, बूटांची सैल झालेली नाडी करकचून बांधली नि तिथून निमूट काढता पाय घेतला. दुसर्‍यादिवशीच्या वर्तमानपत्रात आम्ही स्वप्नात दंग असताना मिस केलेल्या गोंधळाबाबत "पायीची वहाण पायी बरी" अशा शीर्षकाचा अग्रलेख आला होता, तो वाचला. आम्हांस मात्र कालचा गोंधळ बरा होता, असे दिवसभर वाटत होते.

7 comments:

  1. अब्बबब...डेडली लिहिले आहे !

    ReplyDelete
  2. aayla...lai zakas ki

    gabari ghetli aahes esp sumar ketkaranchi tar jabbar

    ReplyDelete
  3. agdi kharay loksattetlya agralekhanbaddal...
    mahitipoorna lekhachya navakhali vachniyata haruvun baslele lekh astat aatasha ...
    I wish if Sumar K :) could read ur blog!! :D
    just too good

    ReplyDelete
  4. @जृंभणश्वान, संवेद, आल्हाद,

    धन्यवाद!

    @निनाद,

    धन्यवाद. तू ॐकारचा मित्र आहेस ना? म्हणला मला तो. तुझाही ब्लॉग पाहून, वाचून आलो मी. नियमित का लिहित नाहीस?

    ReplyDelete
  5. @ यशोधरा,

    थांकु! :)

    ReplyDelete