Saturday, July 5, 2008

वायफळ सूर

वायफळ सूर (१)

तळ्याच्या कोपर्‍यावर उजव्या हाताला जरा आतल्या बाजूला एक गणपतीचं देऊळ. बाजाराच्या गजबजाटात लपलेलं. या गणपतीला रोज वेगवेगळी आरास. कधी जास्वंद, कधी दुर्वा, कधी नारळ नि असं बरंच काही. रोज वेगळी. नि रोज सुरेख. प्रसाद पण छान मिळायचा. मला त्याचीच मजा. गणपतीच्या मूर्तीबद्दल लिहायला ती एवढी निरखून पाहिलीय कोणी? खरं तर मूर्तींमध्ये काय डावं उजवं करायचं? तसंही गणपतीला येणार्‍या बोळिंजकरांच्या गणपतीच्या मूर्तींच्या अतीव नाजूक डोळ्यांपुढे बाकी सगळ्या मूर्ती साध्याच!

रस्त्याच्या जेवढ्या अंतरावर हे देऊळ, साधारण तेवढ्याच अंतरावर डाव्या बाजूला त्या भव्य, प्रशस्त चर्चचं प्रवेशद्वार. संध्याकाळी आजीकडून घरी जाताना तिथे जायचा हट्ट. चर्चची काँन्व्हेंट शाळा नुकतीच सुटलेली नि मुलं घरी गेल्यावर शाळांना येणार्‍या भयाण सुन्नपणामध्ये ऐकू येणारी ती चर्चची पोक्त घंटा. कधी सहा वेळा वाजायची, कधी सात वेळा. ती वाजायची थांबेपर्यंत हलायचं नाही तिथून. आत गेल्यावर कुठल्याही चर्चमध्ये असते तशी उंच, स्तब्ध शांतता. तिथे जाऊन दोन मिनिटं बसायचं. तिथे तसं कुणाचंच कुणाकडे लक्ष नसायचं. कधीतरी फक्त कोणा आजीबाईंचं चेहर्‍याची ओळख सांगणारं स्मित हास्य. एरवीसुद्धा सणाचं वातावरण असावं असा प्रसन्न चर्च नाताळात, ईस्टरला विशेष सजायचा. मग मी आईबरोबर सार्वजनिक सजावटी बघायला जातानाच्या कुतूहलपूर्ण उत्साहात ती सजावट बघायला तिकडे. त्या सजावटीमधला थेट समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित वृक्षांशी नातं सांगणारा हिरवा रंग, त्याच रंगाच्या झाडांवरचे ते लालबुंद गोळे नि तो आकाशातला तारा. शांत आणि आश्वासक.

चर्च, मंदिरं, मशिदी ह्यांना, तुम्ही जा वा न जा, टाळून जाताच येत नाही नि त्याही कधी टाळत नाहीत. पण जरासंच पुढे गेल्यावर विलक्षण अलिप्तपणे उभी असलेली ती अग्यारी नि मी एकमेकांना नेहमी टाळतच आलो आहोत. आजवर मी कुठलीही अग्यारी आतून पाहिलेली नाही, सिनेमात पण नाही. कशी असेल आतून कुणास ठाऊक? ह्यांच्या स्मशानासारखीच अग्यारी पण एक वैचित्र्यपूर्ण गोष्ट वाटत आली आहे मला. हे लोक मेलेली माणसं कोरड्या विहिरींत टाकतात नि मग गिधाडं येऊन ती खातात ही गोष्ट विज्ञानात गिधाडं अन्नसाखळीत आणि इतर नैसर्गिक चक्रांमध्ये येईपर्यंत माझ्या कधी पचनीच पडली नव्हती. तसाच त्या पांढरट‍, फिकट पिवळट वास्तूचा विचित्र पण न बोचणारा अलिप्तपणा. तिच्यासमोरचा तो निर्जीव रस्ता मी "वरचा माँब्रिन दादा इथे येतो नि आम्ही पूर्वी ह्याच कोपर्‍यावर राहायचो" ह्या दोनच गोष्टींवर कापला आहे. बाकी बघण्यासारखं नि सांगण्यासारखं काहीच नाही.

ह्या रस्त्याला पूर्वी फक्त वर्षातून एकदा नवरात्रीच्या नऊ रात्री नि दहा दिवस जान यायची, पुढच्याच चौकात बसणार्‍या देवीमुळे. त्या चौकात एक हौद होता असं मला काहीसं आठवतंय. अगदीच उथळ. बहुदा घोडे पाणी पित असावेत त्यात. कारण तिथेच टांग्यांचं टर्मिनस होतं. तिथून स्टेशन, स्टेशनहून परत. झापडं लावली नसती तरी नाकासमोर सरळच जावं लागलं असतं. तिथेच नवरात्रात देवी बसते. गेली कित्येक वर्षे ती तशीच नि तितकीच प्रसन्न मूर्ती मी बघत आलोय. दरवर्षी तश्शीच, वाघासकट! धार्मिकतेच्या नावाखालची वैशिष्ट्यपूर्ण राजकारणी अशी पैशांची उधळण मी सर्वात प्रथम तिथेच पाहिली. आता ह्यांच्या देवीसारखी जत्रा त्यांच्या गणपतीला भरते, नि त्यांची हंडी नऊ थरांवर फुटली की ह्यांची दहा थरांवर फुटते. लाखांनी काळ्याचे पांढरे होतात. जीवाशी खेळ करणार्‍या धैर्यशील चिमुकल्यांचा पराक्रम उभा महाराष्ट्र घरबसल्या थेट पाहतो. त्यांच्या जीवावर आपली कीर्ती दिगंत करणार्‍यांचा तमाशा डोळ्यांत तेल घालून पाहणार्‍या मुर्दाड माणसांनी रस्ता अजून एक दिवस जिवंत होतो एवढंच.

(क्रमशः)

Friday, July 4, 2008

वायफळ सूर

रेल्वेची चार स्टेशनं दिसतात तसंच एक स्टेशन. भारतातली पहिली आगगाडी कधीतरी येऊन थांबल्याच्या पुसलेल्या खूणा जपणारे काही दगड असतील कदाचित पूलांचे भार सोसत उभे आडोशाला नि तो दाराशी असलेला भला मोठा वृक्ष नि त्याचा पार. तो अजून तसाच उभा आहे. कधीपासून कुणास ठाऊक? एनर्जी स्टाँल हे लोकांचं भेटायचं ठिकाण होतं तेव्हाही नि नसलेला एनर्जी स्टाँल हे भेटायचं ठिकाण झालं तेव्हाही. एक नंबरचा इंडिकेटर ही भेटण्याची जागा होती तेव्हाही नि ती जुन्या एक नंबरवरचा इंडिकेटर अशी झाली तेव्हाही. तो होताच. तसाच. माझ्या नाँस्टँल्जियात. तिथूनच बाहेर पडायचं स्टेशनकडे पाठ फिरवून नाकासमोर सरळ चालत. रस्ता वळेल तसं वळायचं.

तशा फूटपाथवरच्या फुटलेल्या सगळ्याच लाद्या सवयीच्या. अंधारातही चालता आलं असतं इतक्या. म्हणजे कुठल्या लाद्या अर्ध्या फुटल्या आहेत, कुठल्या लाद्या बाजूच्या वडापावच्या गाडीच्या गळक्या पिंपात भिजलेल्या असतात, कुठल्या ठिकाणचा फूटपाथ चढता उतरताना पाय किमान दीड फूट उचलावा लागतो, पावसाळ्यात पाणी साचल्यावर कुठल्या चार लाद्यांवरून कमीत कमी लांब उड्या मारून चालता येतं, फूटपाथच्या कुठल्या भागावरून चाललं म्हणजे रस्त्यावरून जाणार्‍या गाडीने उडविलेलं पाणी अंगावर उडत नाही, कुठलं गटारावरचं झाकण कधीकधी उघडं असतं ह्याचे नकाशे वाचायला पायांना डोळे थोडीच लागतात? तसंच सवयीने चालत राहिलं की थोड्या अंतरावर पहिल्यांदा नजर वळायची उजवीकडच्या बागेकडे. आजोबा कधी कधी घेऊन यायचे तिथे. स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत दगडावर कोरलेलं अण्णांचं नाव दाखवायला. हल्ली उघडी असते का ती बाग?

त्याला लागूनच असलेलं शंकराचं मंदिर. तसे आजूबाजूला पुष्कळ देव होते. पण मुख्य शंकर. एका छोट्याशा दारातून पायर्‍या उतरून खाली गेलं की प्रशस्त गाभार्‍यामधली शंकराची भली मोठी पिंड नि त्याच्यावर अभिषेक करणारा कलश. त्याच्याबाहेरचा तो पांढराशुभ्र भला मोठा नंदी. हा नंदी पिंडीच्या दिशेने अणुभर की अशाच काहीतरी सूक्ष्म अंतराने म्हणे सरकतो नि तो जेव्हा पिंडीशी पोहोचेल तेव्हा जलप्रलय होणार. आपण मोठे होऊ तोवर तो निदान एक‍ दोन वीत अंतर तरी सरकेल असं मला तेव्हा फार वाटायचं. नंतर नंदीची चाल कधी मोजली नाही पण जलप्रलयसदृश परिस्थिती २६ जुलैला पाहिली. देवळासमोरचा भलामोठा तलाव भरून वाहणं हे पावसाच्या कहराचं परिमाणसुद्धा थिटं पडलं तेव्हा. रस्त्याच्या डाव्याबाजूला असणारं हे तळं पूर्वी म्हणे देवळाला लागून होतं. मग रस्ता बांधला मधे. असेलही. तो रस्ता माझ्या आधीच्या पिढ्यांच्या नाँस्टँल्जियाचा भाग नसेल कदाचित.

हे तळं मागे एकदा गाळ काढायला म्हणून संपूर्ण उपसलं होतं. बिल्डींगची पाण्याची टाकी रिकामी करावी ना तसं रिकामं केलं होतं. पाणी कुठे गेलं कोणास ठाऊक, गाळ मात्र शहरभर पसरला होता. तेव्हा त्या तळ्याच्या मधोमध असलेल्या एका सुरेख कमळात असणार‍्या शंकराच्या पिंडीपर्यंत चालत जाता येत होतं. एका संध्याकाळी तळ्यात तसं चालून आलेलंही मला आठवतंय. पुढे गाळ निघाला, तळं भरलं, सुशोभिकरणाच्या भन्नाट कल्पनांमध्ये ते सुंदर कमळ तुटलं नि एक मोठ्ठं बटबटीत देऊळ तळ्यात उभं राहिलं. त्यानंतर त्या तळ्यात बोटीतून फिरतानाही ती मधलं बटबटीत वास्तू डोळयात खुपायची. लहानपणी जवळपास दर महिन्याला त्या बोटींमध्ये बसलो असेन. फक्त बोटीत बसता येत होतं तेव्हा. हातात धडाधड फोटो घ्यायला डिजिटल कँमेरे नव्हते नि ती बोट राइड व्हीडियो शूट करायला ते कँमेरे मूव्ही मोड मध्ये टाकून सज्ज राहायची अनावश्यक धडपडही नव्हती. हात मोकळेच असायचे. माझे पाण्यात घालायला नि आईचे मला धरायला.

(क्रमशः)

Tuesday, May 20, 2008

निवांत क्षणांचे अन्वयार्थ किंवा असंच काहीतरी...

डोहात तरंगे काच, अन व्योम व्यापते नीळ
फुंकरही व्हावी वात, अन फूल घालते शीळ
संन्यस्त कातळावरली ती गजबजलेली वेळ


त्या खडकापाशी आज क्षण शांत भेटले चार
बाष्पास दिसावे सहज घन सांद्र, गोठले, गार
पाऊलखुणांचा तेथे काळाशी जुळला मेळ


त्या स्तब्ध ठिकाणाहून कितीदा गेलो नि आलो
पण काळ थांबला स्तब्ध, तेव्हाच स्तब्ध मी झालो
क्षण सुन्या फलाटापाशी ती धुक्यात थबके रेल


स्मरतात वायफळ सूर, रेंगाळत येता सांज
ते चर्च सांगते वेळ, राउळी वाजते झांज
नि आर्त सूरांनी सजते मशिदीत शुभ्र ती वेल


निःशब्द, असेच निवांत क्षण हळूच उमलून यावे
अनन्वयच त्यांची खूण, भय त्यांच्याशी विसरावे
हा निमिषांचा निमिषांशी निमिषार्धासाठी खेळ

Monday, April 28, 2008

मैत्रीच्या भुताचे दशावतार किंवा असंच काहीतरी...

ते नाते कधीच नव्हते
मैत्रीचे कसले बंध?
वार्‍याला अजून स्मरतो
सुकल्या जाईचा
गंध

मी उगीच भावुक होतो
मैत्रीस समजून नाते
वार्‍याशी खेळुन सुकते
रानात तृणाचे पाते

कुठल्या नियमाच्याधारे
मैत्रीचे नाते व्हावे?
वाहणे सुकेना म्हणुनी
पाण्याने पारा व्हावे

मौनाने स्पष्ट करावा
मस्तकात भिनला पारा
तुज मात्र सोडून भगवा
वाटला अबोली तारा?

वागेन कसाहि कधीही
हे बंधन अतूट गमते
डोहात ठरेना तारा
अन रिती अंजली भिजते

का मला कधी ना कळले
मैत्रीचा नसतो रस्ता
मग धूमकेतू दुरूनी
सूर्याशी आला नसता

त्या रस्त्यावर भर दिवसा
मी मुक्त मनाने हसलो
फसलो मी, कळले मी त्या
सूर्याला मित्र समजलो

मग हेही मला उमगले
सूर्याला नाही वैरी
त्याच्या अस्ताशी झडती
स्तोत्रांच्या सावध फैरी

तेव्हा मैत्रीची सारी
व्याख्या एकेरी झाली
एकाची मैत्री झाली
एकाने मैत्री केली

ना कधी गायली कोणी
मैत्रीची सहस्र नावे
मंतरल्या काळासाठी
'भूत' एवढेच म्हणावे