Friday, March 23, 2012

देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई?

देऊळ (अखेर) पाहिला. लघुकथा/रूपककथा हा संक्षिप्त लिखाणाला काव्याकडे नेणारा प्रकार लिखाणात प्रभावी असला, तरी अनेकदा त्या गोष्टींवरचे चित्रपट साफ फसतात. असे चित्रपट व्यावसायिक वगैरे असणं तर दूरच. देऊळ याला अपवाद आहे. वळू वगैरे चित्रपटांनी रुजवलेला सादरीकरणाचा पोत देऊळ बिनदिक्कत उचलतो आणि अधिक प्रगल्भ करतो. देऊळ आपली बारीकसारीक गोष्टी टिपणारी दृश्ये, दैनंदिन वास्तवाचं समर्थ चित्रण आणि सामन्यांच्या आयुष्यातही गोष्टी घडू शकतात या धाग्यातून रस्किन बॉंडचीही आठवण करून देतो. तो ’रिकामं देऊळ’पासून ’शिलाखंड’पर्यंतच्या कुसुमाग्रजांच्या अनेक समिधांचीही झलक दाखवतो. या दोहोंच्या मिश्रणातून तयार झालेली एक पूर्ण भाग न जाणारी गोष्टही सांगतो. पण तो अमूर्त नाही. तो वास्तवाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळेच तो अधूनमधून ’ढोलताशे’सारख्या नाटकाचीही आठवण करून देतो. पण त्याने नायक आणि सूत्रधार यांची चोख वाटणी केली आहे. त्यामुळेच सूत्रधार त्याची विवेकनिष्ठा नायकावर लादत नाही. परिणामी, देऊळ कुठेही प्रचारकी आणि तर्ककर्कश होत नाही. मुळात ती काही अवकाशांच्या संतुलनाची एक कथा आहे. ती आहे ते दाखवते. सूत्रधाराशिवाय कोणीही त्या गोष्टीत काहीच भाष्य करत नाही, पण तरीही तिची वास्तवाशी असलेली घट्ट वीण काही न बोलताही बरंच काही सांगून जाते. देऊळची गाणी विंदांचीही आठवण करून देतात तेही त्यातल्या विवेकनिष्ठ रोखठोकपणामुळेच. आपल्या गोष्ट सांगण्याच्या हातोटीमुळे देऊळची नाळ कळत नकळत कुठेतरी ’मालगुडी डेज’शीसुद्धा जोडलेली वाटते. सुरुवात आणि शेवटाचं पार्श्वसंगीतही हे नातं काहीसं अधोरेखित करतं. आणि तरीही देऊळ या सगळ्यांपेक्षा वेगळा आणि सरस ठरतो. 

ही गोष्ट आहे, त्यामुळे ती इथे सविस्तर सांगण्यात अर्थ नाही. तो उद्देशही नाही. चित्रपट सुरू होतो तो एका पुरातत्व खात्याचं उत्खनन चालू असल्याच्या दृश्याने. वास्तविक "हे काय (खोदकाम) चालू आहे?"छाप सपक संवाद नायकाच्या तोंडी इथे पुरू शकला असताही. पण इथे कोरीवकामात सपकपणाला स्थान नाही. त्या नायकाच्या विश्वात चाललेला व्यवहार इथपासून लख्खपणे दिसू लागतो. आपल्या आणि चित्रपटाच्या पहिल्याच संवादात हा चित्रपटाचा (होऊ घातलेला) नायक ज्या कमालीच्या अलिप्तपणे, निरागसपणे, साशंकतेने आणि स्वाभाविकपणे विचारतो, "काय एशीझ्येड हाये का?" तिथेच हा चित्रपट आपला खुंटा बळकट करतो. आपल्या आजूबाजूला चालू असलेल्या "विकास प्रकल्पां"विषयी ग्रामीण जनता अनभिज्ञ असते, या प्रकल्पांविषयीची साशंकता "बाहेरच्यांची"च अधिक असते अशा सार्वत्रिक, अकारण शहरी मानसिकतेला हा चित्रपट तिथेच हरताळ फासतो. मग तो मागे वळून पाहत नाही. वास्तविक त्या कथेत शहरी-ग्रामीण असं आहेही आणि नाहीही. ती कथा एका गावात घडते. म्हणून पटकथा त्या गावाचं वास्तव कुठलीही तडजोड न करता समर्थपणे उभं करते, आणि कथेतली पात्रं आपापले संवाद त्यानुरूप त्या बोलीभाषेत बोलतात. ’चला एक ग्रामीण (महाराष्ट्र दाखवणारा/पार्श्वभूमीला असणारा) चित्रपट काढू’ (चएग्राचिका) या मानसिकतेतून काढलेला हा चित्रपटच नव्हे. साहजिकच ’चएग्राचिका’ मराठी चित्रपटांना अनेकदा (विनाकारण) ग्रासून टाकणारा ’प्रमाण ग्रामीण बोलीभाषे’चा प्रश्न या चित्रपटाला अजिबात पडत नाही. या चित्रपटाचा सूत्रधार त्याची भाषा बोलतो. ती बोली वेगळी असली, तरीही या दोन बोलींच्या व्यवहारात बोलीभाषांच्या शुद्धाशुद्धतेचा आणि पर्यायाने ठरवल्या जाणार्‍या प्रतवारीचा वास येत नाही. 

धार्मिकतेच्या आध्यात्मिक मुलाम्याचं, व्यवसायीकरणाचं, आणि बटबटीतपणाचं प्रत्ययकारी चित्रण तर या चित्रपटात आहेच. पण कोरीवकाम करत बारकावे टिपण्याचा छंद असल्यासारखा देऊळ ते टिपत जातो. गाडीच्या नंबर प्लेटवरील "भाऊ"पासून दत्ताच्या स्टिकरपर्यंत, ’दत्त दत्त, दत्ताची गाय, गायीचं दूध...’ म्हणणार्‍या गाण्यांपासून कांदाफोडी आणि सागरगोटे खेळण्यापर्यंत हे बारकावे बेमालूमपणे येत जातात. भाऊंच्या ताटाखालचं मांजर म्हणून वावरणार्‍या सरपंचबाई आपला भाव वधारल्यावर ऐटीत टिवी पाहताना पार्श्वभूमीला ’होम मिनिस्टर’चं शीर्षकगीत चालू असण्याची कल्पकता विलक्षण आहे. तिथेही महिला सक्षमीकरणाचं वास्तव दाखवत हा चित्रपट निमूट पुढे जातो. ‘संडास ज्याच्या दारी तोच खरा पुढारी’ अशी घोषणा मिरवणारा भाऊंच्या घरचा संडास आणि सरपंचबाईंचा कागदावर बसलेला मुलगा हागणदारीमुक्त महाराष्ट्राची कथा व्यवस्थित विशद करतात. तापाने फणफणलेल्या केश्याला बघायला आलेल्या बाया आपली देहबोली, वावर, खोलीत बसण्याची जागा यातून सत्तेची सामाजिक उतरंड, पंचायती व्यवथेमधील महिला आरक्षणाने त्या पारंपरिक उतरंडीला दिलेला छेद अलगद चिमटीत धरून आपल्यापुढे ठेवतात. "बाई! पारोश्यानं झेंडावंदन! काय व्हनार या देशाचं?" अशासारखे संवाद एरवी चिमटीतून निसटणारे संकेतांचे आणि प्रतीकांचे संदर्भ सराईतपणे पकडतात. केशा आणि पिंकीमधले शारीर-अशारीर स्पर्शास्पर्श नाना कंगोरे टिपत जातात. साध्या दैनंदिन घटना, जीवन आणि राहणीमान दरडोई मोबाईल फोन आणि दूरचित्रवाणी संच यांचं दरडोई पाणी, वीज, शौचालयं यांच्याशी असलेलं व्यस्त प्रमाण कुठल्याही आर्थिक अहवालांच्या हवाल्याविना आहे तसं समोर ठेवतात. असं बरंच काही.

कथेच्या नायकावर कथा पुढे नेण्याचं ओझं नाही. सूत्रधारावर कथा घडवण्याचं ओझं नाही. कथेच्या नायकाला तात्कालिक जगण्याची मुभा आहे. किंबहुना त्याला काळाच्या एका बिंदूपलिकडचा अवकाशच नाही. सूत्रधाराला भूतभविष्याचा आसमंत आहे. परंतु त्यातूनच आकळलेली आपला काळाचा आवाका मर्यादित असल्याची जाणीव आहे. सूत्रधाराकडे भविष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे, पण अचूक भविष्य सांगण्याची अमानवी शक्ती नाही. त्याच्याकडे विवेकनिष्ठा आहे, पण त्यासाठी जिवाचं रान करण्याची वृत्ती नाही. त्याच्या त्रिशंकू अवस्थेचं त्याला भान आहे. सूत्रधार संपूर्ण मानवी आहे; तो जितका विचारशील आहे, तितका सर्जनशील नाही. नायकही संपूर्ण मानवी आहे; पण तो जितका सर्जनशील आहे, तितका विचारशील नाही. या संतुलनावर पूर्ण गोष्ट उभी आहे. एका विशिष्ट क्षणी सूत्रधाराची आपल्या मर्यादेची जाणीव तीव्र होते. तो प्राचीन उत्खननाच्या जागीही हिंडून पाहतो. आणि अखेर काहीशा हताशपणे गोष्टीला शक्यतांच्या यादृच्छ मार्गांवर सोडून तो कथेपासून नामानिराळा होतो. पुढे एका दिग्मूढ क्षणी नायकही त्याच उत्खननाच्या जागी पोहोचतो. इथे नायकाची सर्जनशीलता सामान्याकडून असामान्याकडे झेपावते. हा आणि केवळ हाच या गोष्टीचा निर्णायक क्षण आहे. परंतु तोपर्यंत पोचण्यासाठी घेतलेल्या मेहनतीत आणि कलाकुसरीत त्या क्षणाची तीव्रता आणि उत्कटतेचं यश आहे. भास-आभास, वास्तव-अवास्तव, मानवी-अमानवी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, दैव-सर्जन, पुरोगामी-सनातनी, श्रद्धा-अंधश्रद्धा, माणुसकी-सत्ता या आणि अशा अनेक सीमांवर नकळत उभं करून या क्षणी नायकही कथेपासून नामानिराळा होतो. केवळ अर्थ आणि शक्यता यांचा बहुमितीय आसमंत उरतो. ’देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई?" ही तर केवळ एक शक्यता. चित्रपट एक चित्रपट राहत नाही; फक्त एक गोष्ट उरते. देऊळ तिथेच इतर अनेक चित्रपटांपेक्षा वेगळा आणि सरस ठरतो.

Tuesday, October 25, 2011

रेषेवरची अक्षरे २०११

मंडळी,

सलग चौथ्या वर्षी ’रेषेवरची अक्षरे’च्या अंकासह तुमच्या भेटीला येताना आनंद तर वाटतो आहेच, खेरीज थोडा अभिमान आणि जबाबदारीही.

इथे ’रेषेवरची अक्षरे २०११’चा अंक ब्लॉगवर आणि पीडीएफमध्येही उपलब्ध आहे.

दर वर्षीपेक्षा तिपटीनं ब्लॉग वाचूनही संकलित साहित्याचा भाग मात्र संख्येनं आणि दर्जानंही आहे तिथेच आहे, याची खंत आहेच. पण ब्लॉगरांकडून नवं काही लिहून घेण्याचा प्रयोग यंदा यशस्वी झाला आणि ’लैंगिकता आणि मी’ यासारख्या अनवट विषयावरचं साहित्य अंकात सामील करता आलं, त्याचा आनंदही आहे. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत.

अंक वाचा, आपल्या सुहृदांना पाठवा, तुमच्या प्रतिक्रिया, तक्रारी, सूचना, सुधारणा कळवा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत.

तुम्हा सगळ्यांना, तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरपूर सकस साहित्याची जावो...


ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
रेषेवरची अक्षरे
२०११

Tuesday, June 7, 2011

आज की कविताएँ

१.

जब आँख़ें खुली होती हैं
और दिखाई देते हैं कुछ मंज़र
जो मेरी दुनिया में तब के अलावा
और कभी कहीं भी दिखते नहीं हैं
तब मेरा ख़्याल है वक़्त का वह  दौर होता है
जब चाँदनी से बचने के लिये मैंने
बदन पर चादर ओढ़ी होती है
इस डर में कि कहीं वह गिर कर
इस बदन को ख़ूबसूरत न कर दे

जब आँख़ खुलती है
तब डर जाता हूँ यह देख कर
कि मंढ़राते हुए संकट जैसा
सूरज छाया हुआ है पूरे आसमान पर
और मैं दुआ कर रहा हूँ
कि मुझमें ऐसी ताकत आ जाये
कि मैं उसे श्राप दे सकूँ -
तोहे राहू लागे बैरी
यह डर तो रोज़ का है
रोज़ के साथ वह भी आ जाता है

२.

ऐसा कुछ भी तो नहीं है
जो किसी ख़ास समय पर होता हो 
जिस के लिए मेरा उधर होना ज़रूरी हो
और जो मेरे बग़ैर शुरू भी ना हो

घड़ी में झाँक कर देखता हूँ
तो पता चलता है कि समय क्या हुआ है

वरना ऐसा कोई भी तो नहीं
जो किसी ख़ास समय पर
मुझसे मिल ने आये
या मुझसे बात करे
मुझे कुछ काम दे
मुझसे कुछ माँगे

कुछ आवाज़ भी तो नहीं यहाँ
जो समय की सूचना दे मुझे

मैं उठता हूँ तो भूख़ लगती है मुझे
और सोता नहीं हूँ तब तक
जब भी सोचता हूँ
तब तब भूख़ लगती है मुझे
अब उसका भी कोई
ख़ास वक़्त नहीं है

यहाँ कुछ भी तो नहीं है
जो समय का पाबंद हो
बस दो चीज़ें हैं
जो समय के साथ
हर दम हर कदम चल रही हैं
एक उसकी रवानी
और दूसरी मेरी हैरानी

कोई ऐसा भी तो नहीं
जो बेवजह आए और
घड़ी भर के लिए
घड़ी को भुलाने की वजह बन जाए

मैं घड़ी में झाँक कर देखता हूँ
तो पता चलता है कि समय क्या हुआ है
वरना इस सन्नाटे में
बिन बताए
वक़्त तो सिर्फ़ जाता सुनाई देता है

Wednesday, April 27, 2011

जैत रे जैत

जैतापूरचा प्रकल्प होणारच असा दृढनिश्चय करून मगच आमचे मुख्यमंत्री चर्चेसाठी तयार आहेत. तसे ते नेहमी सांगत तरी असतात, असे वाचनात, ऐकिवात येते. चर्चा ही समस्येवर तोडगा काढण्यासाठी साधारणपणे केली जाते. त्यात अंतिम निर्णय गृहित धरलेला नसतो नि निश्चित तर अजिबात असू शकत नाही. जर अंतिम निर्णय एका बाजूने पक्का केला असेल नि त्यावरून मागे न हटण्याचा निर्णय घेतला असेल, तर चर्चा कसली करायची? जर चर्चेअंती एखादा मध्यममार्ग निघू शकतो अथवा प्रकल्प पूर्णपणे रद्द होऊ शकतो ह्या इतर शक्यताही गृहित धरल्या तरच त्याला चर्चा म्हणावे लागेल. अन्यथा आम्ही सांगतो त्याने समाधान झाले, तर तुमच्यासह, आणि नाही झाले, तर तुमच्याशिवाय प्रकल्प होणारच ह्या होर्‍याला चर्चा म्हणत नाहीत; दडपशाही म्हणतात. जनतेवर मेहेरबानी म्हणून आम्ही किमान स्पष्टीकरण देत आहोत, एरवी ते द्यायला नि जनतेला निर्णयप्रक्रियेत समाविष्ट करून घ्यायला आम्ही बांधील नाही, हाच दृष्टिकोण सरकारच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. परंतु स्वत:ला लोकशाहीचे तारणहार म्हणवून घेणार्‍या आमच्या कुठल्याच माध्यमांना असे तर्कसंगत प्रश्न विचारेवेसे वाटत नाहीत. कारण, बहुदा त्यांनीही सरकारप्रमाणेच आपली भूमिका निश्चित केली आहे, जी अर्थातच सरकारशी एकरूप आहे.

"लोकांचं भलं नसेल असा प्रकल्प आम्ही आणू तरी का?" असली हास्यास्पद विधानं आमचे मुख्यमंत्री बिनदिक्कत करतात. सरकार एवढं लोकाभिमुख असतं तर आणिक काय हवं होतं? पण एरवी सरकारवर नि कुठल्याही राजकीय प्रक्रियेवर जराही विश्वास नसणारे लोक नि त्यांचे उदात्तीकरण करणारी माध्यमं असल्या विधानांची खिल्ली उडवताना दिसत नाहीत. नारायण राणे ह्यांनी प्रकल्पाच्या निर्मितीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यांचा एकूण आव पाहता सध्याचे मुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला गेल्यावर आपला नंबर लागावा म्हणून हाय कमांडची मर्जी संपादन करण्यासाठी त्यांनी ती उचलली असावी असंच वाटतं. नि त्यांच्या सरळ सरळ चिथावणीखोर विधानांवर कधी कुठल्या माध्यमाने आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. कारण, त्यांनाही त्यात काही गैर वाटत नसणार. शिवसेनेने अचानक केलेला विरोध राजकीयदृष्ट्या शून्य जोखीम असणारा नि विन-विन आहे हे उघड आहे. अणुऊर्जेबद्दल, वीजनिर्मितीबद्दल, मोठ्या प्रकल्पाबद्दल, प्रकल्पग्रस्तांबद्दल शिवसेनेची काही ठोस भूमिका आहे किंवा योजना आहे असे वाचनात नाही. याच कोकणातील दाभोळ प्रकल्पाचा सर्वपक्षीय गोंधळ सर्वांना माहीत आहे. प्रकल्प नाही झाला तरी नि झाला तरी राजकीय लाभ उकळण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट आहे. नि त्याच्या होण्या वा न होण्याची त्यांना किती चिंता आहे, हेही उघडच आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधाला किती भ्यायचं हे सरकारला नि त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे आंदोलनकर्त्यांना नक्कीच माहीत असणार. पर्यावरण, अपारंपरिक ऊर्जा अशी आपल्याकडे दाखवण्यासाठी महत्त्वाची खाती अस्तित्त्वात आहेत. म्हणजे ती स्वतंत्र खाती आहेत एवढंच काय ते त्यांना महत्त्व. त्यांना कधीही कॅबिनेट मंत्री नसतो, पण महत्त्वसूचक स्वतंत्र अधिभार असणारा राज्यमंत्री असतो. त्यांचं काम बहुदा अपारंपरिक ऊर्जास्रोत कायमस्वरूपी अपारंपरिकच राहतील ह्याची खात्री करणे हे असावं. एकुणात ही खाती म्हणजे ’आम्ही त्यांना महत्त्व दिल्यासारखं नि त्यांच्याबद्दल गंभीर असल्यासारखं करतो’ ह्या सरकारच्या मानभावीपणाचा उत्कृष्ट नमुना आहेत. यंदा कधी नव्हे ते पर्यावरणमंत्री जयराम रमेश आपलं अस्तित्त्व अधोरेखित करत आहेत. त्यांचीही जैतापूरबद्दलची भूमिका हिंदोळ्यावरच आहे. ह्याचंही मुख्य कारण कुठल्याही ठोस भूमिकेचा अभाव एवढंच नाही, तर खरा प्रश्न प्रकल्प हवा की नको हा नसून आपलं एकंदरीत ऊर्जा, अणुऊर्जा, पर्यायी ऊर्जास्रोत ह्यांबद्दल धोरण काय असलं पाहिजे हा आहे, हेच न समजणं हे आहे, असं वाटतं. परिणामी, आज राज्यात, देशात किमान चर्चा व्हावी एवढीही राजकीय स्थिती नाही. सरकारच्या भूमिकेशी विपरीत भूमिका असणार्‍यांना राजकीय आधार नाही नि माध्यमे किमान तर्कसंगत चर्चेचाही आग्रह धरत नाहीत.

फुकुशिमा झालं असंही म्हणवत नाही. कारण ते तर अजून चालूच आहे. नि केव्हा निस्तरेल ह्याचा पत्ता नाही. तिकडे त्सुनामीने कहर केला नि जर्मनीत मेअकेल सरकारच्या पायाखालचं जाजम सरकलं. तिथल्या माध्यमांनी नि जनतेने तोच एक विषय लावून धरला. चेर्नोबिलच्या आठवणी काढून काढून प्रसंगाचं गांभीर्य जिवंत ठेवलं. अणुऊर्जेचा पराकोटीचा आग्रह धरणा‍र्‍या अनेक देशांनी सध्यापुरती हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवलेलं दिसत आहे. आज फुकुशिमा आणि अणुऊर्जा हा जगाच्या चर्चेचा विषय आहे, कारण त्या प्रकल्पाचे नि त्याविषयीच्या धोरणांचे परिणाम जागतिक आहेत, हे तरी किमान आमच्या माध्यमांना नि सरकारला मान्य असावं. मग जो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जगातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे, तो जगाच्या चर्चेचा विषय का नसावा?

आपली ऊर्जेची गरज किती आहे? किती असली पाहिजे? आपण अमेरिकेचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखेच आधी ऊर्जा ओरपून मग तिच्याबद्दल जागरूक होणार की आधीच तो मार्ग न घेता वेगळा मार्ग चोखाळणार? आपल्या ऊर्जेची निकड त्वरित भागविण्यासाठी आपण कुठले स्रोत वापरणार नि कालांतराने दीर्घमुदतीसाठी कोणते स्रोत वापरणार? जर पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत आपली ऊर्जेची नजीकच्या काळातली निकड भागविण्यासाठी वापरणं शक्य नसेल नि म्हणून आपण इतर स्रोत वापरणार असू, तर नजीकच्या काळासाठी त्यातल्या त्यात कमी पर्यावरणघातक स्रोत निवडू शकतो का नि कालांतराने त्यांच्यावरचा भर कमी कमी करत नेऊ शकतो का? त्यासाठी किमान उभारणीचा खर्च असणारे सध्या अस्तित्त्वात असलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारावर उभे राहू शकणारे प्रकल्प निवडणार की ज्यांचा खर्च भरून काढण्यासाठी ब्रेकइवन बिंदू खूप मोठ्या कालावधीचा आहे, असे प्रकल्प उभारणार? ते कालांतराने बंदच करायचे आहेत आपल्याला, ही भूमिका ह्या धोरणाच्या मागे असणार का नि त्यानुसार योजना आखणार का? ह्यासाठी आपण पर्यायी तंत्रज्ञान परदेशात कुणीतरी तयार करण्याची वाट पाहत बसणार आहोत का? हे आणि असे प्रश्न विचारण्याची, त्याची चर्चा करण्याची नि सरकारकडे अशा व्यापक धोरणासाठी मागणी करण्याची गरज असताना आपण काय चर्चा करत आहोत? --- प्रकल्प पहिजेच. प्रकल्प नको. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन कसं नि केव्हा करणार. ते आम्ही करू, जादा पैसे देऊन करू. प्रकल्पाला विरोध म्हणजे प्रगतीला विरोध. प्रकल्पाचा विरोध अफवांमुळे होत आहे. गैरसमज पसरवले जात आहेत. बाहेरचे लोक येऊन दिशाभूल करत आहेत, त्यांना उभं करू नका. कोण येतो विरोध करायला ते पाहतोच आम्ही. प्रकल्प होणारच. वगैरे.

सरकारची भूमिका बाण भात्यातून काढून धनुष्याला लावून प्रत्यंचा ताणून उभी असल्यासारखी आहे. परिणामी, सगळी चर्चा आणि आंदोलन "आधी तुम्ही बाण खाली ठेवा" इतकं घायकुतीला आलं आहे. त्यामुळे व्यापक चर्चा होणं अशक्यच दिसत आहे. हे जरी खरं असलं, तरी ह्याची जबाबदारी नि दोष आंदोलनालाही द्यायला हवा. जैतापूर चळवळकर्त्यांचा दृष्टिकोणसुद्धा पारंपरिक ऊर्जाप्रकल्पांसारखा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, स्थानिक नैसर्गिक/ सांस्कृतिक र्‍हास, मोठे प्रकल्प वगैरे पारंपरिक मुद्द्यांवरच केंद्रित झाला आहे. त्यामुळेच "प्रकल्पाचे तोटे सांगणारे सगळे बाहेरचे आहेत" असल्या राणे/चव्हाण/काकोडकर ह्यांच्या विधानांवर चळवळीतले कोणीही "मग फायदे सांगणारे स्थानिक आहेत काय?" किंवा "प्रकल्पाचे बरेवाईट परिणाम बाहेरच्यांनाही सहन करावे लागणार आहेत" असे ठणकावून सांगताना मी तरी ऐकले नाहीत. त्यामुळेच मुंबईतल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेवर बहिष्कार न टाकता उलट तिचा वापर प्रश्नाचा व्यापक आवाका समोर आणायची संधी म्हणून करायला हवा होता. पण चळवळ नर्मदा ढाच्यावर स्थानिककेंद्री करण्यात चळवळ करणार्‍यांनीही नकळत हातभार लावला आहे, असं वाटतं. जल/औष्णिकविद्युत नि असे अणुविद्युत प्रकल्प यांतला हा फरकच समजून घेतला जात नाही की काय असं वाटतं. प्रश्न वास्तविक जैतापूरचा, रत्नागिरी जिल्ह्याचा नसून जगातील सर्वात मोठ्या अणुऊर्जाकेंद्राचा नि परिणामी जगाचा आहे. हे कुणीतरी ओरडून सांगायला हवंय. नि सरकारचंही फावतंय, कारण त्यांनाही हा प्रश्न स्थानिक आहे हेच अधोरेखित करण्यात स्वारस्य आहे.

आम्हांला तहान लागली की आम्ही विहीर खणणार. त्याचं आम्हांला काहीच वाटत नसणार. मग दर वेळेस आम्ही झालं ते झालं, आता लागली आहे तहान तर नको का ती भागवायला म्हणून तात्पुरते दिसेल ती जागा खणत सुटणार नि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या. आम्हांला कशाचंच काही वाटत नसणार. नि निर्णय घेतानाच जनतेला सहभागी करून न घेता नि कुठलंही व्यापक धोरण न ठरवता थेट लोकांच्या मुळावर उठल्यावर झालेल्या विरोधाला आम्ही उपटसुंभांचा कांगावा म्हणणार. आम्ही आमचं तेच रेटत राहणार. हे सगळं होत असताना जत्रेच्या उन्मादाचे ढोलताशे बडवत आम्ही सगळेच बधिर होऊन साधे प्रश्नही पाडून नाही घेणार. आम्ही विजयाचा दांडोरा पीटत राहणार नि नाग्याच्या ईर्ष्येपायी चिंधीचा हकनाक बळी जाणार.