Friday, August 22, 2008
कविता
------------------------------------------
१.
पाऊस अल्लद
स्वप्नातल्या हिनकळ्या सावलीसारखा.
दिवसाआधीच्या झांजरझापीतला.
झाडांच्या फांद्यांवर; थेंबथेंब पानांवर
अल्लद स्वप्नातला, पाऊस झोपेतला.
पाऊस पक्ष्यांच्या पंखांवर निसटता
हलका, हेलकावता, थेंबाथेंबीचा
पिवळ्या जर्द पहाटेच्या
अंगणात पाखडल्या चिमण्यांच्या
चिवचिव चोंचीतल्या गाण्यातला.
पाऊस चढतीचा
आषाढ गढतीचा
दुपारच्या निःशब्द तळ्याच्या पाण्यावर
संथ सरपटता
केतकी कबूतरी पंखांच्या दाटीत
गर्भार गढतीचा.-पाऊस चढतीचा
पाऊस उतरल्या सांजेच्या काळोखात
गडदगर्द गहिरा
डोंगर कठड्याशी झिंगून काजळी काळोख पिणारा
निमूट झोपलेल्या खोर्याखोर्यांवर
विक्राळ बरळता मदमस्त पाऊस.
पाऊस रात्रीचा
कभिन्ह-माध्यान्ही
धसमुसळा, काळा, वैर्यासारखा.
उध्वस्त डोळ्यांतल्या सांदीसांदीतून
खिंडार पाडणारा.
विजेच्या विळख्यांनी वेटाळत जाणारा...
-सर्पाहून गहिरा.
--- ना. धों. महानोर (पावसाळी कविता)
------------------------------------------
२.
तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे,
निद्रिस्त शांतकाय आता पडून आहे.
गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी
हा वेल मोगर्याचा पानीं मिटून आहे.
अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाबः आता रोखून श्वास आहे.
जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फूट गीत मंद हुरहूर बोलताहे.
वनवेळु वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी निःश्वास टाकताहे.
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे.
बोले अखेरचे तोः "आलो इथे रिकामा,
सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे."
---आरती प्रभू, (नक्षत्रांचे देणे)
------------------------------------------
माझा खो आनंद आणि जास्वंदी ह्यांना.
Wednesday, August 6, 2008
दिल में एक लहर सी...
मूळ ग़ज़लेचे देवनागरी transliteration (ह्याला मराठीत काय म्हणायचं? अक्षरांतर?)(संदर्भ):
दिल में एक लहर सी उठी है अभी
कोई ताज़ा हवा चली है अभी
शोर बरपा है ख़ाना-ए-दिल में
कोई दीवार सी गिरी है अभी
कुछ तो नाज़ुक मिज़ाज हैं हम भी
और यह चोट भी नई है अभी
भरी दुनिया में जी नहीं लगता
जाने किस चीज़ की कमी है अभी
तू शरीक़-ए-सुख़ाँ नहीं है तो क्या
हमसुखाँ तेरी ख़ामोशी है अभी
याद के बेनिशाँ जज़ीरों से
तेरी आवाज़ आ रही है अभी
शहर की बेचराग़ गलियों में
ज़िंदगी तुझको ढूँढती है अभी
सो गए लोग उस हवेली के
एक खिड़की मगर खुली है अभी
तुम तो यारों अभी से उठ बैठै
शहर में रात जागती है अभी
वक़्त अच्छा भी आएगा 'नासीर'
ग़म ना कर ज़िंदगी पडी है अभी
ग़ज़लेचं भाषांतर ग़ज़लेच्या स्वरूपातच करावं असं वाटलं. ते खालीलप्रमाणे. भाषांतर कितपत जमलं हा भाग अलाहिदा. पण त्या प्रयत्नात शांता शेळके यांचं एक वाक्य संपूर्ण पटलं, जे काहीसं असं होतं - "भाषांतर हा एखाद्या साहित्यकृतीचा रसास्वाद घेण्याचा एक सर्वोत्कृष्ट मार्ग आहे"...शांताताई..अगदी खरं! भाषांतराचा प्रयत्न काहीसा असा...
आत्ताच लहर जराशी उठली अभ्यंतरी
ताजीच झुळुक हवेची आली कुठली तरी
गेहात उठे मनाच्या कसला कल्लोळसा
एखाद भिंत कुठेशी नुकती ढळल्यापरी
नाजूक, मृदुल म्हणा वा हळवा ढंगच खरा
ओलीच जखम तशी ही, नवीच तीही खरी
सुख भरून वाहे जरी, मन हे दुःखी तरी
आहे उणीव कशाची? उमगे ना हे परी
खुंटून जरी 'संवादी' नुरले शब्दच तुझे,
मौनही तुझे बोलते, साथ तीच सोयरी
स्मृतींची बेटे ज्यांची नव्हती खूणच कधी
तेथून तुझ्या स्वरांच्या झरती कानी सरी
शहरात उजळ दिव्यांच्या नुरल्या वाटा जरी
आयुष्य वणवण शोधे तुज त्या रस्त्यांवरी
निद्रिस्त समस्त वाडा, पहुडे तिमिरावरी
एकली सताड उघडी खिडकी वाड्यावरी
भलत्याच अशा अवेळी उठला तुम्ही कसे?
रात्रीस येतसे जाग शहरी ह्याच प्रहरी
आश्वस्त रहा "नासीर", काळ येईल भला
सोडून खंत बघ, जिणे उरे केवढेतरी
Monday, July 28, 2008
वायफळ सूर
काही निवांत क्षणांना हे जाणीवे-नेणीवेमधले वायफळ सूर कानांमध्ये रेंगाळतात. तसेच तेव्हाही रेंगाळत होते. घरपरतीच्या वाटेवरती. बँगा भरताना, पाऊस पाहताना, विमानात, धावपट्टीवर विमान उगीच रेंगाळत उभं असताना, विमानतळावर रिकामा बसलो असताना. सगळीकडेच. थेट शहरात पाय ठेवेपर्यंत नि त्यानंतर बरेच दिवस. अन्वयार्थांचे गुंते सोडवण्यात हशील नाही हे लवकरच उमगलं हे बरं झालं होतं. पुष्कळ दिवसांनी "काहीच काम नाही" अशी स्थिती आली की, अशा कामांच्या यादीहीन वेळेला वाटणारं "काहीतरी काम विसरतोय आपण नक्कीच" अशा अर्थाचं उसनं भय सुद्धा चेपलं होतं एव्हाना.
तेव्हाच लहानपणीच्या अलिबागच्या आठवणींत आधीची पिढी दंगली होती. सिनेगॉगपाशी घुटमळणारा वायफळ सूर आत्याच्या अलिबागच्या समुद्राजवळच्या ज्यू कुटुंबांच्या आठवणींशी जुळला. अलिबागचा नॉस्ट॓ल्जिया बालाजी मंदिरासमोर घोळवला जात असताना. तिथल्या प्रत्येक गल्लीच्या, वाड्याच्या, सरकारी इमारतीच्या नि त्या सगळ्यांतल्या साध्या सरळ माणसांच्या काही ना काही आठवणी ऐकून हसताना. त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नव्हतं. नॉस्टॆल्जिया उगाळण्याची ती पहिली का खेप होती त्यांची? पण वाटलं...नॉस्टॆल्जिया किती कालसापेक्ष असतो ना? म्हणजे आपण जगायला लागतो एखादी जागा तिथपासून आपल्या आठवणी सुरु...नॉस्टॆल्जिया हा एक memoryless random variable सारखा प्रकार आहे असा काहीसा साक्षात्कार तिथून घरी परत येता येता झाला.
परत आल्यावर स्टेशन गाठलं तेव्हा त्या चिरेबंदी बांधकामाशी स्पर्धा करणारे काँक्रिटचे स्तंभ दिसले. काही दिवसांनी जेव्हा तो स्टेशनपासून सुरु होणारा उड्डाणपूल नेमका कुठेतरी उतरेल तेव्हा त्याच्याखालचा रस्ता कितीतरी लोकांच्या नॉस्टॆल्जियाचा भाग असणं बंद होऊन जाईल. स्थितीशीलतेचे चोचले वाईटच पण शहर विकासाच्या कुठल्यातरी अचाट कल्पनांच्यापायी हे असे किती रस्ते नॉस्टॆल्जियाचा भाग असणं बंद होणार? हे रस्ते असेच नीरस होत जाणार? तशीच शहरंही त्या अमेरिकन शहरांसारखीच भकास होणार? मग ज्या रस्त्यांवरून मुळात कुणी चालणारच नाही, तिथे पाऊलखुणांचे काळाशी मेळ कसे काय जुळणार? असे काही अतिरेकी प्रश्न मनात आले.
अशा वेळी काय करावं? नॉस्टॆल्जिया हा एक memoryless random variable सारखा प्रकार आहे, ह्या साक्षात्काराचा बोध घेऊन सरळ एखादं शहर पहिल्यापासून परत जगायला लागावं का? आठवणींचं नवीन संचित निर्माण करण्यासाठी? स्तोत्रांत गुणगुणणारे वायफळ सूर खरंच वायफळच. "जे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे" असं स्मरणालाच म्हणायचं? ग्रेसांचे शब्द कधी कुठले संदर्भ घेऊन अर्थपूर्ण होतील हे शोधण्याइतकंच अनाकलनीय सारं. काळाच्या वशात् सगळे रस्ते स्मृतिपथम् जातील याचं भय नाही, ते होणारंच. पण त्या रस्त्यांनी जपलेली मूल्यं? तीसुद्धा? भय का जात नाही त्याच मार्गाने?
सारं उमलून आलेलं निवांतपण कसं वायफळ सूरांसारखं नकळत विरलं. म्हटलं नव्हतं? हा निमिषांचा निमिषांशी निमिषार्धासाठी खेळ!
Saturday, July 12, 2008
वायफळ सूर
हा चौक आणि त्याच्यापुढचं जैन मंदिर यांच्यामधोमध एक जुनाट वाडा होता. तो कित्येक दिवस तसाच भर रस्त्यात उभा होता. म्हणजे खरं तर तो आपल्याच जागी होता. त्याला हळूहळू रस्त्यावर आणलं होतं. ह्या जैन मंदिराच्या बरोबर समोर आणिक एक मंदिर आहे. कधीच गेलो नाही मी तिथे. का कुणास ठाऊक? जैन मंदिराचीसुद्धा खरं तर फार आठवण राहिली नसती. पण काही शिल्पकार अशी काही जादू करतात की आपल्या एखाद्या शिल्पाची आठवण कुणी वर्षानुवर्षे काढतंय ह्याची त्यांना कल्पनाही नसेल. त्यांच्या बोटांमधली जादू बघून जग खूश होताना त्यांची पोटं भरली होती की नाही कोण जाणे? ताजमहाल बांधणार्या हातांची आठवण न येता ताजमहाल पाहता येतो का? मला तरी नाही. तसेच ते हत्ती पाहताना. देवळाच्या दाराशी दोन बाजूला दोन देखणे निळे हत्ती. कधीही ह्या रस्त्यावरून जाताना सवयीने मान वळायची हत्ती पाहायला. जैन मंदिर नि द्वारपालासारखे सोंड वर करून उभे असणारे हत्ती असं एक विचित्र पण पक्कं समीकरण डोक्यात बसलंय माझ्या लहानपणापासून. मागे मंदिराचा जिर्णोद्धार झाला नि एक भव्य पांढरी इमारत उभी राहिली आजूबाजूला. सुदैवाने ते हत्ती तसेच राहिले, फक्त एका पांढर्या हत्तीची भर.
खरं तर तसंच पुढे जायचं कोपर्यावरच्या कचराकुंडीपर्यंत. पण मंदिराच्या पुढे जरासं आतल्या गल्लीतून जायचं. एका आतल्या रस्त्यावरच्या कचराकुंडीच्या, नि त्रिकोणी बागेच्या बाजूने. आता आपलं जन्मस्थळ ही काही राष्ट्राने जतन करून ठेवण्याची वास्तू नसली, तरी कौतुक असतंच ना निदान आपल्याला तरी. तीच ती जागा. त्याच्या चार पावलं पुढे घर. नि त्याच्या अजून चार पावलं पुढे मशीद. कानात भरलेली ती बांग. शब्द कधीच कळले नाहीत आजवर. स्तोत्रांचे अर्थ कोणाला कळतात म्हणा. पण ते जे सूर लागतात ना. ऐकत रहावं. आर्त ह्याशिवाय दुसरा शब्दच सुचत नाही मला. पुढे "स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे" ही ओळ ऐकल्यावर मला सर्वांत प्रथम ते सूर आठवले होते. ते दिवसभर घुमणारे आर्त सूर, जाईची नाजूक वेल, जाळीचं कोरीवकाम, सर्व गोष्टींत भरलेली पांढरी हिरवी रंगसंगती नि ह्या सगळ्यामुळे आपसुक येणारा असीम शांतपणा. हेच सगळं इथूनच गझलेध्ये उतरलं असेल का?
कुठे सुरांच्या आठवणी तर कुठे साजांच्या. मी कधीच ऐकलं नाही ते वायोलिन पण म्हणे कोपर्यावरच्या एका ज्यू कुटंबात कुणी रोज वाजवायचं. कसलं वाटत असेल ना रोज ऐकताना? आतली गल्ली मूळ रस्त्याला मिळते तिथेच. हल्ली त्याला सिनेगॉग चौक म्हणतात. त्याच गल्लीच्या खालच्या कोपर्याला. हल्ली त्याचाही जिर्णोद्धार होतोय. त्याच्यावरची दगडाची पाटी तशीच होती पण, नि ती चांदणी. शाळेत सगळ्यात पहिले शिकतो ना आपण चांदणी काढायला, एकात एक दोन त्रिकोण, एक वर बघणारा नि एक खाली बघणारा, तशी, सहा कोनांची, मूलभूत. वय वाढलं की हात न उचलता पाच टोकांची चांदणी शिकतो आपण, चंद्राबरोबर काढतात तशी. धर्मांचंही काहीसं असंच झालंय का? कोण कुठले कधी आले नि ह्या मातीचे कधी झाले, सारंच विचित्र. सर्वसमावेशकता, धर्मनिरपेक्षता हे शब्द काय संविधानाने ह्या भूमीला दिले? आधी आडात असावंच लागतं. मोठेपणा त्या चवदार पाण्याची चव कळण्यात असतो. कुणी तो पाणवठा इतरांसाठी खुला करतो, तर काहींना आपल्या रसशून्य गर्दभवृत्तीचाच आत्यंतिक अभिमान. सिनेगॉगच्या बाजूने वाहणारा नाला नि पुढे नाल्यापलीकडल्या वस्ती. त्या द्रष्ट्याच्या नावाच्या रस्त्याला धरून अजून उभ्या आहेत.
(क्रमश:)