Friday, September 26, 2008

जाता जाता...

...

एक्झिट २८.

शेवटी एकदाची गाडी हो नाही हो नाही करत वाहनांच्या गर्दीत.
निळ्या फोर्डचे आभार आत येऊ दिल्याबद्दल. संध्याकाळच्या पाच वाजता घर सोडलं तेव्हाच वाटलं होतं की, ट्र॓फिक आज जीव खाणार. पण इलाज नाही.
किती वेळ लागेल पोहोचायला आज?
सगळं सुरळित असताना साडेचार तास लागतात. आज पाच?
आत शिरल्यापासून ब्रेकवरचा पाय जसाच्या तसा...
मग थोडा हिय्या करून नि शेजारच्या लेनमधल्या एकदोन गाड्यांना बेसावध गाठून मी सर्वांत डावीकडल्या लेनमध्ये.

एक्झिट २९.

आज बहुतेक सहा तास?....सहा?
बारा पर्यंततरी पोहोचायला हवं. गाडी दोन फूट पुढे.
हवा काय सहिये आज. दिवसभर मळभ नि जोरदार वारा.
थंडी सुरू होणार आता. नि मग बर्फ..
मरो...
आज हवा छान आहे. आत्ताच थोडा पाऊस झालाय. एक पातळसं ज॓केट पुरतंय.
मागची गाडी फारच लगट करतेय. गाडी तर अम्रू दिसतेय, अरेच्चा नि आतला माणूसही. भाऊ, नका फिरत जाऊ फार देसी लोकांबरोबर. कुठून लावून घेतलात हा वाण?

एक्झिट ३०.

अजून इथेच! कठीण आहे. परत जावं का? उद्या सकाळी निघू लवकर.
नको.
दिवस वाया जाईल. आत्ताच जाऊ. काय होईल ते होईल.
पण किती वेळ लागेल! नि फार रात्र होईल डोंगरदर्‍यांचे रस्ते येईपर्यंत. मग तिथे जंगलात एकटंच भुतासारखं जात रहायचं?
पहिल्यांदा तर जातोय रात्रीचा, कुणी पाहिलंय एकटेच असणारोत हे? आज जाऊन बघू मग पुढच्या वेळेस आपोआपच ठरवता येईल असल्या अडनिड्या वेळेला निघायचं का ते...
बरं...जाऊया पुढे...
अजून वेळ आहे पण मागे जायला...पण असो...

देखूँ जिधर भी इन राहों में
रंग पिघलतें हैं निगाहों में
ठंड़ी हवा है, ठंड़ी छाँव है...
दूर वह जाने किसका गाँव है...
बादल ये कैसा छाया
दिल यह कहाँ ले आया
सपना यह क्या दिखलाया है मुझको..
हर सपना सच लगे, जब प्रेम अगन जले
जो राह तू चले अपने मन की
हर पल की सीप से मोती ही तू चुने
जो तू सदा सुने अपने की...
यूँही चला चल राही....कितनी हसीन यह दुनिया है.....

एक्सिट ३१.

"पाऊस अल्लद
स्वप्नातल्या हिनकळ्या सावलीसारखा"...
एक थेंब, दोन थेंब....काचभर थेंब...
वायपर एकदा इकडून तिकडे...थेंब दूर. पाण्याचा एकसंध हलकासा थर...काच स्वच्छ....वायपर बंद.
एक थेंब, दोन थेंब....काचभर थेंब...
वायपर एकदा इकडून तिकडे...थेंब दूर. पाण्याचा एकसंध हलकासा थर...काच स्वच्छ....वायपर बंद.
चालूच राहू देत की वायपर.
नको. एवढाही नाही पडताहे पाऊस. हे बरंय...
तसं दुसरं काय आहे करण्यासारखं?
खेळत रहा...
...
भरली काच...वायपर...नको इतक्यात....अजून भरू देत...पण समोरचं काही दिसतंय तरी का?
समोरच्या करोलाचे मागचे लाल दिवे दिसताहेत. ह्याहून अधिक काहीही दिसणं गरजेचं नाहीये. नि त्या करोलातही कोणी बघण्यासारखं बसलं नाहीये!....
पानं कसली हिरवीगार आहेत झाडांची....निथळतोय हिरवा रंग....चकाचक....
आत्ताच न्हाऊन ओले केस घेऊन निवांत उभी आहेत...."सोज्वळ मोहकतेने..." टाईप....
फार दिवस नाही उरले...एखादं पान लालसर व्हायला लागलंयसुद्धा...पण झाडाला त्याचं काहीच नाही...क्षमाशीलता कशी भरल्या रंध्रारंध्रांत...
पाऊस कसा अलगद विसावलाय पानांत...दवालाही हेवा वाटेल...

देखो इन्हें ये हैं ओस की बूँदें
पत्तों की गोद में आसमाँ से कूदे
अंगड़ाई ले फिर करवट बदलकर
नाज़ूक से मोती हँस दे फिसलकर...

एक्झिट ३२.

मोरमॉन का काहीसं चर्च...हे लोक टेंपल म्हणतात बहुदा...कोण जातं त्यात हे कोडंच आहे...पण काहीतरी गोपनीय नि एकदम सो हायक्लास प्रकार आहे म्हणतात...ही जमात फार पैसेवाली आहे...ते तर त्या सोनेरी कळसांवरूनच दिसतंय म्हणा...रात्री काय सही दिसतं पण ते.....आत्ताही पावसाळी हवेत कशी स्पेशल वॉशची सफ़ेदी की चमकार डोळ्यात भरतेय...ह्यांच्यासाठी स्पेशल पाऊस पडतो? का आपला चारचौघांसाठी पडतो तोच, श्रीमंती प्रदूषणात विरघळलेला?

गाडी त्याला जाऊन धडकेल सरळ असं वाटतानाच आपण नेहमीसारखे त्या वळणावर....स्पीड लिमिट ५०....कुणासाठी? इथे ५ वर गाडी चालत नाहीये....असो...

बाय द वे....रस्त्याला कसलं बँकिंग आहे....ह्या सर्वांत डावीकडच्या लेनमधून डावीकडे वळताना...बाकीच्या लेनमधली वाहनं घरंगळून अंगावर पडतील असं वाटतंय....ते उल्हासनगरच्या जवळ रेल्वेगाड्या तिरक्या होतात ना वळताना...तितकं जाणवतंय....तरीच असल्या वळणावरही स्पीड लिमिट बरंच आहे...वळणावर असं निवांत थांबलं की कळतं ना एकेक...ते किती अवघड आहे नि ते आधीच कोणीतरी कसं सोपं करून ठेवलंय ते....वळणांवर थांबता आलं पाहिजे...नुसतं वेग कमी करून त्यांना टाळून जाण्यात अर्थ नाही!

अर्रर्र....निळी अ॓क्युरा मध्ये...इतकंही नकोय रमून जायला रस्त्यात...पण ठिक आहे तसाही त्या सोनेरी करोलाचा कंटाळाच आला होता...ही निळाई हवामानाला साजेशी आहे.

एक्सिट ३३.

शहराला कसा वाहनांचा वेढा पडलाय...शहराला विळखा घालून बसलेला हा रस्ता...नि त्यात अजगराच्या शरीरात उंदीर हळूहळू पुढे सरकावा, तितक्याच संथपणे सरकत असलेली वाहनं. रस्ता गिळून तृप्त. म्हणजे रोज ह्या वेळेला वरून स्नँपशॉट घेतला तर शहराला खरोखरीच वाहनांचा वेढा पडलाय असं दिसेल नाही?...पण रस्त्याने गिळलेली वाहनं नि वाहनांनी गिळलेली माणसं...शहरात काय होतंय ह्याबद्दल सोयरसुतक नसलेली. किंवा कदाचित असलेली पण आपली क्रयशक्ती हरवून बसलेली...

शहराला वेढा देऊन बसला असेल कुणी एक, आता ही नोकरी किती दिवस टिकतेय असा घरी जाताना विचार करत...कुणी आजच कदाचित पिंक स्लीप घेऊन घरी चालला असेल. उद्या कुठला रस्ता? असा विचार करत. शहराच्या आत त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी ७० कोटींच्या बळीचा बकरा कोण? ह्यावर काथ्याकूट करत असतील. अरे आज तर पीएम पण आत असतील, सकाळीच न्यूयॉर्कहून इथे येणारेत असं बरखा दत्त म्हणत होती खरी तिच्या च॓नेलवर...कुणाला तरी "उरका आता, निवडणुकीच्या प्रचाराला जायचंय," असं झालं असेल...कुणी तरी म्हणत असेल, "हे काय आणलंय १२३ कराराचं मध्येच....इथे घरचं झालंय थोडं!"..

त्या सगळ्यांना जाऊन सांगायचं...आत्ता एक बातमी आलीय, राजधानीला वेढा पडलाय...रनगाड्यांसारखी धुडं आहेत, ती अमेरिकन बनावटीचीच आहेत...पण जपानी, कोरियन बनावटीची सामग्री भरल्या नुसती. कारण कळत नाहीये. गोंधळ आहे काहीतरी. आपण तर इतक्यात कुठे मोठा हल्ला नाही केलाय, नाही? व्हाईट हाऊस ने सैन्यही आऊटसोर्स केलंय का हल्ली? व्हाईट हाऊस मध्ये पीएम साहेबांच्या ताफ्यातला कुणी गुल्टी अधिकारी चिंतेत पडेल, हे १२३ करार ठिकेय हो. पण आता माझ्या भाच्याकडे कसा जाऊ व्हर्जिनियात? ह्या पुढल्या इलिप्समध्ये एखादं हेलिकॉप्टर उतरवता येईल का हो? त्या मॉन्युमेंटवर न आपटता?
हिहि...

वेड लागलंय का?
अजून तीन मिनिटांत एक्झिट ३४ नाही आलं तर लागेल.

एक्झिट ३४.

इथं का जायचंय सगळ्यांना!...हुश्श...उगीच वाट अडवून बसलेत मागच्यांची...
५, १०, १५, २५, ४०, ५५, ६५...स्पीडलिमिट अधिक दहा...पुरे!
विस्कटलेला ट्र॓फिक...
शहाणपण शाबूत...
उंदीर वेगात पुढे...
बहुदा साडे पाचच तास...
अर्थहीन विचारांच्या वेढयातून सुटका...

एक्झिट ३७.

ब्रेक...
धत्....क्षणभंगुर...हेसुद्धा?

(क्रमशः)

सामाजिक खोखो

संवादिनीने सुरू केलेला खोखो अनिकेतमार्फत इथवर आलाय. तो पुष्कळ वेळाने घेतोय त्याबद्दल प्रथम दिलगिरी.

खरं तर संवादिनीचं पोस्ट वाचलं तेव्हा सुरुवातीला ब्लॉगर्सपैकी कोणाला समाजाशी काही पडलंय हे वाचून बरं वाटलं. पण आपण आपलं उठून रक्तदान करून यावं नि समाजाचं ऋण वगैरे फेडलं बिडलं म्हणावं, हे काही झेपेना. त्यामुळे ते वाचल्यावर "तिडिक" ते "असो" असा विचारांचा एक प्रवास झाला. पण अनिकेतचं पोस्ट वाचून जरा जिवात जीव आला.

वास्तविक सामाजिक जाणीवेच्या भव्य कल्पना एवढ्या मर्यादित पातळीवर उतरून सीमित झाल्या, तेव्हा ह्या सामाजिकतेची, सामाजिक बांधिलकी वगैरेची, किंबहुना सामाजिक कामाच्या स्वरूपाची एक वर्गवारीच करावीशी वाटली.

पहिला गट त्या कामांचा जी अगदीच वैयक्तिक असतात, त्यातून गरजूंना मदत होते, पण आपल्या जीवाला नगण्य किंवा शून्य तोषिष लागून. ह्या कामासाठी दानत लागते. रक्त, डोळे, शरीर, पैसे, कपडे, अन्न, पुस्तकं वगैरे देणं हे आलं ह्यात. ह्या सगळ्या दातृत्वाचं श्रेष्ठत्व मानूनसुद्धा बहुतांशवेळा दिलेली गोष्ट आपल्याकडे एकतर अतिरिक्त असते किंवा ती भरून काढता येते (शरीर सोडून, तो वेगळाच भाग आहे पण). सुदैवाने अशा गोष्टी इतक्या प्रतिक्षिप्त क्रीयेसारख्या नकळत केल्या जातात, की त्या आठवून त्यांना सामाजिक काम म्हणायला माझी जीभ धजावेना. त्यामुळे त्यांची जंत्री येथे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण अशी दानत असणं हेसुद्धा दुर्मिळ झालेलं आजूबाजूला पाहताच लक्षात आलं नि मग म्हटलं की असेल एखाद्याला मिळत असं करून सामाजिक काम केल्याचं समाधान, तर मला काय त्याचं? चांगल्याच हेतूने तर करतात सगळे. तेव्हा असो!

ह्या गटात एक वैयक्तिक नैतिक कामे स्वरूपाचा उपगट घालूयात. ह्यात आपण कायदेशीर नि नैतिक वागून समाजाला अप्रत्यक्ष मदत करत असतो. वीज वाचवण्यापासून लाच न देण्यापर्यंत. ते नमूद करायला हरकत नाही. नुकतंच मी गाणी, चित्रपट बेकायदेशीर डाऊनलोड करणं किंवा इतरांकडून अशी फुकटची ती घेणं बंद करायचं ठरवलंय. सध्या जी आहेत त्यांचं काय? तर प्रांजळ कबुली की ती डिलिट करायचं धैर्य अजून नाही. तेही लवकरच येवो अशी इच्छा. तुम्ही कधी बंद करताय?

दुसरा गट म्हणजे संघटित स्वरूपाचं, साधारण समाजसेवी एनजीओ, सामाजिक संघटनांसारखं. (ज्या संघटना संघटित होऊन पहिल्या गटातली कामं फ्याशन म्हणून करतात त्यांचा काही संबंध नाही.) किंवा एखाद्या विशिष्ट समस्येवर, प्रश्नावर केलेलं काम (प्रश्नाविषयी जागृती करण्यासकट). किंवा एखाद्या दुर्लक्षित समाजघटकांसाठी केलेलं काम. काही वैचारिक बांधिलकी असणारं, charity च्या पलिकडलं, जरा स्वतःला तोषिष लावून.

नि इथे मला अगदी लाजेनं मेल्यासारखं वगैरे वाटू लागलं. वास्तविक अशी कामं पूर्ण वेळ करणारी मंडळी घरात असताना, आपण अगदी खानदानाला धब्बा वगैरे आहोत असं वाटू लागलं. नि हा खोखो आपल्यापर्यंत नाहीच आला तर बरं होईल, नाही तर त्यावर लिहायला लागलो तर अजून लाज वाटेल असा एक सोयीस्कर पळपुटा विचार मनात आला. पण अगदी दुसर्‍याच खेपेला तो आला नि मला बेसावध गाठलं, नि शिवाय अनिकेत नि अगदी विचारपूर्वक वगैरे दिला होता हे वाचून तर अधिकच त्रास.

मग ठरवलं फार झालं. जे इतके दिवस करता येण्यासारखं आहे असं नुसतं म्हणत होतो, त्याची माहिती गोळा केली. तर आमच्या विद्यापीठात पर्यायी स्प्रिंग ब्रेक नावाचा एक उपक्रम चालतो. ह्यात अमेरिकेच्या विविध भागांत वा अमेरिकेबाहेर अभ्यासगट, कृतिगट पाठवले जातात. प्रत्येक भेटीमागे विशिष्ट उद्देश असतोः पर्यावरणीय समस्या, शिक्षणामधील तफावत, जागतिकीकरणाचे दुष्परिणाम, आपद्कालीन मदतीमधील भेदभाव वगैरे. तर येत्या स्प्रिंग ब्रेक मध्ये अशा अभ्यास/कृतिगटात जायचं नक्की केलं. मी ह्या चार उद्दिष्टांसंदर्भात काम करायला जाणार्‍या गटांमध्ये सहभागी व्हायला उत्सुक आहे असे अर्जात पर्याय देणार आहे. म्हणजे मी ठरवलंय. रीतसर अर्ज, मुलाखती असा सोपस्कार आहे. त्यामुळे निवड व्हावी लागणारे. पाहूयात. निवड झाल्यावर खर्चाचं काय हाही प्रश्न आहे, पण निधी उभारण्यासाठीही काही उद्योग करतात म्हणे. नाहीतर पदरचे मोडीन. तसेही स्प्रिंग ब्रेक मध्ये लांबलचक सहलीवर उडवीनच पैसे...तर ते दुय्यम आहे. निवड झाली तर जाईनच, नि ते अनुभव इथे लिहिनंच. नाही झाली तरीही त्याच केंद्राच्या अजून एक दोन गोष्टी बघून ठेवल्यात त्याचा पाठपुरावा करीन. ही अर्थात पहिली पायरी, शिक्षण संपेपर्यंत बहुतेक सुट्ट्यांमध्येच, पुढंचं पुढे...

तिसरा गट हा व्यापक आहे. म्हणजे व्यापक सामाजिक-राजकीय स्वरूपाचा. राजकारण व समाजकारण हे काहीतरी भिन्न आहे असं मला जराही वाटत नाही. अशी समजूत असणारे दोन गट: समाजकारणाशी नातं तोडलेले राजकारणी नि राजकारण व समाजकारणाशी नातं तोडलेले शिकले सवरलेले लोक. मला हे असं अलिप्त जगणं अशक्य आहे. वास्तविक अराजकीय भूमिका घेऊन केलेलं समाजकारणसुद्धा मग बर्‍याचदा मर्यादित राहतं, असं आपलं माझं मत. पण ते सगळं करायची ही वेळ नाही. मागे हे सगळं सांगितल्यावर एका मित्राच्या आईने "आधी शिक्षण पूर्ण कर बाबा" असं सांगितलं होतं. मलाच त्यांची दया आली. मी पोट धरून हसून, "काकू, मी काय उद्या उठून राजकारणात शिरत नाहीये" असं सांगितलं होतं, तेव्हाही त्यांच्या चेहर्‍यावर मी काहीतरी भयंकर करणारे आयुष्यात असाच भाव होता. पण त्या सगळ्याला वेळ आहे, नि नेमकं कसं काय होईल कुणास ठाऊक. पण रक्तातच उतरलंय बहुतेक माझ्यात, अराजकीय होताच येत नाही, त्याला काय करणार...पण ते असो....ही ती वेळ नव्हे.

हे वर्गीकरण माझ्यापुरतंच...ते वर्गही अर्थातच mutually exclusive and exhaustive नाहीत. त्यामुळे नाही पटले तर सोडून द्या. गट १ हा अगदी विनम्रपणे माझ्यासाठी सवयीचा भाग आहे, त्यामुळे त्या कामांना मी कमी लेखून उगीच कुणाला दुखावलं वगैरे असेल तर जाहीर माफी. गट २ हा खरा गाभा आहे नि त्यासाठी हालचाल सुरू करायला कारण ठरल्याबद्दल ह्या खोखोचे आभार. गट ३...पाहूयात!

गट२ शी असलेली बांधिलकी ज्यांच्या लेखांतून वेळोवेळी व्यक्त झालेली आहे, त्या कसंकायक्षिप्रा ह्यांना माझा खो!

Friday, August 22, 2008

कविता

मेघनाकडून खो घेऊन...
------------------------------------------
१.

पाऊस अल्लद
स्वप्नातल्या हिनकळ्या सावलीसारखा.
दिवसाआधीच्या झांजरझापीतला.
झाडांच्या फांद्यांवर; थेंबथेंब पानांवर
अल्लद स्वप्नातला, पाऊस झोपेतला.

पाऊस पक्ष्यांच्या पंखांवर निसटता
हलका, हेलकावता, थेंबाथेंबीचा
पिवळ्या जर्द पहाटेच्या
अंगणात पाखडल्या चिमण्यांच्या
चिवचिव चोंचीतल्या गाण्यातला.

पाऊस चढतीचा
आषाढ गढतीचा
दुपारच्या निःशब्द तळ्याच्या पाण्यावर
संथ सरपटता
केतकी कबूतरी पंखांच्या दाटीत
गर्भार गढतीचा.-पाऊस चढतीचा

पाऊस उतरल्या सांजेच्या काळोखात
गडदगर्द गहिरा
डोंगर कठड्याशी झिंगून काजळी काळोख पिणारा
निमूट झोपलेल्या खोर्‍याखोर्‍यांवर
विक्राळ बरळता मदमस्त पाऊस.

पाऊस रात्रीचा
कभिन्ह-माध्यान्ही
धसमुसळा, काळा, वैर्‍यासारखा.
उध्वस्त डोळ्यांतल्या सांदीसांदीतून
खिंडार पाडणारा.
विजेच्या विळख्यांनी वेटाळत जाणारा...
-सर्पाहून गहिरा.

--- ना. धों. महानोर (पावसाळी कविता)
------------------------------------------

२.

तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे,
निद्रिस्त शांतकाय आता पडून आहे.
गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी
हा वेल मोगर्‍याचा पानीं मिटून आहे.
अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाबः आता रोखून श्वास आहे.
जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फूट गीत मंद हुरहूर बोलताहे.
वनवेळु वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी निःश्वास टाकताहे.
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे.
बोले अखेरचे तोः "आलो इथे रिकामा,
सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे."

---आरती प्रभू, (नक्षत्रांचे देणे)
------------------------------------------

माझा खो आनंद आणि जास्वंदी ह्यांना.

Wednesday, August 6, 2008

दिल में एक लहर सी...

नासीर काज़्मी यांची "दिल में एक लहर सी उठी है अभी" ही ग़ुलाम अलींच्या गायकीने अजरामर झालेली ग़ज़ल. तिच्या भाषांतराचा एक प्रयत्न.

मूळ ग़ज़लेचे देवनागरी transliteration (ह्याला मराठीत काय म्हणायचं? अक्षरांतर?)(संदर्भ):

दिल में एक लहर सी उठी है अभी
कोई ताज़ा हवा चली है अभी

शोर बरपा है ख़ाना-ए-दिल में
कोई दीवार सी गिरी है अभी

कुछ तो नाज़ुक मिज़ाज हैं हम भी
और यह चोट भी नई है अभी

भरी दुनिया में जी नहीं लगता
जाने किस चीज़ की कमी है अभी

तू शरीक़-ए-सुख़ाँ नहीं है तो क्या
हमसुखाँ तेरी ख़ामोशी है अभी

याद के बेनिशाँ जज़ीरों से
तेरी आवाज़ आ रही है अभी

शहर की बेचराग़ गलियों में
ज़िंदगी तुझको ढूँढती है अभी

सो गए लोग उस हवेली के
एक खिड़की मगर खुली है अभी

तुम तो यारों अभी से उठ बैठै
शहर में रात जागती है अभी

वक़्त अच्छा भी आएगा 'नासीर'
ग़म ना कर ज़िंदगी पडी है अभी

ग़ज़लेचं भाषांतर ग़ज़लेच्या स्वरूपातच करावं असं वाटलं. ते खालीलप्रमाणे. ‍भाषांतर कितपत जमलं हा भाग अलाहिदा. पण त्या प्रयत्नात शांता शेळके यांचं एक वाक्य संपूर्ण पटलं, जे काहीसं असं होतं - "भाषांतर हा एखाद्या साहित्यकृतीचा रसास्वाद घेण्याचा एक सर्वोत्कृष्ट मार्ग आहे"...शांताताई..अगदी खरं! भाषांतराचा प्रयत्न काहीसा असा...

आत्ताच लहर जराशी उठली अभ्यंतरी
ताजीच झुळुक हवेची आली कुठली तरी

गेहात उठे मनाच्या कसला कल्लोळसा
एखाद भिंत कुठेशी नुकती ढळल्यापरी

नाजूक, मृदुल म्हणा वा हळवा ढंगच खरा
ओलीच जखम तशी ही, नवीच तीही खरी

सुख भरून वाहे जरी, मन हे दुःखी तरी
आहे उणीव कशाची? उमगे ना हे परी

खुंटून जरी 'संवादी' नुरले शब्दच तुझे,
मौनही तुझे बोलते, साथ तीच सोयरी

स्मृतींची बेटे ज्यांची नव्हती खूणच कधी
तेथून तुझ्या स्वरांच्या झरती कानी सरी

शहरात उजळ दिव्यांच्या नुरल्या वाटा जरी
आयुष्य वणवण शोधे तुज त्या रस्त्यांवरी

निद्रिस्त समस्त वाडा, पहुडे तिमिरावरी
एकली सताड उघडी खिडकी वाड्यावरी

भलत्याच अशा अवेळी उठला तुम्ही कसे?
रात्रीस येतसे जाग शहरी ह्याच प्रहरी

आश्वस्त रहा "नासीर", काळ येईल भला
सोडून खंत बघ, जिणे उरे केवढेतरी